लोकसभा निवडणूक तिसरा टप्पा LIVE : EVM हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो - शरद पवार

देशात तिसऱ्या टप्प्यातलं मतदान संपता संपता शरद पवार यांनी भाजपवर आरोप केला आहे.

सध्या भाजपच्या विरोधात लाट आहे, पण EVM हॅक करून मतदान प्रक्रियेवर परिणाम केला जाऊ शकतो, असा आरोप शरद पवार यांनी केला आहे.

13 राज्यं आणि 2 केंद्रशासित प्रदेशांतील 117 लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडलं.

संध्याकाळी 6.30 वाजता: पुण्यात 43.63 टक्के मतदान

महाराष्ट्रात आज तिसऱ्या टप्प्यात एकूण 57.01% मतदानाची नोंद झाली. महाराष्ट्रात मतदानाची सर्वाधिक टक्केवारी कोल्हापुरात असून तिथे 65.70 टक्के मतदान झालं आहे. त्यापाठोपाठ हातकणंगले मतदारसंघात 64.79 टक्के मतदान झालं आहे. सर्वात कमी टक्केवारी पुण्यात नोंदविली गेली आहे. पुण्यात 43.63 टक्के मतदान झालं. औरंगाबादमध्ये 58.52 टक्के, बारामतीत 55.84 टक्के, माढ्यात 56.41 टक्के, साताऱ्यात 55.40 टक्के, जळगावमध्ये 52.28 टक्के मतदान झालं आहे.

दुपारी 4 वाजता: देशात 38 टक्के मतदान

दुपारी अडीच वाजेपर्यंत देशभरात 38.11 टक्के मतदान झालं आहे.

महाराष्ट्रात 32.36 टक्के, त्रिपुरात 45.54 टक्के, केरळमध्ये 40.87 टक्के, ओडिशात 32.82 टक्के तर जम्मू काश्मीरमध्ये 9.63 टक्के इतके मतदान झालं आहे. तसेच कर्नाटकमध्ये 36.74 टक्के, आसाममध्ये 46.61 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 29.76 टक्के, बिहारमध्ये 37.05 टक्के आणि पश्चिम बंगलामध्ये 52.60 टक्के मतदानाची नोंद झाली .

केरळमधील वायनाड मतदारसंघातून राहुल गांधी निवडणूक लढवत आहेत. तर गुजरातमधील गांधीनगरमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह मैदानात आहेत. राहुल गांधी यांचा केरळमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय काँग्रेसचा धोरणात्मक निर्णय मानला जात आहे. तर अमित शाह यांनी लालकृष्ण आडवाणी यांच्यापेक्षा जास्त मताधिक्य मिळवण्याचा करिश्मा करून दाखवावा लागणार आहे.

लोकसभा निवडणुकीत दुष्काळाचा मुद्दा कुठे आहे?

सातारा जिल्ह्यातील म्हसवड इथल्या असले्लया राज्यातील सर्वांत मोठ्या चारा छावणीतून बीबीसी मराठीचा विशेष रिपोर्ट :

समाजवादी पक्षाचे नेते मुलायमसिंह यादव, काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खार्गे, शशी थरुर; भाजपचे नेते अनंतकुमार हेगडे आदी नेत्यांचं भवितव्यही आज ठरणार आहे.

महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघात आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदानानंतर 302 लोकसभा मतदारसंघांचा निर्णय मतपेटीत बंद झालेला असेल.

दुपारी 4 वाजता : कोल्हापुरात 54 टक्के मतदान

दुपारी 3 वाजेपर्यंत कोल्हापुरात 54 टक्के, हातकणंगलेमध्ये 53 टक्के तर सांगलीत 47 टक्के मतदान झालं आहे.

दुपारी 2 वाजता : मालोजीराजेंनी केले मतदान

दुपारी 1.30 वाजता : लालकृष्ण आडवाणी यांचं अहमदाबादमध्ये मतदान

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी यांनी अहमदाबादमधील शाहपूर हिंदी स्कूल इथल्या मतदान केंद्रावर मतदान केलं.

दुपारी 1.00 : निवडणूक प्रचारात भाग घेतल्याने नरसिंग यादववर गुन्हा

सध्या सहायक पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेला कुस्तीपटू नरसिंग यादव यांच्यावर निवडणूक प्रचारात भाग घेतल्याने गुन्हा नोंदवला आहे. नरसिंग यादवने 21 एप्रिलला काँग्रेस पक्षाच्या प्रचारात भाग घेतला होता, असं ANIनं बातमीत म्हटलं आहे.

दुपारी 12.15 : सांगलीत 19.68 टक्के मतदान

सांगली लोकसभा मतदारसंघात दुपारी 12पर्यंत 19.68 टक्के मतदान झालं आहे. भाजपचे खासदार संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी मतदान केलं.

सकाळी 11.30 : पुण्यात सकाळच्या टप्प्यात 17.46 टक्के मतदान

पुण्यात सकाळी 11 वाजेपर्यंत 17.46 टक्के मतदानाची नोंद झालेली आहे. पुण्यात सर्वच केंद्रांवर मतदानात उत्साह दिसत आहे. विशेष करून पहिल्यांदाच मतदान करणाऱ्यांत खास जोश दिसून आला. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

मतदान कसं केलं जात? - निवडणुकीविषयी सर्व माहिती

लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. मतदान कसं केलं जातं, मतदानाची नेमकी प्रक्रिया कशी असते, ओळखपत्र म्हणून कोणता पुरावा ग्राह्य मानला जातो, अशा शंका अनेकांच्या मनात असतात. ही माहिती तुम्ही जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा.

NOTA : मतदानात वापरल्या जाणाऱ्या 'नोटा' पर्यायाविषयी तुम्हाला या गोष्टी माहीत आहेत का?

NOTA म्हणजे None Of The Above. वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नसेल तर सर्वांत खाली एक बटण असतं. ते दाबलं तर वरीलपैकी कोणताच उमेदवार पसंत नाही असं मत देता येतं. या पर्यायाबद्दलची सविस्तर माहिती इथं वाचा.

मतदार यादीत तुमचं नाव आहे, हे तुम्ही कसं चेक कराल?

पण मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं पाहाता येईल किंवा नसेल तर मतदार यादीत नाव नोंदणी कशी कराल? ही माहिती जाणून घेण्यासाठी इथं क्लिक करा

सकाळी 11.8 - एका पक्षाला बहुमत मिळणार नाही, NDA सरकार स्थापणार - राऊत

शिवसेनेचे नेते संजय राऊत म्हणाले, "सध्याचं चित्र पाहता मला असं दिसतं की निवडणुकीनंतर कोणत्याही एका पक्षाची सत्ता येणार नाही. NDAची सत्ता येईल. आम्ही NDAचे घटक पक्ष आहोत. आम्ही एकत्र सरकार स्थापन करू."

सकाळी 11.05 - अण्णा हजारे यांनी केलं मतदान

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्ध इथं मतदान केलं.

सकाळी 10.50 : भाजप कार्यकर्त्यांची निवडणूक अधिकाऱ्याला मारहाण

उत्तर प्रदेशमधील मुरादाबाद इथं भाजपच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकी अधिकाऱ्याला मारहाण करण्याची घटना घडली आहे. हे अधिकारी समाजवादी पक्षाच्या सायकल चिन्हाला मतदान करा असं मतदारांना सांगत होते, असा आरोप भाजप कार्यकर्त्यांचा होता.

सकाळी 10.49 : बारामतीचा गड राष्ट्रवादी राखणार - अजित पवार

बारामतीचा गड सुप्रिया सुळे राखतील. त्या चांगल्या मतांनी निवडणून येतील, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित यांनी दिली आहे.

सकाळी 10.28 : पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हिंसा

झारखंड आणि छत्तीसगडच्या सीमेवर बंडारचुआ इथं IEDचा स्फोट घडवण्यात आला. नक्षलवाद्यांनी हा स्फोट घडवल्याचा संशय आहे. तर पश्चिम बंगालमध्ये मुरशिदाबाद इथं डोमकालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हातबाँब फेकण्यात आला, यात 3 जण जखमी झाले आहेत.

सकाळी 10.25 : लोकशाहीचं शस्त्र Voter ID - मोदी

"दहशतवादाचं शस्त्र IED असतं, तर लोकशाहीचं शस्त्र VOTER ID असतं. मला विश्वास आहे की वोटर आयडीची ताकद IED पेक्षा कित्येक पट जास्त आहे. आपण त्याचं महत्त्व समजून घेऊ. जास्तीत जास्त मतदान करुया, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

सकाळी 10.00 : बिहार, आसाममध्ये सर्वाधिक मतदान

सकाळच्या सत्रात आसाममध्ये 12.36 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. तर बिहारमध्ये 12.60 टक्के मतदान नोंदवले गेले आहे. गोवा (2.29), गुजरात (1.35), जम्मू काश्मीर (0), कर्नाटक 1.75, केरळ (2.48), महाराष्ट्र (0.99), ओडिशा (1.32), त्रिपुरा (1.56), उत्तर प्रदेश (6.84), पश्चिम बंगाल (10.97), छत्तीसगड (2.24), दादर नगर हवेली (0), दमन आणि दिव (5.83) या राज्यांत मतदानाचा वेग कमी दिसून आला.

सकाळी 9.20 : भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांचं मतदान

भाजपचे उमेदवार गिरीश बापट यांनी पुण्यातील अहिल्यादेवी गर्ल्स हायस्कूल इथं मतदान केलं

सकाळी 9.00 पुण्यात उत्साहात मतदान

पुण्यात उत्साहात मतदान सुरू झालं असल्याचे चित्र आहे. विविध मतदान केंद्रावर लोकांची गर्दी पाहायला मिळत आहे. आईची दशक्रिया विधी असतानाही योगेश आणि विवेक सरपोतदार या बंधूंनी मतदानाचा हक्क बजावला. पुण्यात ज्येष्ठ नागरिकांनीही उत्साहाने मतदानात सहभाग घेतला आहे.

सकाळी 8.35 - धनंजय महाडिक यांचे कोल्हापुरात मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसचे कोल्हापुरातील खासदार धनंजय महाडिक यांनी बाजार समिती मतदान केंद्रावर मतदान केलं.

सकाळी 8.34 - अहमदनगरमध्ये काही मतदान केंद्रावर मतदान थांबले

अहमदनगरमधील बालकाश्रम आणि जामनेर तालुक्यात नानज इथं EVMमध्ये बिघाड झाल्याने मतदान थांबवण्यात आलं आहे.

सकाळी 8.30 - मोदी यांचं मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अहमदाबाद इथल्या रानिपमधील मतदान केंद्रावर मतदान केलं.

सकाळी 8. 19 - सुप्रिया सुळे यांचं मतदान

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी बारामती इथं मतदान केलं. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही मतदान नोंदवलं.

सकाळी 8. 17 - पुण्यात ज्येष्ठ नागरिकांचं मतदान

पुण्यातील मयूर कॉलनीत 93 वर्षांचे प्रभाकर भिडे आणि 88 वर्षांच्या सुशीला भिडे यांनी मतदान केलं.

सकाळी 8.15 वाजता : केरळमध्ये पी. विजयन यांचं मतदान

केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी कन्नुर जिल्ह्यातील RC अमला शाळेतील मतदान केंद्रावर मतदान केलं.

सकाळी 8 वाजता : अमित शाह यांचं नारायणपुरा इथं मतदान

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह गांधीनगर येथून लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. नारायणपुरा इथल्या मतदान केंद्रावर ते मतदान करतील.

सकाळी 8 वाजता : पंतप्रधान मोदी यांचं अहमदाबादमध्ये मतदान

पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद इथं मतदान करणार आहेत. ते अहमदाबाद इथं त्यांच्या घरी पोहोचले असून त्यांनी त्यांच्या आईचे आशीर्वाद घेतले.

हे वाचलं का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)