You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल - इच्छामरणाची परवानगी मिळावी का? बीबीसीच्या वाचकांमध्ये एकमत नाही!
इरावती लवाटे आणि त्यांचे पती नारायण लवाटे गेल्या अनेक वर्षांपासून सरकारकडे इच्छामरणाची मागणी करत आहेत. इच्छामरणाचा कायदा जर होत नसेल तर आम्हाला वैयक्तिक तरी मरणाची परवानगी द्या, अशी मागणी लवाटे दांपत्यानं राष्ट्रपतींकडे डिसेंबर 2017 मध्ये केली होती. मात्र राष्ट्रपतींकडून त्यावर काहीही उत्तर आलेलं नाही.
त्यामुळे इरावती लवाटेंनी आता आणखी एक पत्र लिहिलं आहे. "31 मार्चपर्यंत जर सरकारने परवानगी दिली नाही तर तुम्ही (पती नारायण लवाटे) माझा गळा दाबून मला मारून टाका, मग तुम्हाला फाशी होईल," अशा आशयाचं हे पत्र त्यांनी राष्ट्रपतींना लिहिलं आहे.
याच निमित्ताने बीबीसी मराठीने वाचकांना विचारलं होतं की इच्छामरणाला कायद्याने परवानगी मिळावी, या मागणीविषयी त्यांना काय वाटतं?
त्यावरून सोशल मीडियावर झालेल्या चर्चेचा हा आढावा.
विजय सबनीस यांनी 'इच्छामरणास कायद्याने मुभा असावी,' असं मत व्यक्त केलं आहे.
"ज्याप्रमाणे शंभर अपराधी सुटले तरी चालेल पण एका निरपराध्याला शिक्षा होऊ नये, असं आपल्या न्यायदेवतेचं तत्त्व आहे. तसंच कोणाची जगण्याची इच्छा असूनही या कायद्यामुळे त्याचा बळी जाऊ नये," असं म्हणत एकता परब यांनी या मागणीला ठाम विरोध केला आहे.
आशिष मगरे यांच्या मते, "आत्महत्या करणं हेच सगळ्यांत मोठं पाप आहे."
"जन्म नाही, किमान मरण तरी स्वेच्छेने मिळावं, पण त्याला योग्य निकष असावेत,"असं मत मयूर बेर्डे यांनी मांडलं आहे.
राजेश दहाके यांनी लवाटे दांपत्या यांना, "जिथे त्यांची काळजी घेतली जाईल अशा ठिकाणी आपलं उरलेलं आयुष्य घालवावं," असा सल्ला दिला आहे.
रविकिरण सावे आणि सागर साळवे यांनी हे सगळं प्रसिद्धीसाठी सुरू असल्याचं म्हटलं आहे.
स्वाती कदम यांनाही वाटतं की, एखाद्या व्यक्तीला त्यांच्या आजारपणात इच्छामरणाला कायदेशीर परवानगी मिळायला हवी. नवनाथ मंडलिक यांचं मतही काहीसं तसंच आहे.
"कधी कधी इच्छामरण गरजेचं असतं. पण तसा परवानगीचा कायदा झाल्यास त्याचा गैरफायदाच जास्त होईल, म्हणून नको वाटतं," असं मत अजय जाधव यांनी व्यक्त केलं आहे.
"सत्यता पडताळून, कायदा पाहून, वारसदार नात्यांचा मागोवा घेऊन गुप्तपणे चौकशी करून परवानगी मिळावी," असं स्नेहल रेळेकर यांनी सुचवलं आहे.
दिनेश म्हसकर यांनी म्हणतात, "इच्छामरणाला कायद्याने परवानगी मिळायलाच हवी कारण आत्महत्या करणं कायद्याने गुन्हा आहे आणि एखाद्याला मारणंसुद्धा कायद्याने गुन्हा आहे. परंतु एखादी व्यक्ती आजाराने किंवा वृद्धापकाळाने असहाय्य असेल, आणि अशा व्यक्तींना पुढे बघायलाच कोणी नसेल, तर अशा व्यक्तींना इच्छामरणाची परवानगी देण्यास काहीच हरकत नाही."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)