सोशल : 'संविधान बचाओ रॅली म्हणजे साप-मुंगसाचा खेळ'

मुंबईत उद्या 'संविधान बचाओ रॅली' आहे. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीत अशोक चव्हाण, बाबा आढाव, राजू शेट्टी, हार्दिक पटेल आणि फारूख अब्दुल्लांसमवेत अनेक राष्ट्रीय नेत्यांचा सहभाग असणार आहे.

या पार्श्वभूमीवर बीबीसी मराठीने वाचकांना प्रश्न विचारला होता की, 'संविधान बचाओ रॅली'च्या निमित्ताने शरद पवार विरोधी पक्षांना एकत्र आणू शकतील का? त्यावर वाचकांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या. त्यातल्याच या काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

अमोल सूर्यवंशी लिहितात, "'संविधान बचाव रॅली'च्या निमित्ताने शरद पवार सगळ्या विरोधी पक्षांना एकत्र आणू शकणार नाहीत. कारण इतर पक्षांना एकत्र जरी आणलं तरी स्वतःच्या फायद्यासाठी पवार कधीही पलटी मारू शकतात. त्यामुळे इतर पक्षही पवारांवर कधी विश्वास ठेवू शकणार नाहीत."

"हे सर्व गारूडी आहेत. आणि साप-मुंगसाचा खेळ मांडून जनतेची करमणूक चालू आहे," असं म्हटलं आहे बाबूराव नरोटे यांनी.

सुनील सुर्वे यांचं मात्र थोडं वेगळं मत आहे. संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं आवश्यक आहे असं त्यांना वाटतं.

"विरोधी पक्षांत प्रत्येकाची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान बनण्याची आहे. त्यामुळे ते एकत्र येणं शक्य नाही. उलट काही पक्ष भाजपला पाठिंबा देऊन आपल्या पदरात काही पडतं का ते पाहण्याचा प्रयत्न करतील," असं केदार गिरिधारी यांना वाटतं.

पंकज पाटील म्हणतात, "शरद पवार फारच बेभरवशाचे आहेत. वेळ आलीच तर या विरोधी पक्षांच्या पाठीत खंजीर खुपसायला हे मागे-पुढे पाहणार नाहीत.

रवी थोरात यांना मात्र शरद पवारांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. "साहेबांना काहीच अशक्य नाही," असं त्यांनी लिहिलं आहे.

अभिजित यांनी ट्वीट केलं आहे की, "सारे नेते जमीनपर."

करणी सेनावाला - बिरबल या अकाऊंटने ट्वीट केलं आहे की, "त्यांनी तसा प्रयोग पुलोदच्या वेळीसुद्धा केला होता, मुळात पवारांना बेरजेचे राजकारण कधीच जमले नाही."

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)

हे वाचलंत का?