You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
राज ठाकरे बाहुबली की भल्लालदेव? सोशल मीडियावर चर्चेला उधाण
शिवसेनेनं मुंबई महानगरपालिकेतलं आपलं संख्याबळ वाढविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ६ नगरसेवकांना पक्षात घेतलं आहे.
त्यानंतर मनसे आणि राज ठाकरे यांच्याबद्दल सोशल मीडियावर अनेक जण प्रतिक्रिया व्यक्त करू लागले.
बीबीसी मराठीनं याबाबत मनसेच्या सध्याच्या स्थितीबाबत 'होऊ द्या चर्चा'मध्ये प्रश्न विचारला. त्याच्या उत्तरादाखल आणि सोशल मीडियावर आलेल्या प्रतिक्रियांपैकी निवडक प्रतिक्रिया अशा आहेत.
राज ठाकरे यांच्या समर्थकांनी त्यांची बाजू सावरण्याचा प्रयत्न ट्विटर आणि फेसबुकवर केला आहे.
'गद्दारी फक्त पैशासाठी'
फेसबुकवर निशांत कळस्कर यांनी या 6 नगरसेवकांच्या मुद्द्यावर बोलताना, "गद्दारी फक्त पैशासाठी होत असते", असं स्पष्ट मत नोंदवलं आहे.
प्रशांत निकम यांनी ट्वीटमध्ये म्हणतात की, "ध्येय असं पाहिजे की, ज्या दिवशी तुम्ही हराल त्या दिवशी जिंकणाऱ्यापेक्षा तुमची चर्चा झाली पाहिजे."
यावेळी त्यांनी घोडेबाजार असा हॅशटॅग लिहून संपूर्ण प्रकरणाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतं आहे.
फेसबुकवरच धनंजय अश्विनी अशोक पांडे यांनी राज ठाकरेंची बाहुबलीशी, तर उद्धव यांची भल्लालदेवशी तुलना केली आहे.
पांडे लिहीतात, "भल्लालदेवनं सत्ताधारी म्हणून शपथ घेतली होती. पण जनतेच्या मनातील 'राजा' बाहुबलीच होता, हे दसरा मेळाव्यानंतर शिवसैनिकांनी कृष्णकुंज बाहेर गर्दी करुन दाखवून दिले आहेच." ते पुढे विचारतात,
"6 सैनिकांना पोलीस संरक्षणात तोंड लपवत फिरावं लागत आहे, ते कशासाठी?"
मात्र, 'मराठी जल्लोष' या ट्विटर अकाऊंटनं, "फेसबुकचा नाद लय वाईट!" असं राज ठाकरे हॅशटॅगसह ट्विट करून राज यांच्या फेसबुकवर व्यंगचित्र काढण्यासाठी दिलेल्या वेळेवर निशाणा साधला आहे.
तसंच, दीपू तिवारी आणि गणेश भय्या यांनी देखील एकसारखंच ट्वीट करून राज यांच्या व्यंगचित्राच्या नव्या उपक्रमावर बोट ठेवलं आहे.
गणेश भय्या यांनी राज ठाकरे हॅशटॅग लिहून, "थांब जरा दाखवतो यांना! व्यंगचित्र काढतो आणि फेसबुकवर टाकतो" असं 'मार्मिक' ट्वीट केलं आहे.
भाग्यश्री पाटोळे जगताप यांनी मात्र याप्रकरणाला घरातली अंतर्गत गटबाजी असं म्हटलं आहे. त्या पुढं म्हणतात," ही माणसं वायफळ बडबड तेवढी करतात. यांची अशीच वागणूक कायम राहिली, तर यांच्याकडून काहीही होणार नाही."
मिलिंद कांबळे चिंचवळकर यांनी त्यांच्या प्रतिक्रियेद्वारे अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, "मुंबई महापालिकेतील शिवसेनेची सत्ता अबाधित राखण्यासाठी राज ठाकरे यांनी उद्धव यांना राजकीय भेट दिली असावी."
विराज चुरी यांनी मात्र हे सर्व प्रकरण म्हणजे नाटक असल्याचं म्हटलं आहे.
जी गोष्ट किरीट सोमय्यांना सकाळीच माहिती असते ती राज यांना कळायला दुपार कशी होते, असा प्रश्न विचारत त्यांनी 'ये पब्लिक है सब जानती है' असं म्हटलं आहे.
सिद्धार्थ ढगे यांनी मनसेला 'दुष्काळी पार्टी' म्हणून संबोधलं आहे, तर महारुद्र शेट्टे यांनी मनसेला शिवसेनेत विलीनीकरण करण्याचा सल्ला दिला आहे.
"राज ठाकरे हे विचारांवर राजकारण करणारे व्यक्तिमत्त्व असून भ्रष्टाचाराच्या विरोधात सातत्यानं काम करतात," असं रवींद्र धात्रक यांनी म्हटलं आहे.
शशिकांत दाबाडे यांनी फेसबुक प्रतिक्रियेत 'नामशेष होणारी पार्टी' असा मनसेचा उल्लेख केला आहे.
अक्षय सावणे यांनी मात्र फेसबुकवरच्या प्रतिक्रियेत ठाकरे या आडनावावर कोटी करत टोला हाणला आहे.
अतुल कोठारेंनी, "यामधली काही कारणं खरी असू शकतात, तर काही थापेबाजी. परंतु, या चुकांमधून अभ्यास झाला आहे."
असं मत मांडून नगरसेवक पक्ष सोडून जाण्याच्या खऱ्या मुद्द्यावर तसंच पक्षाच्या चुकांवर बोट ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
अनेकांनी शिवसेनेनं उचलेल्या या पावलावर टीका केली आहे. तर, बऱ्याच जणांनी राज ठाकरेंनी आता तरी पक्ष संघटनेबाबत विचार करण्याची वेळ आल्याचं मत व्यक्त केलं आहे.
काहींनी राज ठाकरे यांनी व्यंगचित्र काढण्यावर लक्ष केंद्रित केलं मात्र पक्षात काय चाललं आहे, याकडे लक्ष दिलं नाही, असं म्हटलं आहे.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)