You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जयपूर एक्सप्रेस :गोळीबार करणाऱ्या चेतन सिंहविरोधात FIR, सहकाऱ्याने सांगितला घटनाक्रम
जयपूर - मुंबई सुपरफास्ट पॅसेंजरमध्ये काल (31 जुलै) सकाळी पालघरच्या जवळ गोळीबाराची घटना घडली आहे. या गोळीबारात आरपीएफ जवानासह चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबार करणाऱ्या आरपीएफ जवानाला जीआरपीने अटक केली आहे. B-4, B-5 आणि S-6 या डब्यात हा प्रकार घडला.
या प्रकरणी आरोपीला आरपीएफ शिपाई चेतन सिंह याला अटक केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चेतन याचे सहकारी आरपीएफ शिपाई अमन घनश्याम आचार्य यांच्या जबाबानुसार बोरीवली जीआरपीने आरोपी चेतन सिंहवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यांनी आपल्या माहितीत म्हटलं आहे की, 30 जुलैला मी आणि माझे साथीदार (टिकाराम मीना, नरेंद्र परमार, पोशि चेतम सिंह) मुंबई सेंट्रलमधून सौराष्ट्र मेल ट्रेनने निघालो. ही ट्रेन रात्री सुरतला पोहोचली. तिथून आम्ही जयपूर एक्सप्रेसने मुंबईला यायला निघालो.
या प्रवासादरम्यान आपली तब्येत बिघडली असून आपल्याला वलसाड इथे उतरु द्यावं, असं आरोपी चेतन सिंह हा ASI टिकाराम मीणा यांना सांगत होता, असं अमन आचार्य यांनी आपल्या जबाबात म्हटलं.
आपण त्याच्या अंगाला हात लावून ताप आहे का हे पाहिल्याचंही अमन यांनी सांगितलं.
“टिकाराम मिना यांनी त्याला दोन-तीन तासांचीच ड्युटी आहे, मुंबईला पोहोचल्यावर आराम कर सं समजावलं. मात्र तो ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता. आपल्याला कंट्रोल रुमशीच बोलायचं आहे, असा हट्ट धरला. त्यामुळे टिकाराम यांनी त्याचं बोलणं असिस्टन्ट सिक्युरिटी कमिशनर सुजीत कुमार पांडे यांच्याशी करवून दिलं. त्यांनीही चेतनला समजावून सांगितलं. पण तो ऐकत नव्हता.”
आचार्य यांनी चेतन सिंहला B/4 या बोगीमध्ये नेलं. तिथे जाऊन एका रिकाम्या सीटवर झोपवलं. मात्र, तो जास्त वेळ झोपला नाही.
“10-15 मिनिटांनी तो उठला आणि रायफल मागू लागला. मी त्याला रायफल दिली नाही, तेव्हा तो माझा गळा दाबू लागला आणि माझ्या हातातून रायफल काढून निघून गेला.”
त्यानंतर आचार्य हे पॅन्ट्री कारमध्ये गेले. ते तिथे असताना 31जुलै सकाळचे पाच वाजले होते. साडे पाचच्या दरम्यान ट्रेन वैतरणा रेल्वे स्टेशनजवळ आली असताना, आचार्य यांना नालासोपारा इथून आरपीएफमधील सहकारी कुलदीप राठोड यांचा फोन आला आणि टिकाराम मिना यांच्यावर गोळीबार झाल्याचं सांगितलं.
“मी धावत त्या दिशेने जात होतो, तेव्हा मला तिकडून दोन-तीन पॅसेंजर येताना दिसले. ते पण घाबरले होते. मी b/1कोचपाशी असताना चेतन सिंह येताना दिसला. त्याच्या हातात रायफल होती. तो माझ्यावरही गोळी झाडू शकतो, या विचाराने मी स्लिपर कोचमध्ये गेलो. दहा मिनिटांनी कोणीतरी साखळी ओढली आणि ट्रेन थांबली.
ट्रेन मीरारोड-दहिसर दरम्यान थांबली होती. पंधरा मिनिटांनी ट्रेन पुन्हा सुरू झाली. मी S/6 क्रमांकाच्या बोगीमध्ये आलो. तिथे एक पॅसेंजर रक्तबंबाळ अवस्थेत पडला होता. पॅन्ट्री कारमध्येही एक प्रवासी रक्तबंबाळ झाला होता.
या घटनेनंतर 31 जुलैला घेतलेल्या पत्रकार परिषदेत रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिलेल्या माहितीनुसार, "चेतन सिंह यांनी त्यांचे वरिष्ठ अधिकारी एएसआय टीकाराम मीणा आणि इतर तीन पॅसेंजरवर गोळीबार केला. या घटनेत एकूण चार जणांचा मृत्यू झाला.
"त्यानंतर एका पॅसेंजरनं गाडीची चैन ओढली. त्यानंतर आरोपीनं गाडीतून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मीरा रोड स्टेशनवरील जीआयपीचे पोलीस होते, त्यांनी धाडसानं पकडलं. ताब्यात असलेल्या चेतन सिंह याची चौकशी सुरू आहे. तसंच, प्रवाशांकडेही चौकशी करत आहोत. घटनेबद्दल गुन्हा दाखल होऊन सखोल चौकशी होईल."
चौकशी पूर्ण होईपर्यंत निश्चित माहिती देणं चुकीचं ठरेल, त्यामुळे चौकशी पूर्ण झाल्यावरच सर्व माहिती दिली जाईल, असंही डॉ. शिसवेंनी सांगितलं.
नेमकं काय झालं?
जयपूर- मुंबई (गाडी क्र 12956) ही आज (31 जुलै) सकाळी मुंबई सेंट्रलच्या दिशेने जात होती. त्यावेळी गाडीत चेतन कुमार हा जवान ड्युटीवर होता. त्याने त्याचा सहकारी टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला. त्यात चार लोकांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती देताना पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी म्हणाले, “चेतन कुमार हा आरपीएफ जवान ड्युटीवर होता. त्याने त्याचा सहकारी टीकाराम मीणा यांच्यावर गोळीबार केला.
या गोळीबारात आणखी 3 सहप्रवाशांचाही मृत्यू झाला आहे. नंतर त्याने चेन ओढली आणि दहीसर आणि मीरा रोडच्या मध्ये उतरला. त्याला भाईंदरच्या आरपीएफ टीमने अटक केली. त्याची चौकशी सुरू आहे. मृत पावलेल्या तीन नागरिकांची ओळख पटवण्याचं कामही सुरू आहे.”
या घटनेची अधिक माहिती घेण्याचे काम सुरू असल्याचं ते पुढे म्हणाले. या घटनेने एकच खळबळ उडाली. घटनेनंतर ठिकठिकाणी गोळ्या झाडल्याच्या खुणा दिसून येत आहेत.
दहिसर स्टेशनजवळ हा प्रकार लक्षात आला. त्यानंतर प्रवाश्यांनी आरडाओरडा केल्यानंतर आरोपीने पळ काढला.
रेल्वेतील गोळीबाराची जबाबदारी भागवत-मोदी-शहा यांचीच - यशमोती ठाकूर
काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर म्हणाल्या की, "रेल्वे पोलीस दलात कार्यरत असलेल्या एका मोदीभक्त जवानाने द्वेषापोटी चार लोकांचे खून केले. हा अतिरेकी हल्ला आहे. RSS-BJP ने देशात जे विष पेरलंय त्याचे परिणाम आपल्याला जागोजागी दिसत आहेत. या संपूर्ण घटनेची जबाबदारी मोदी-शहा-भागवत आणि देशातील माध्यमांची आहे. आज देशात दिवस-रात्र हिंदू-मुस्लीम द्वेषाचा अजेंडा पेरला जात आहे."
"देशातील तरूणांनी हा डाव ओळखला पाहिजे. माझी सर्वांना हात जोडून विनंती आहे की, सोशल मिडीया आणि Whatsapp वर येणाऱ्या पोस्ट या IT Cell कडून जाणीवपूर्वक पसरवल्या जातात, त्यांना बळी पडू नका. स्वतःची माथी ठिकाणावर ठेवा, भडकू देऊ नका," असंही त्या म्हणाल्या.
घटनेवर राजकीय नेत्यांकडून भाष्य
जयपूर एक्स्प्रेसमधील गोळीबाराच्या घटनेबाबत आता राजकीय नेत्यांकडून आरोप केले जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी ट्वीट करून गोळीबारावर प्रश्न उपस्थित केले आहेत.
असदुद्दीन ओवेसी यांनी एका ट्वीटला प्रतिक्रिया देत म्हटलंय की, "मुस्लिमांना टार्गेट करून केलेला हा दहशतवादी हल्ला आहे. हे सातत्यपूर्ण पसरवलेल्या मुस्लीमविरोधी द्वेषपूर्ण वक्तव्यांचा आणि पंतप्रधान मोदींना हे सर्व थांबवण्याची इच्छा नसल्याचे परिणाम आहेत. गोळीबार करणारा आरपीएफ जवान भाजपचा निवडणुकीतला उमेदवार असेल का? भाजप सरकार त्याच्या जामिनासाठी समर्थन देईल का? त्याचा सत्कार केला जाईल का? मी या प्रश्नांबाबत चुकीचा ठरो."
तसंच, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही जयपूर एक्स्प्रेसमधील घटनेचा व्हीडिओ शेअर करत म्हटलंय की, "हा देश कुठे चाललाय? काय पेरलं आणि काय उगवतयं? हा देश महात्मा गांधींचा-गौतम बुद्धांचा-छत्रपती शिवरायांचा होता."
तसंच, जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले की, "त्या व्यक्तीने पहिल्यांदा आपल्या वरिष्ठ अधिका-यांना B5 मध्ये मारले. तिथेच त्याने अजून एक प्रवाशाला B5 मध्येच मारले. नंतर पुढे जाऊन त्याने पँट्रीकारमध्ये एका प्रवाशाला मारले. तसाच तो पुढे गेला आणि S6 ला अजून एका प्रवाशाला मारले. त्यांचे पेहराव आणि त्यांच्या एकंदर दिसण्यावरुन ते कोण होते हे ओळखू शकल्यामुळे त्यांनी या हत्या केल्या. आणि म्हणे तो मानसिक रुग्ण आहे. हे जगाला मानसिक रुग्ण बनवायला निघाले आहेत. खोटं बोला पण, ते पटेल असे तर बोला."
भांडणातून हा प्रकार झाल्याचा संशय
या घटनेनंतर प्रसारमाध्यमांनी मृतांच्या नातेवाईकांशी बोलण्याचा प्रयत्न केला. नातेवाईकांनाही अद्याप संपूर्ण माहिती मिळालेली नाही. एक प्रवासी मोहरमचा कार्यक्रम आटोपून मुंबईला परत येत असल्याचं सांगण्यात आलं आहे. प्रशासनाने फोन करून नातेवाईकांना बोलावलं, प्रसारमाध्यमांशी बोलताना तेही गोंधळलेल्या अवस्थेत दिसत होते.
ही घटना भांडणातून झाल्याच्या बातम्याही आल्या होत्या. मात्र त्याबाबत ठोस माहिती मिळालेली नाही. सर्व बाजूंनी या घटनेचा तपास करण्यात येत असल्याचं सांगण्यात येत आहे.
पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक नीरज वर्मा यांनीही या घटनेबाबत माहिती दिली. ते म्हणाले, “ ही घटना अत्यंत दु:खद आहे. आम्ही याबाबत तिथे उपस्थित असलेल्या सर्व लोकांशी बोलून संपूर्ण माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहोत. RPF हवालदार आणि ASI या दोघांमध्ये वादविवाद झाल्याची कोणतीही माहिती आमच्याकडे आलेली नाही.”
पश्चिम रेल्वेचे पोलीस आयुक्त म्हणाले, “त्या जवानाची तब्येत ठीक नव्हती. त्याचा स्वत:चा वरचा ताबा सुटला आणि त्याने गोळी झाडली. तिथे कोणताही वाद झाला नाही.
फॉरेन्सिक टीम घटनास्थळावर पोहोचली असून ते अधिक तपास करत आहेत.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)