You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उत्तरकाशी बोगदा दुर्घटना : मजुरांचा पहिला व्हीडिओ जारी, गरम जेवणही पाठवलं
उत्तरकाशीमधील सिलक्याला बोगद्यातून मजुरांचा बचाव करण्याचे प्रयत्न अखंड सुरू आहे. आज या बचावकार्याचा (21 नोव्हेंबर) दहावा दिवस आहे.
या मजुरांपर्यंत एक इंडोस्कोपी कॅमेरा पोहोचवण्यात बाचव यंत्रणांना यश आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने त्यासंदर्भातला एक व्हीडिओ जारी केला आहे.
सहा इंच व्यासाचा एक पाईप या मजुरांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. त्याच्यामाध्यमातूनच या मजुरांना अन्नपाणी पोहोचवण्यात येत आहे.
पाईपलाईनमधून जेवण घेत असल्याचं या कॅमेऱ्यातून दिसत आहे. हे मजूर एकमेकांशी बोलतानाही दिसत आहेत. त्यांच्या कुटुंबियांना आश्वस्त करण्यासाठी या व्हीडिओचा उपयोग होऊ शकतो.
NHIDCL चे संचालक अंशू मनीष खालखो म्हणाले की, “आम्ही 53 मीटरचा पाईप बोगद्यात अडकलेल्या मजुरांपर्यंत पाठवला आहे. हे एक पहिलं मोठं यश आहे. पुढचं पाऊल जास्त महत्त्वाचं आहे.
याच सहा इंच व्यासाच्या पाईपच्या माध्यमातून हा कॅमेरा मजुरांपर्यंत पोहोचवण्यात आला आहे. साधारण हे अंतर 24 मीटर असल्याचं सांगितलं जात आहे.
व्हीडिओत हे मजूर एका ओळीत उभे असल्याचं दिसून येत आहे.
पहिल्यांदा पाठवलं गेलं गरम जेवण
ANI ने दिलेल्या माहितीनुसार मजुरांना 53 मीटर लांब आणि सहा इंच जाड पाईपच्या सहाय्याने गरम खिचडी पाठवण्यात आली आहे.
सुरंगाच्या एका भागात वीज आणि पाणी उपलब्ध आहे. चार इंचाच्या एका कॉम्प्रेसर पाईपच्या सहाय्याने मजुरांना ऑक्सिजन, खाण्यापिण्याच्या वस्तू आणि औषधं पाठवली जात आहेत.
आता नवीन पाईपच्या सहाय्याने आत फसलेल्या लोकाना खाण्यासाठी काय पाठवलं जाईल याबद्दल बोलताना खालखो म्हणाले की मजुरांची अवस्था पाहता डॉक्टरांच्या मदतीने एक यादी तयार करण्यात आली आहे.
ते म्हणाले, “आम्ही तोंड उघडं असलेल्या प्लास्टिकच्या गोल बाटल्या घेऊन जात आहोत. त्यातून केळी, सफरचंद, खिचडी आणि सांजा आत पाठवू शकू.”
याच बाटल्यांमधून खिचडीही पाठवली गेली. खिचडी तयार करणाऱ्या कूक हेमंत यांनी सांगितलं की मजुरांसाठी गरम जेवण पाठवलं आहे. जे आम्हाला बनवायला सांगितलं आहे तेच आम्ही करबून देत आहोत.
'कामागारांशी संवाद शक्य, औषधं-जेवणही पोहोचू शकतं'
राष्ट्रीय महामार्ग आणि एनएचआयडीसीएलचे संचालक अंशु एम खलखो यांनी अधिक माहिती देताना सोमवारी सांगितलं,
"आम्ही पहिलं यश मिळवलं आहे. गेल्या नऊ दिवसांपासून आम्ही प्रयत्न करत होतो आणि यालाच आमचं प्राधान्य होतं. सर्व आवश्यक उपकरणं गोळा केली असून, पुढच्या दोन दिवसात इथे पोहोचतील."
"बीआरओ उत्तरकाशी आणि बारकोटकडून रस्ते बनवत आहे. मशीन्स वजनदार आहेत. त्यांना हवाई मार्गाने आणली जाऊ शकत नाही. रस्तेमार्गांनीच आणावी लागतील. आता आम्ही त्या मशीन्सची वाट पाहतोय."
य बाचवकार्यात खालील पाच संस्था एकत्र येऊन हे काम करत आहेत.
- ऑईल अँड नॅचरल गॅस कोऑपरेशन (ONGC)
- सतलज जल विद्युत निगम
- रेल विकास निगम लिमिटेड
- नॅशनल हायवे ऍन्ड इंफ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (NHIDCL)
- टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (THDCL)
ज्या भागात मजूर अडकले आहेत तो भाग 8.5 मी उंच आणि 2 किमी लांब आहे.
सतलज जल विद्युत निगम लिमिटेडकडून वरच्या भागातून ड्रिलिंग केलं जाणार आहे. त्यासाठी मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. या मशीन्स रेल्वेमार्फत हलवल्या जाणार असून गुजरात आणि ओडिशा राज्यातून या मशीन्स येणार आहेत.
ONGC संस्था सुद्धा खोलवर ड्रिलिंग करण्यात तज्ज्ञ आहे. तेही या कामात सहभागी होतील.
पंतप्रधानांचं बारीक लक्ष
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांना फोन करून बचाव कार्याची माहिती घेतली आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या मदतीने या मजुरांना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. मुख्यमंत्री धामी यांनीही सद्यस्थितीची माहिती घेतली. आतापर्यंत तीन वेळा मोदी यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
सर्व मजूर आत सुरक्षित असल्याची माहिती मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)