You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दिल्लीत रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्यांना लाथ मारणारा पोलीस निलंबित
रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांना लाथा मारणाऱ्या पोलिस सब इन्सपेक्टरचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकांचा संताप समोर आला आहे.
दिल्लीच्या इंद्रलोक परिसरात घडलेल्या या घटनेनंतर मेट्रो स्टेशनच्या जवळ लोकांनी निदर्शनं केली.
घटनास्थळी उपस्थित बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांनी आता निदर्शनं हळूहळू थांबत असल्याची माहिती दिली.
दिल्ली पोलिसांनी घटनेसाठी जबाबदार पोलिस सब इन्सपेक्टर मनोज तोमर यांना तत्काळ निलंबित केलं आहे.
दिल्ली पोलिसांनी बीबीसी प्रतिनिधी दिलनवाज पाशा यांच्याशी बोलताना याबाबत माहिती दिली. या घटनेशी संबंधित पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात विभागीय चाचणी सुरू केल्याचंही त्यांनी सांगितलं. त्यांना तत्काळ निलंबित करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं.
उत्तर दिल्लीचे डीसीपी मनोज कुमार मीणा यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना याबाबत माहिती दिली.
"व्हीडिओ समोर आला होता. तो व्हायरल व्हीडिओ होता. त्या व्हीडिओमध्ये दिसणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याच्या विरोधात कारवाई करण्यात आली आहे. पोलिस पोस्टच्या इन्चार्जला निलंबित करण्यात आलं आहे."
"संबंधितावर शिस्तभंगाची कारवाई केली जात आहे. आता परिस्थिती नियंत्रणात आहे. आम्ही स्थानिक लोकांच्या साथीनं परिसरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी संदेश पोहोचवला आहे. याठिकाणाहून बहुतांश लोक गेले आहेत. त्यामुळं वाहतूक मोकळी झाली आहे."
इंटरनेटवर व्हायरल झालेल्या या व्हीडिओमध्ये दिल्ली पोलिसांचे एक उपनिरीक्षक रस्त्यावर नमाज पठण करणाऱ्या लोकांबरोबर गैरवर्तन करताना दिसत आहेत.
व्हीडिओमध्ये दिसणारा पोलिस कर्मचारी नमाजा दरम्यान, लोकांना लाथ मारताना दिसत आहेत.
त्यानंतर काही लोक पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालताना दिसत आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लोक या घटनेचा निषेध करत आहेत. दोषींच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी होताना दिसत आहे.
"नमाज पठण करणाऱ्या व्यक्तीला लाथ मारणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या या जवानाला कदाचित माणुसकीचा मूळ नियम माहिती नाही. या जवानाच्या मनात हा कसला द्वेष भरला आहे. या कर्मचाऱ्याच्या विरोधात योग्य कलमान्वये खटला दाखल करून त्याला बडतर्फ करावं अशी दिल्ली पोलिसांना विनंती आहे," अशी पोस्ट राज्यसभा खासदार इम्रान प्रतापगढी यांनी केली.
काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांनीही एक्सवर प्रतिक्रिया दिली.
"अमित शाह यांच्या दिल्ली पोलिसांचं घोषवाक्य 'शांती सेवा न्याय' असं आहे. ते पूर्ण मन लावून काम करत आहेत," असं त्यांनी म्हटलं आहे.
मिस्टर हक नावाच्या एका यूझरनं कावडियांवर फुलं उधळणाऱ्या पोलिसांचा एक व्हीडिओ पोस्ट केला.
"दोन भारत. दिल्लीच्या इंद्रलोक परिसरात नमाज पठण करणाऱ्यांना दिल्ली पोलिसांनी लाथ मारली आहे. तर पोलिस कावडियांचं भर रस्त्यात फुलांनी स्वागत करत आहेत."
जीनल एन गाला यांनी असं लिहिलं की, "दिल्ली पोलिसांची रस्त्यावर थेट हुकूमशाही सुरू आहे. दिल्ली पोलिस एवढे असंवेदनशील आहेत का? ते मुस्लिमांबरोबर जे वर्तन करत आहेत, तसं ते दुसऱ्या धार्मिक गटाबरोबर करू शकतात का?"
अशोक कुमार पांडेय यांनी नमाज पठण करणाऱ्या तरुणाला लाथ मारणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्याचा व्हीडिओ पोस्ट करत प्रतिक्रिया दिली.
"मी थोडा वेळा धक्क्यात होतो. अशा नीचपणाची अपेक्षा मला नव्हती. जगभरात हा व्हीडिओ गेल्यानंतर आपल्या देशाची कशी प्रतिमा तयार होईल, याचा मला विचार येत आहे."
रसत्यावर नमाज पठणावरून वाद जुनेच
रस्त्यावर नमाज पठणाच्या मुद्द्यावरून वादाच्या बातम्या काही दिवसांपासून येत आहेत. गुरुग्राममध्ये रसत्यावर नमाज करणारे लोक आणि पोलिसांमध्ये संघर्षही झाला होता.
गुरुग्राममध्ये गेल्यावर्षी रस्त्यावर नमाज पठणावरून झालेल्या वादानंतर संतप्त जमावानं एका मशिदीवर हल्ला करून आग लावली होती. त्यात एका 26 वर्षीय इमामांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दक्षिण हरियाणामध्ये हिंसाचार भडकला होता आणि त्यात पाच जणांचा मृत्यू झाला होता.
रस्त्यावर नमाजाच्या विरोधातील आंदोलनं 2018 मध्ये सुरू झाली होती. नंतर झालेल्या चर्चांच्या अखेरीस मुस्लीम समुहानं रस्त्यावरील नमाजच्या ठिकाणांची संख्या 108 हून 37 वर आणण्यास होकार दर्शवला होता.
ही आंदोलनं का सुरू झाली होती, हे अद्याप स्पष्ट नाही. वादानंतर आता मुस्लिमांच्या रस्त्यावरील नमाजांच्या ठिकाणांची संख्या 20 वर आणली आहे.
राजकीय इस्लामवर संशोधन करणारे हिलाल अहमद यांनी बीबीसीबरोबर यासंदर्भात चर्चा केली. "हा कट्टर समूह एका नागरी समस्येचा वापर धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी करत आहे. मुस्लिमांनी मशिदीत जाऊन नमाज पठण करावं असं ते सांगत आहेत. पण मशिदींची संख्याच पुरेशी नाही, ही मूळ समस्या आहे."
त्यांच्या मते, गुरुग्राममध्ये फक्त 13 मशिदी असून त्यापैकी एकच शहराच्या नव्या भागात आहे. शहरात बहुतांश बाहेरचे लोक याच भागात राहतात आणि काम करतात.
मुस्लिमांच्या मालमत्ता सांभाळणाऱ्या वक्फ बोर्डाचे स्थानिक सदस्य जमालुद्दीन यांनी बोर्डाच्या बहुतांश जमिनी शहराच्या बाह्य भागात असून तिथं मुस्लिम लोकसंख्या अत्यंत कमी असल्याचं सांगितलं.
पुरेसे नमाजी नसल्यानं अशा परिसरांतील 19 मशिदी बंद कराव्या लागल्या असं ते म्हणाले. गुरुग्राममध्ये महागड्या परिसरात मशिदी खरेदी करण्याएवढा पैसा बोर्डाकडं नसल्याचं त्यांनी सांगितलं.