पेरणीसाठी जमिनीत किती ओल असली पाहिजे? पेरणीसाठी सर्वांत योग्य वेळ कोणती?

- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राज्यभरातील शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागतीची कामं पूर्ण झाली आहेत. शेतकरी आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
महाराष्ट्रात मान्सूनचं आगमन होऊन 5 दिवस उलटले आहेत. तरीही म्हणावा तसा पाऊस न पडल्यानं खरिप हंगामातील पेरणी रखडली आहे.
या पार्श्वभूमीवर, शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई करू नये, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
पण, महाराष्ट्राभर पाऊस नेमका कधी पडणार? मान्सूनची प्रगती वेगानं का होत नाहीये? शेतकऱ्यांनी पेरणी नेमकी कधी करावी? पेरणीआधी नेमक्या कोणत्या बाबींची काळजी घ्यावी? या प्रश्नांची उत्तरं आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत.
बिपरजॉय चक्रीवादळाचा मान्सूनवर परिणाम
अरबी समुद्रात तयार झालेलं बिपरजॉय चक्रीवादळ 15 जून रोजी गुजरातमधील किनारपट्टीला धडकलं आहे.
या बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवास संथगतीने होत असल्याची हवामान विभागानं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात 11 जूनला मान्सून दाखल झाला. पण, त्यानंतर त्याच्या प्रवासात फार प्रगती झालेली नाही.
पुणे वेधशाळेचे प्रमुख के. एस. होसाळीकर ट्विट केलंय की, “18 ते 21 जूनदरम्यान मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल.”
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
मान्सूनच्या प्रगतीविषयी बोलताना हवामान तज्ज्ञ डॉ. रामचंद्र साबळे यांनी बीबीसी मराठीला सांगितलं की, “ज्याप्रमाणे मान्सूनची प्रगती व्हायला पाहिजे होती, तशी ती झालेली नाहीये. त्यामुळे पावसात मोठा खंड चालू आहे, असं म्हणायला हरकत नाही.
"ज्यावेळी पावसात असे मोठे खंड पडतात, तेव्हा अवर्षणाची परिस्थिती निर्माण होत असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसात खंड असल्यावर पेरणी करू नये.”
पेरणी नेमकी कधी करावी?
पाऊस पडला की बहुसंख्य शेतकरी पेरणीस सुरुवात करतील. पण, शेतकऱ्यांनी पाऊस नेमका किती पडला, हे तपासून पेरणी करणं गरेजचं आहे.
शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये. जमिनीत चांगली ओल निर्माण झाल्यासच पेरणी करावी, असं आवाहन कृषी विभागानं केलं आहे.
कृषी सहसंचालक तुकाराम मोटे बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले की, “दोन ते तीन दिवस सतत पाऊस पडल्यास आणि 75 ते 100 मिलीमीटर पाऊस झाल्यास शेतकऱ्यांनी पेरणी करावी.
"कारण, इतक्या प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार होत असतो. त्याआधी पेरणी करण्याची घाई शेतकऱ्यांनी करू नये."

फोटो स्रोत, Getty Images
पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथील मृद व जलसंधारण अभियांत्रिकी विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सुभाष टाले सांगतात, "जमिनीत भरपूर ओल आल्याशिवाय पेरणी करू नये. पाऊस जमिनीत चांगला मुरू द्यायला पाहिजे. दोन-तीन पाऊस चांगले होऊ द्यायचे आणि मगच पेरणी करायची. स्थानपरत्वे आपल्या अनुभवानुसार शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा.”
तर डॉ. रामचंद्र साबळे यांच्या मते, “जमिनीत दोन ते अडीच फुटापर्यंत खोल माती ओली असली पाहिजे. तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणी करावी. नाहीतर पावसानं पुन्हा उघडीप दिली, तर दुबार पेरणीचं संकट ओढवू शकतं.”
पेरणीच्या आधी काय करावं?
पेरणी करण्याआधीच आपण जे बियाणं पेरणार आहोत, त्या बियाण्यांची उगवण क्षमता शेतकऱ्यांनी तपासून पाहायला हवी.
म्हणजे एखाद्या बियाण्यामध्ये उगवून येण्याची किती क्षमता आहे, ते तपासायला हवं.
यासाठीची सगळ्यात सोपी पद्धत आहे ती गोणपाट पद्धत. या पद्धतीत शेतकरी स्वत: पोत्यावर बियाणे ठेवून त्यांची उगवण क्षमता तपासू शकतात.
ती कशी तपासायची त्याची सविस्तर माहिती तुम्ही पुढे दिलेल्या व्हीडिओत पाहू शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 1
याशिवाय, पिकांवर येणारे संभाव्य कीड, रोग याचा बंदोबस्त करणारी उपाययोजना म्हणजे बीज प्रक्रिया.
त्यामुळे पेरणीआधी बीज प्रक्रिया करुन घ्या, असं आवाहन कृषी विभागाकडून केलं जातं.
बीज प्रक्रिया केल्यामुळे पिकांवर मर, करपा असे संभाव्य रोग येत नाहीत. खोडमाशी, खोडकिडी सारख्या किडी येत नाहीत.
पण, बीज प्रक्रिया नेमकी कशी करायची, ते जाणून घेण्यासाठी पुढील व्हीडिओ पाहू शकता.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त, 2
महाराष्ट्रात पेरणी कधीपर्यंत करता येते?
पेरणी कधीपर्यंत करता येऊ शकते, हे पूर्णपणे पावसावर अवलंबून असल्याचं कृषी विभागातील अधिकारी सांगतात.
याविषयी अधिक माहिती देताना डॉ. सुभाष टाले सांगतात, “कपाशीची पेरणी 15 जुलै नंतर चालत नाही. सोयाबीन, तुरीच्या पेरणीला थोडा उशीर चालू शकतो. पण, ज्यांना सोयाबीनची काढणी केल्यानंतर त्या जमिनीवर हरभरा पेरायचा आहे, त्यांना मात्र सोयाबीनची पेरणी करण्यासाठी उशीर चालत नाही.
"सामान्यपणे कपाशी सोडली, तर जून संपेपर्यंत इतर सगळ्या पिकांच्या पेरण्या होणं आवश्यक आहे.”

फोटो स्रोत, Getty Images
महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथील ग्रामीण कृषी हवामान सल्ला सेवा केंद्राचे सहयोगी प्राध्यापक डॉ. रवी आंधळे सांगतात, "विद्यापाठीच्या शिफारसीनुसार खरिप हंगामात वेगवेगळ्या पिकांसाठी 7 जून ते 15 जुलैपर्यंत पेरणी करता येते. पण, काही पिकांच्या बाबतीत उदा. बाजरीसारख्या पिकांच्या बाबतीत पेरणी 15 जुलैच्या पुढे गेल्यास उत्पादनात घट होऊ शकते. सोयाबीन, बाजरी, तूर या पिकांच्या बाबतीत पेरणी 7 जून ते 15 जुलैपर्यंत करता येते."
जून महिन्याच्या शेवटापर्यंत पावसाचं नेमकं चित्र स्पष्ट होईल. पण, जिथं 100 मिलीमीटर पाऊस पडेल, जमिनीत ओल असेल, तिथं शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय घ्यायला हरकत नाही, असंही आंधळे पुढे सांगतात.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








