You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
एकनाथ शिंदे हजेरी लावण्यासाठी गेलेत तो ‘वीर बाल दिन’ कार्यक्रम नेमका काय आहे? शीख त्यावर नाराज का आहेत?
भारत सरकार 26 डिसेंबरला दिल्लीसह देश-परदेशात ‘वीर बाल दिन’ साजरा करत आहे. गुरू गोविंद सिंहांच्या बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह या दोन मुलांच्या तसंच माता गुजरी यांच्या शौर्य आणि बलिदानाच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जात आहे.
या कार्यक्रमाला स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार नरेंद्र मोदी 26 डिसेंबर 2022 ला दुपारी 12:30 वाजता दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियममध्ये आयोजित कार्यक्रमात सहभागी होतील.
यावेळी जवळपास तीनशे बाल कीर्तनकार ‘शब्द कीर्तन’ कार्यक्रमात सहभागी होतील. पंतप्रधानही या कीर्तनात भाग घेतील.
सांस्कृतिक मंत्रालयाने या निमित्ताने एका विशेष डिजिटल प्रदर्शनाचंही आयोजन केलं आहे.
या कार्यक्रमाला महाराष्ट्र आणि पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना विशेष आमंत्रण देण्यात आलं आहे. शिखबहुल राज्य म्हणून पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. तर गुरु गोविंद सिंग यांचं प्रमुख स्थान नांदेडमध्ये असल्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवी दिल्लीतल्या या कार्यक्रमात उपस्थित आहेत.
मात्र, शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीने 'वीर बाल दिन' या नावावर आक्षेप घेतला आहे.
शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे सदस्य गुरबचन सिंह ग्रेवाल यांनी 25 डिसेंबरला संध्याकाळी माध्यमांशी बोलताना म्हटलं, “मोदी सरकारने 26 डिसेंबरला ‘वीर बाल दिन’ साजरा करणार असल्याचं जाहीर केलं. शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधन कमिटीने पत्र पाठवून यावर आक्षेप घेतला आहे.”
“जेव्हा तुम्ही ‘वीर बाल दिन’ म्हणता तेव्हा त्या मुलांच्या नावांचा आणि बलिदानाचा उल्लेख येत नसल्याचं शिरोमणि कमिटीने म्हटलं होतं. त्यामुळे यामध्ये गुरू गोविंदसिंगजींच्या मुलांची नावं आणि शहीद हा शब्द जोडण्याची मागणी आम्ही केली होती. सरकारनेही त्यासंबंधीचे संकेत दिले होते, तसं केलं मात्र नाही.” ग्रेवाल यांनी म्हटलं, “शिरोमणि कमिटीने आपला निषेध व्यक्त केला आहे, मात्र सध्या भाजपसोबत असलेल्या दिल्ली गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या सदस्यांनी यावर कोणतीही भूमिका घेतली नाही. सगळं माहीत असूनही त्यांनी असं करणं हे अत्यंत दुःखद आहे.”
‘शीख धर्माच्या अंतर्गत बाबीमध्ये हस्तक्षेप’
केंद्र सरकारने छोट्या साहेबजाद्यांच्या वीरमरणाचा दिवस हा ‘वीर बाल दिन’ घोषित केला होता. त्यानंतर वाद सुरू झाला.
काही शीख विद्वानांनी हा शीख धर्माच्या अंतगर्त बाबीमध्ये हस्तक्षेप असल्याचं म्हटलं होतं. त्यांनी हा निर्णय मागे घेण्याचीही मागणी केली होती.
एक ट्वीट करून पंतप्रधानांनी ही माहिती दिली होती.
त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं होतं, “आज श्री गुरु गोविंद सिंह यांच्या ‘प्रकाश पर्वा’च्या शुभ प्रसंगी ही घोषणा करताना मला आनंद होत आहे की, या वर्षापासून 26 डिसेंबर हा 'वीर बाल दिवस' म्हणून साजरा केला जाईल. ही त्या वीरबालकांच्या शौर्य आणि न्यायाप्रति असलेल्या निष्ठेला योग्य अशी श्रद्धांजली असेल.
त्यांनी पुढे म्हटलं, “ज्यादिवशी जोरावर सिंह जी आणि फतेह सिंह जी यांना वीरमरण प्राप्त झालं, त्याच दिवशी ‘वीर बाल दिन’ साजरा होईल. या दोन महापुरुषांनी आपल्या धर्मातील महान विचारांपासून दूर जाण्याऐवजी मृत्यू पत्करला.”
त्यांनी पुढे म्हटलं, “ज्यादिवशी जोरावर सिंह जी आणि फतेह सिंह जी यांना वीरमरण प्राप्त झालं, त्याच दिवशी ‘वीर बाल दिन’ साजरा होईल. या दोन महापुरुषांनी आपल्या धर्मातील महान विचारांपासून दूर जाण्याऐवजी मृत्यू पत्करला.”
मात्र काही धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांच्या या निर्णयाची स्तुतीही केली होती.
एकूणच या घोषणेवर अनेक उलटसुलट प्रतिक्रिया समोर येत होत्या.
शीख समुदायाच्या विरोधाचं कारण
शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष अडव्होकेट हरजिंदर सिंह धामी यांनी पंतप्रधानांच्या घोषणनेंतर आपली प्रतिक्रिया देताना म्हटलं, “आम्ही पंतप्रधानांच्या भावनांचा आदर करतो. मात्र या छोट्या राजकुमारांच्या वीरगतीला केवळ बाल दिनापुरतंच मर्यादित ठेवणं हे शीख धर्माच्या भावना आणि परंपरांना धरून नाहीये.”
शिरोमणि गुरुद्वारा प्रबंधक कमिटीच्या किरणजोत कौर यांनी शहीद दिवसाचं नामकरण ‘बाल दिन’ करण्याऐवजी पाठ्यपुस्तकात त्याचा समावेश करण्याची मागणी केली.
पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेबद्दल त्यांनी म्हटलं, “या दोन कुमारांच्या वीर मरणाकडे दुर्लक्ष करत बिगर शीख सरकारने या दिवसाचं नाव ‘वीर बाल दिन’ ठेवलं आहे. मोदी सरकारने हा पोरखेळ केला आहे. धार्मिक शब्दावलीमध्ये या कुमारांसाठी ‘बाबा’ शब्दाचा वापर होतो आणि कोणत्याही शीख नसलेल्या व्यक्तीला या धार्मिक शब्दावलीसोबत छेडछाड करण्याचा अधिकार नाही.”
9 जानेवारीला इंग्रजीमध्ये ट्वीट केल्यानंतर जवळपास दोन तासांनी पंतप्रधानांनी पंजाबीमध्येही ट्वीट केलं. त्यांनी या ट्वीटमध्ये ‘बाबा’ शब्दाचा वापर केला होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)