You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
भारतातल्या या संस्थानावर 107 वर्षे स्त्रियांनी राज्य केलं...
- Author, शुरैह नियाजी
- Role, बीबीसी हिंदीसाठी, भोपाळहून
जागतिक महिला दिनी जगभरात महिलांची वाढती ताकद समाजात त्यांच्या योगदानाबद्दल चर्चा केली जाते.
एक नजर भोपाळवर टाकली तर असं लक्षात येतं की पुरुष शासकांना जे शक्य नव्हतं ते सगळं त्यांनी केलं आहे. हे सगळं करणं इतकं सोपं नव्हतं.
भोपाळ साम्राज्याचा पाया सरदार दोस्त मोहम्मद खान यांनी फतेहगढचा किल्ला बांधून टाकली होती. मात्र तिथल्या राण्यांनी यांना खरी ओळख दिली.
या प्रशासनाची सुरुवात कुदसिया राणीपासून होते. तिची सत्ता 107 वर्षं चालली आणि नवाब सुल्तान तिथे बेगम असेपर्यंत कायम होत्या. बेगम यांच्या हातात 1819 ते 1926 पर्यंत सत्ता होती.
सुरुवातीच्या काळातल्या नवाबांबद्दल बोलायचं झालं तर कुदसिया बेगम यांचं नाव आधी येतं. त्यांना गौहर बेगम याही नावाने ओळखलं जात असेल. त्यांच्या नवऱ्याची 1819 मध्ये हत्या झाली. त्यानंतर अवघ्या 18 व्या वर्षी त्यांना नवाब पद दिलं होतं.
त्या शिकलेल्या नव्हत्या, असं असलं तरी त्या काळाच्या पुढे विचार करणाऱ्या महिला होत्या असं इतिहासकार म्हणायच्या. त्यांच्या सैन्यासह त्यांनी अनेक लढाया लढल्या.
त्यांनी तयार केलेला गौहर महाल आजही बडा तलाब या परिसरात आहे. त्यांनी भोपाळ येथील जामा मशिदही स्थापन केली होती.
इतिहासकार आणि सैफिया कॉलेजमधील प्राध्यापक अशर किडवई सांगतात, “आजही लोकांना महिला त्यांच्यापेक्षा वरचढ झालेल्या चालत नाही. मात्र भोपाळमध्ये अशी एक राजवट होती जिथे स्त्रियांचं राज्य होतं आणि त्यांनी शक्य तितकं ते पुढे नेलं."
त्या पुढे म्हणाल्या, “या महिलांनी फक्त राज्यच केलं नाही तर त्या हिंदू-मुस्लिमांना बरोबरीने घेऊन पुढे गेल्या. त्यांच्या राज्यात हिंदू आणि मुस्लीम दोन्ही धर्माचे लोक मंत्री म्हणून काम करायचे.”
अशर किडवई यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या क्रमांकाची राज्य करणारी सिकंदर जहां बेगम यांच्यासाठीसुद्धा आव्हानं कमी नव्हती. त्यावेळी त्यांचे मामा फौजदार मोहम्मद खान यांनाही त्यांच्या मदतीसाठी मंत्री करण्यात आलं होतं. मात्र असं केल्याने त्यांना राज्यकारभारात अडचणी येऊ लादगल्या होत्या. शेवटी मोहम्मद खान यांना राजीनामा द्यावा लागला.
सिकंदर बेगम यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्या घोड्यावर बसून पूर्ण राज्याचा दौरा करायच्या.
त्यांनी जामा मशीद इंग्रजांकडून मुस्लीम समुदायाला देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला होता. 1857 च्या उठावानंतर जामा मशीद बंद करण्यात आली होती. इंग्रजांच्या मते मुस्लीम लोक एकत्र येऊन त्यांच्याविरुद्ध कट करतील अशी भीती त्यांना होती.
किडवई सांगतात, “सिकंदर जहां बेगम यांनी त्यांच्या राज्यात येणाऱ्या प्रत्येक गावाचा दौरा केला होता आणि प्रत्येक गोष्टीचं मॅपिंग केलं होतं. हा नकाशा त्यांनी हाताने तयार केला होता. त्यात प्रत्येक गोष्टीची माहिती होती. त्यात लिहिलं की त्यांच्या राज्यात कुठे डोंगर आहेत आणि कुठे पाण्याचे स्रोत आहेत यावरून हे काम कोणत्या नवाबाने केलं होतं ते कळायचं.
सिकंदर जहां यांनी शिक्षणासाठी बरंच काम केलं होतं. आणि शिक्षणाला उत्तेजन देण्यासाठी त्यांनी अनेक विद्वानांना पाचारण केलं होतं.
आणखी एक इतिहासकार डॉ.शंभूदयाल गुरू यांच्यामते, “सिकंदर जहां बेगम यांनी योग्य प्रकारे राज्य केलं आणि त्यांच्या प्रशासकीय कुशलतेमुळे भोपाळवर 30 लाखांचं कर्ज अगदी आरामात फेडलं.
ते सांगतात, “सिकंदर जहां यांनी कंत्राटदारी पद्धतीने जी वसुली व्हायची ती बंद करून टाकली.”
महिला नवाबांमध्ये तिसऱ्या क्रमांकांवर शाहजहां बेगमचं नाव येतं. शाहजहां बेगम यांनी आधीच्या राण्यांचं काम पुढे नेलं. त्यांना इमारती बांधण्याचा खूपच छंद होता.
भोपाळमध्येही ताज महाल नावाची एक इमारत आहे हे अगदी कमी लोकांना माहिती आहे. ती शाहजहां बेगम यांनी बांधली होती. त्याबरोबरच त्यांनी ताजुल मशिदीच्या बांधकामाला सुरुवात केली होती मात्र त्या पूर्ण करू शकल्या नाहीत.
ताजुल मशिदीचा देशातल्या सर्वांत मोठ्या मशिदींमध्ये समावेश होता. शाहजहां यांच्या मृत्यूनंतर या मशिदीचं काम पूर्ण झालं होतं.
इंग्लंडमध्ये जी शाहजहानी मशीद म्हणून ओळखली जाते तिची निर्मितीसुद्धा शाहजहां बेगम यांनी केली होती. त्या कुशल प्रशासक आणि उत्तम लेखिका होत्या. त्यांनी अनेक उर्दू पुस्तकं लिहिली.
मुसलमान मुलींच्या शिक्षणासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. मात्र तिथे कुराणाचं शिक्षणही दिलं जात होतं. हिंदू मुली तिथे शिकू शकायच्या नाहीत म्हणून त्यांनी हिंदू मुलींसाठी कन्याशाळा सुरू केली.
नवाब सुल्तान या भोपाळच्या शेवटच्या बेगम होत्या. त्यांनी 1901 मध्ये कारभार सांभाळला. त्यांनीही शिक्षणाला खूप महत्त्व दिलं होतं.
भोपाळला आधुनिक रूप देणाऱ्या बेगम
किडवई यांचं मत आहे की, जेव्हाही त्यांनी शिक्षणाचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्यांनी सांगितलं की कुराण आणि हदीसमध्येही मुलींच्या शिक्षणाबद्दल बरंच काही सांगितलं आहे.
आपल्या राज्यात आधुनिक गोष्टी आणण्यावर भर देणाऱ्या बेगम असं किडवई त्यांचं वर्णन करतात.
त्यांनी कस्न ए सुल्तानी पॅलेसची निर्मिती केली. त्याला आता अहमदाबाद पॅलेस म्हणूनही ओळखलं जातं. त्यातच त्यांनी मिंटो हॉलची निर्मिती केली. तो बराच काळ मध्य प्रदेश विधानसभा म्हणून वापरला जात असे,
त्याशिवाय त्यांनी सुल्तानिया गर्ल्स स्कूलची निर्मिती केली जी अजुनही चालू आहे. त्या अलीगढ मुस्लीम विद्यापीठाच्या पहिल्या कुलगुरू होत्या आणि त्याचबरोबर ऑल इंडिया कॉन्फरन्स ऑन एज्युकेशन च्या पहिल्या अध्यक्ष आहेत.
स्कुल ऑफ प्लानिंग आणि आर्किटेक्चर च्या प्राध्यापक सविता राजे यांनी भोपाळमधील नवाबांच्या काळातल्या आर्किटेक्चरवर बरंच काम केलं आहे. भोपाळ मध्ये ज्या महत्त्वाच्या गोष्टी त्यांनी उभारल्या, ज्या महालांची निर्मिती केली त्याचं संवर्धन करायला हवं असं त्यांचं मत आहे.
त्या म्हणतात, “जेव्हा एखाद्या दुसऱ्या शहरात महालांची चर्चा होते तेव्हा बायकांचा भाग वेगळा आणि पुरुषांचा भाग वेगळा दिसतो. मात्र इथे असं दिसत नाही तिथे बायकाच पुरुष होऊन काम करत आहेत.
या सर्व महिलांनी भोपाळ शहराला नवीन ओळख दिली आहे.
ते सांगतात की शेवटची महिला नवाब सुल्तान जहां यांनी भोपाळ मध्ये किंग जॉर्ज हॉस्पिटलचं उभारलं. ते आता हमीदिया हॉस्पिटल या नावाने ओळखलं जातं आणि हे या शहरातील प्रमुख रुग्णालय आहे.
अनस अली सांगतात, या स्त्रियांनी इमारती उभारल्या, शांतता प्रस्थापित झाली, कारखाने ,तयार झाले. मुलीच्या तालमीसाठी शाळा उघडल्या. अशा गौरवशाली इतिहासाची आठवण काढणं आपलं कर्तव्य आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)