You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उद्धव ठाकरे म्हणतात, 'कितीही अफझल, शहा आले तरी मला फरक पडत नाही'
"उद्या आपल्या शिवसेनेचा वर्धापन दिन आणि परवा आपल्या लोकांनी केलेल्या गद्दारीला वर्ष पूर्ण होणार. जो जा रहे है उनके जाने दो, जो दुख मे साथ रहते है उनको फरीश्ते कहते है. कितीही अफझल, शाहा आले तरी मला फरक पडत नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. पक्षाच्या वर्धापनदिन निमित्त कार्यक्रमात ते बोलत होते.
"सत्तेची मस्ती आहे. एवढीच मस्ती आहे तर ती मणिपूरला दाखवा. सीबीआय, यंत्रणा पाठवा तिकडे लोक पेटवतील. मोदी अमेरिकेत चालले पण मणिपूरला जायला तयार नाहीत. मणिपूर माझ्या देशातलं एक राज्य आहे. ते पेटलेलं आहे. मणिपूर शांत करून दाखवा. मोदींनी मणिपूरमध्ये जाऊन दाखवावं
"काल अयोध्या पोळ यांच्यावर शाई फेक झाली. त्याआधीही आमच्या महिला भगिनीवर हल्ला झाला. महिला गुंड तयार झालेत. आम्ही आमच्या भगिनींवरील हल्ले सहन करणार नाही. गद्दारांच्या फौजेसह नेतृत्त्व करण्यापेक्षा मुठभर निष्ठावंतांना सोबत घेऊन जाईल", असं उद्धव ठाकरे म्हणाले.
उठसूट लुटालूट सुरू आहे. मुंबई तोडू शकत नाही. जो कुणी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू लागले त्याचे तुकडेतुकडे होतील असं बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.
सहन होत नाही, सांगताही येत नाही अशी देवेंद्र फडणवीसांची स्थिती आहे. सावरकरांचा धडा वगळला याचा निषेध शिवसेना करते.
"आमचा एकच बाप (राजकीय) आहे तुमचे किती बाप आहेत. कारण मध्येच पेपरला जाहिरात आली होती त्यात बाप बदलला होता. हिटलर एका दिवसात जन्माला आला नाही. त्यानेही सगळ्यात आधी मीडियावर प्रतिबंध आणले. छळ छावण्या सुरू केल्या. विरोधकांना संपवलं. कत्तली झाल्या".
ते पुढे म्हणाले, "आपल्या देशाची वाटचाल हिटलरच्या दिशेने चालली नाही ना? त्याचंही चिन्ह स्वस्तिक होतं. तुम्ही आम्हाला ढकललं म्हणून काँग्रेससोबत जावं लागलं".
मी तुम्हाला आव्हान देतो तुम्ही मोदींचा चेहरा घेऊन निवडणुकीत या. मी माझ्या वडिलांचा चेहरा घेऊन येतो.
"मी मुख्यमंत्री झालो तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की मी उडणार ह्याला काय जमणार पण झोपवलं होतं सगळ्यांना. कितीही खोके दिले तरी तुम्हाला कोणी कुटुंबात घेणार नाही. कारण घेतला तर कुटुंब फोडतील.
घराबाहेर पडलो नाही अशी टीका होते. मी घरात बसून महाराष्ट्र माझं घर चालवलं. ह्याचं गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा आहे. दिल्लीत सारखं जावं लागलं मुजरा करायला. असा मेंधा महाराष्ट्र बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता.
आम्ही दादरला रानडे रोडला रहायचो. आजोबांनी त्यांना विचारलं की संघटना काढायची की नाही आणि आजोबा पटकन बोलले 'शिवसेना' आणि जय महाराष्ट्र म्हणत नारळ फोडला. नारळाचं पाणी माझ्या अंगावर होतं. तुम्ही मला बाळासाहेबांचं विचार शिकवणार"?
ते पुढे म्हणाले, "मी मोहनजी भागवतांना विचारतो की तुम्ही तुमचं हिंदुत्व एकदाच सांगा. तुम्ही समान नागरी कायदा आणा आमचा पाठिंबा आहे. हिंदूंना किती त्रास होतो हे लिहिलंय लोकसत्तेच्या अग्रलेखात मग आम्ही पाठिंबा देतो".
'शेंडी, जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही'
"आम्ही कमळाबाई म्हणतोय म्हणून उद्या काही बोलणार असाल तर विसरू नका आम्ही बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. आम्ही सत्तेत नसताना का कधी हिंदू मुस्लीम दंगली झाल्या नाहीत.
तुम्ही आल्यावरच दंगली का होतायत महाराष्ट्रात. हिंदू जन आक्रोश काश्मिरात जाऊन दाखवा. तिकडे हिंदू काश्मिरी पंडितांना दाखवा. तुमचं हिंदुत्व गेमुत्रात अडकलेलं आहे. शेंडी, जानव्याचं हिंदुत्व आम्हाला मान्य नाही. तुम्ही तुमच्या आईच्या कुशीवर वार करून गेला आहात हे लक्षात ठेवा", असं ठाकरे म्हणाले.
"मोदींचा देश? बाकीच्यांचा देश नाहीय. मोदींचा अंधभक्त म्हणून तुमची ओळख नको. भारत आहे हा, हिंदुस्थानी आहोत आपण. उद्या दुसरा कोणी पंतप्रधान होईल. देश हा सर्वोच्च आहे. पंतप्रधान त्याचा सेवक आहे", असं ठाकरे म्हणाले.
"तुम्ही इतिहास बिघडवणारे आहात आम्ही इतिहास तयार करणारे आहोत. कर्नाटकातल्या जनतेचे धन्यवाद करतो. तुम्ही बाहुबली समोर झुकला नाही. बजरंग बलीला नमस्कार करतो की त्यांच्या डोक्यावर गदा हाणली. हीच शक्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळो," असं ठाकरे यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)