You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
ऋषभ पंतवर पुढचे उपचार मुंबईत होणार
भारताचा विकेटकीपर बॅट्समन ऋषभ पंत याच्यावर पुढील उपचार मुंबईत होणार आहेत. 30 डिसेंबरला ऋषभ पंतचा अपघात झाला होता. या अपघातात ऋषभ गंभीररीत्या जखमी झाला होता. डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये ऋषभवर उपचार सुरु होते. त्याच्या जीवाला धोका नसल्याचं डॉक्टरांनी स्पष्ट केलं होतं.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने ऋषभवरील पुढच्या उपचारांसाठी आवश्यक व्यवस्था सज्ज केली आहे. ऋषभला एअरलिफ्ट करुन डेहराडूनहून मुंबईला नेण्यात येणार आहे.
ऋषभला मुंबईत कोकिलाबेन धीरुभाई अंबानी हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट इथे दाखल करण्यात येणार आहे. द सेंटर फॉर स्पोर्ट्स मेडिसीनचे प्रमुख आणि आर्थोस्कोपी अँड शोल्डर सर्व्हिसेसचे संचालक डॉ. दिनशॉ पारडीवाला यांच्या नेतृत्वातील चमू ऋषभवर पुढील उपचार करणार आहे.
लिगामेंट टिअर आणि अन्य दुखापतींसाठी ऋषभवर शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. बीसीसीआयची मेडिकल टीम हॉस्पिटल प्रशासनच्या बरोबरीने ऋषभच्या उपचारांवर लक्ष ठेवत आहे.
या अपघातातून ऋषभ पूर्णपणे आणि लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी सर्वतोपरी पाठिंबा दिला जाईल असं बीसीसीआयने जारी केलेल्या मेडिकल बुलेटिनमध्ये म्हटलं आहे.
क्रिकेटपटू ऋषभ पंत उत्तराखंडमधील रुरकी येथे झालेल्या एका कार अपघातात गंभीररित्या जखमी झाला आहे.
ऋषभ पंतच्या कारची डिव्हायडरला धडक बसली आहे.
या अपघातात पंतची कार जळून खाक झाली आहे. त्याला देहरादूनच्या मॅक्स हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
देहरादूनस्थित मॅक्स हॉस्पिटलचे डॉ. आशिष याज्ञिक यांनी ऋषभ पंतच्या तब्येतीविषयी सांगितलं की, "ऋषभ पंतची प्रकृती स्थिर आहे. ऑर्थोपेडिक सर्जन आणि प्लास्टिक सर्जनसह डॉक्टरांचं एक पथक त्याच्या दुखापतीची तपासणी करत आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच पुढील उपचारांची दिशा काय असेल हे कळेल. यासंबंधीची माहिती मेडिकल बुलेटिनद्वारे दिली जाईल.”
"भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंत रस्ते अपघातात जखमी झाल्याची बातमी मिळाली. त्याच्या उपचाराची पूर्ण व्यवस्था करण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत," अशी माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली आहे.
अपघात कसा झाला?
हरिद्वारचे एसएसपी अजय सिंह यांनी बीबीसीला सांगितलं की, "हा अपघात पहाटे 5.30-6च्या दरम्यान झाला. ऋषभ पंतची कार डिव्हायडरला धडकली. समोरची विंडशील्ड तुटली आणि तो बाहेर पडला. त्यानंतर कारनं पेट घेतला. प्राथमिक उपचारानंतर लाईफ सपोर्ट असलेल्या रुग्णवाहिकेला पाचारण करण्यात आलं आणि त्याला डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आलं."
"आम्ही डॉक्टरांशी बोललो आहोत. डॉक्टरांनी सांगितलं की, प्राथमिक तपासणीत जीवघेणं असं काहीही समोर आलेलं नाही. कोणतीही अंतर्गत दुखापत नाही. पायाला दुखापत आहे. पाठीला खरचटलं आहे. डोक्यालाही जखम आहे. बाकी एक्स- रे रिपोर्ट आल्यानंतरच कळेल.”
माजी क्रिकेटपटू व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ट्विट केलं आहे. ऋषभच्या प्रकृतीला धोका नाही. त्याच्यासाठी प्रार्थना करूया. असं ते म्हणाले आहेत.
अपघातानंतर काय झालं?
सकाळी साडेपाचच्या सुमारास हा अपघात झाला. त्यानंतर अँब्युलन्स ने ऋषभला जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आलं.
तिथे हॉस्पिटलचे चेअरम आणि ऑर्थोपेडिक सर्जन सुशील नागर यांनी उपचार केले.
तिथे ऋषभ तीन तास असल्याची माहिती डॉक्टरांनी बीबीसीला दिली.
ते म्हणाले, “जेव्हा त्याला रुग्णालयात आणलं तेव्हा त्याची तब्येत नाजूक होती. रुग्णालयाच्या ट्रॉमा च्या टीम ने परिस्थिती नीट हाताळली.
एक्सरे मध्ये त्यांना हाडाला कोणतीच जखम झाली नसल्याचं कळलं. डाव्या गुडघ्याला लिगामेंट इंज्युरी आहे.
त्याच्या डाव्या गुडघ्याला प्लास्टर लावलं आणि कार्डिअक अँम्ब्युलन्स ने मॅक्स रुग्णालयात नेण्यात आलं.
डॉक्टर नागर यांनी माहिती दिली की ऋषभ जेव्हा रुग्णालयात आला तेव्हा मेंदूच्या आत कोणतीच जखम झाली नसल्याचं त्यांच्या लक्षात आलं.
कुठे जात होतास असं विचारल्यावर, आईला सरप्राईज देणार होतो असं उत्तर त्याने दिलं.
अपघात कसा झाला विचारल्यावर, ‘मला हलकीशी डुलकी लागली आणि..’ असं उत्तर त्याने दिलं.
बीसीसीआय ने सुद्धा एक पत्रक काढून या अपघाताबद्दल माहिती दिली आहे.
“ऋषभच्या कपाळावर दोन ठिकाणी जखमा आहेत. त्याच्या उजव्या गुडघ्याचं लिगामेंट फाटलं असून, उजवं मनगट, घोटा यांनाही दुखापत झाली आहे आणि पाठीला खरचटलं आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. त्याच्यावर सध्या देहरादून येथील मॅक्स इस्पितळात उपचार सुरू आहेत. MRI आणि इतर चाचण्यांद्वारे त्याला झालेल्या जखमांची तीव्रता कळेल.
बीसीसीआय सातत्याने त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आणि डॉक्टरांच्या संपर्कात आहे. या संकटातून बाहेर निघण्यासाठी बोर्डाकडून हवी ती मदत करण्यात येईल” असं बीसीसीआय चे सचिव जय शहा यांनी म्हटलं आहे.
कारकीर्द
भारत बांग्लादेश सीरिज नंतर पंत दुबईला गेला होता. धोनीची पत्नी साक्षी बरोबर त्याने फोटो पोस्ट केले होते.
याच आठवड्यात तो भारतात आल्याचं सांगण्यात आलं. पंत एक अतिशय आक्रमक फलंदाज आहे.
गेल्या आठवड्यात बांग्लादेशच्या विरुद्ध दुसऱ्या कसोटी सामन्यात 93 धावा केल्या होत्या.
श्रीलंकेविरुद्धच्या आगामी सीरिज मध्ये त्यांना भारतीय संघात जागा मिळाली नाही.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)