कंदहार विमान हायजॅक : 180 प्रवासी, 8 दिवस चाललेलं अपहरणनाट्य आणि तालिबानची मध्यस्थी

नेपाळची राजधानी काठमांडूवरून नवी दिल्लीला जाणाऱ्या इंडियन एअरलाईन्सच्या IC 814 या विमानाचं अपहरण झालं होतं. त्याची ही थरारक कहाणी :

साल 1999 च्या 24 डिसेंबरची संध्याकाळ होती. शुक्रावारचा दिवस होता, घड्याळात साडेचार वाजले होते.

काठमांडूच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावरून इंडियन एअरलाईन्सची फ्लाईट आयसी 814 नव्या दिल्लीच्या दिशेने झेपावत होतं.

साधारण 5 वाजेच्या सुमारास विमान भारतीय वायु क्षेत्रात दाखलं झालं आणि अपहरणकर्ते कामाला लागले. त्यांनी विमान पाकिस्तानकडे घेऊन जाण्याची मागणी केली.

तेव्हा जगाला कळलं की भारताच्या विमानाचं अपहरण झालं आहे. संध्याकाळी सहा वाजता विमान थोडावेळ थांबलं आणि तिथून लाहोरकडे रवाना झालं.

पाकिस्तान सरकारच्या परवानगीशिवाय हे विमान रात्री 8 वाजून 7 मिनिटांनी लाहोरमध्ये लँड झालं.

मग दुबईमार्गे हे विमान दुसऱ्या दिवशी सकाळी साडे-आठ नऊ वाजता अफगाणिस्तानतल्या कंदहार विमानतळावर उतरलं. त्याकाळात कंदहार तालिबानच्या ताब्यात होतं.

180 प्रवासी

विमानात एकूण 180 प्रवासी होते. विमानाचं अपहरण झाल्यानंतर काही तासातच कट्टरवाद्यांनी एक प्रवासी रूपन कात्याल यांची हत्या केली.

25 वर्षांच्या रूपन कात्याल यांच्या शरीरावर कट्टरवाद्यांनी चाकूने अनेक वार केले. रात्री पावणेदोन वाजता हे विमान दुबईला पोहोचलं.

तिथे विमानात इंधन भरू देण्याच्या बदल्यात काही प्रवाशांची मुक्तता करण्याचं ठरलं.

दुबईत एकूण 25 लोकांना अपहृत विमानातून सोडलं. यात बहुतांश महिला आणि लहान मुलं होती. यानंतर एका दिवसाने डायबेटिस असलेल्या एका व्यक्तीला सोडलं.

कंदहार विमानतळावर कँन्सर झालेल्या एका महिलेला उपचारासाठी विमानाच्या बाहेर जाण्याची परवानगी दिली, तीही फक्त 90 मिनिटांसाठी.

विमानातल्या प्रवाशांना कट्टरवाद्यांनी बंदी बनवलं होतं, त्यामुळे भारत सरकारच्या अडचणी वाढत चालल्या होत्या. मीडियाचा दबाव वाढत होता. ज्यांना बंदी बनवलं होतं त्यांचे नातेवाईक निदर्शनं करत होते.

या दरम्यान अपहरणकर्त्यांनी आपल्या 36 कट्टरवाद्यांच्या सुटकेसह 20 कोटी अमेरिकन डॉलर्सची खंडणी मागितली होती.

तालिबानची भूमिका

अपहरणकर्त्यांनी एका काश्मिरी नेत्याचा मृतदेह परत मिळावा अशीही मागणी केली होती, पण तालिबानच्या विनंतीनंतर त्यांनी मृतदेह परत मिळावा ही आणि पैशाची अशा दोन्ही मागण्या मागे घेतल्या.

पण भारतीय कैदेत असलेल्या कट्टरवाद्यांच्या सुटकेची मागणी मागे घ्यायला मात्र ते तयार नव्हते.

या विमानातल्या एक प्रवासी सिमोन बरार यांना पोटाचा कँन्सर होता. त्यांची तब्येत जास्तच बिघडली आणि तालिबानने त्यांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांशी बोलणी केली. तालिबानने एकाच वेळेस कट्टरवादी आणि भारत सरकार दोघांवर समझोत्यासाठी दबाव टाकला होता.

एक वेळ तरी अशी आली की तालिबान काहीतरी कठोर पावलं उचलेलं असं वाटायला लागलं.

पण यानंतर तत्कालिन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणींनी म्हटलं की, "तालिबानने म्हटलंय की कंदहारमध्ये रक्तपात नाही झाला पाहिजे नाहीतर ते अपहृत विमानावर हल्ला करतील. हे म्हणून त्यांनी सकारात्मक दृष्टीकोन दाखवला आहे. यामुळे अपहरणकर्त्यांना आपल्या मागण्या मागे घ्याव्या लागल्या आहेत."

वाजपेयी सरकार

या विमानात बहुतांश भारतीय नागरिक असले तरी ऑस्ट्रेलिया, बेल्जियम, कॅनडा, फ्रान्स, इटली, जपान, स्पेन आणि अमेरिका या देशांचे नागरिकही या विमानाने प्रवास करत होते.

तत्कालीन एनडीए सरकारला विमानातल्या सर्व प्रवाशांच्या सुटकेसाठी तीन कट्टरवाद्यांना कंदहारला नेऊन सोडून द्यावं लागलं होतं.

तत्कालीन अटलबिहारी वाजपेयी सरकारचे परराष्ट्रमंत्री जयवंत सिंह स्वतः या तीन कट्टरवाद्यांना कंदहारला घेऊन गेले आणि त्यांना सोडून दिलं.

हे कट्टरपंथी होते जैश-ए-मोहम्मदचे प्रमुख मौलाना मसूद अजहर, अहमद जरगर आणि शेख अहमद उमर सईद.

भारत सरकार आणि कट्टरवाद्यांमध्ये समझौता झाल्याझाल्या तालिबानने कट्टरवाद्यांना दहा तासाच्या आत अफगाणिस्तान सोडण्याचा इशारा दिला होता.

31 डिसेंबरला भारताच्या ताब्यात असलेल्या 3 कट्टरवाद्यांची सुटका झाल्यानंतर विमानातल्या 155 प्रवाशांची मुक्तता करण्यात आली.

कट्टरवादी आपल्या हत्यारांसकट विमानातून उतरले आणि एअरपोर्टवर आधीच वाट पाहात असलेल्या गाड्यांमध्ये बसून तातडीने तिथून निघून गेले.

असं म्हणतात की इंडियन एअरलाईन्सच्या विमानाचं अपहरण करणाऱ्या कट्टरवाद्यांनी आपल्या सुरक्षेच्या गॅरेंटीसाठी तालिबानच्या एका अधिकाऱ्यालाही आपल्या ताब्यात घेतलं होतं.

काही प्रवाशांनी सांगितलं की विमानाचं अपहरण झाल्यानंतर कट्टरवाद्यांनी आपल्याच गटातल्या एका व्यक्तीला मारून टाकलं होतं. पण याची पुष्टी होऊ शकली नाही.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)