You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला मी मुद्दामहूनच बसलो - उद्धव ठाकरे
मेहबुबा मुफ्ती या भाजपच्या लॉन्ड्रीतून स्वच्छ होऊन आल्या आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीत मी मुद्दामहून त्यांच्या बाजूला बसलो, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे.
आज (24 जून) मुंबई येथे आयोजित शिवसेना (उबाठा) पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी बैठकीत ते बोलत होते. दादरच्या शिवाजी मंदिर येथे ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
काल पाटणा येथे आयोजित विरोधी पक्षांच्या बैठकीत उद्धव ठाकरे हे काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला बसले होते. त्यावरून भाजपने त्यांच्यावर टीकाही केली होती.
त्याला प्रत्युत्तर देताना ठाकरे म्हणाले, "काल मी तिथे गेलो. मी मुद्दामहून मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला जाऊन बसलो. कारण त्या भाजपच्या लॉन्ड्रीतून स्वच्छ होऊन आल्या आहेत. आमचं कॉंग्रेसबरोबर बसून हिंदुत्व गेलं. तुमचं हिंदुत्व मुफ्तींबरोबर बसून गेलं नाही, म्हणून मी तिथे बसलो."
"मी कायम भाजपवर टीका करताना तुमचं उदाहरण देतो, असं मुफ्तींना मी सांगितलेलं आहे. कलम 370 काढणार नाही, असं सांगून भाजपने आमच्याशी युती केली होती, असं मेहबुबा मुक्तींनी मला सांगितलं," असंही ठाकरे म्हणाले.
यावेळी उद्धव ठाकरे यांनी मेहबुबा मुफ्ती यांच्यासोबतचे भाजप नेत्यांचे फोटोही दाखवले.
"मेहबुबा मुफ्तीच्या बाजूला बसलो म्हणून माझ्याविरोधात बोंबलत असाल तर माझ्याकडेही तुमचे अनेक फोटो आहेत. तुमच्या नेत्यांचं मुस्लिम प्रेम असल्याचा अल्बम माझ्याकडे आहे, असं ते म्हणाले.
"औरंग्याच्या पिळावली यांनीच जन्माला घातल्या. भाजपवाल्यांना त्याचं कौतुक आहे. गुजरातमधील दाओत नावाच्या गावात औरंग्याचा जन्म झाला होता. म्हणूनच भाजपवाल्यांचा अंगात सतत औरंग्या येतो. असे शंभर औरंग्या आले तरी शिवसेना त्यांना अंगावर घेईल," असं ठाकरे यांनी म्हटलं.
‘हनुमान आता आमच्या बरोबर, भाजपविरोधात एकत्र लढू,’ काँग्रेससह 17 पक्षांची पाटण्यात घोषणा
"आम्ही 2024 ची निवडणूक एकत्र लढू आणि भाजपला सत्तेतून बाहेर काढू. आम्ही यात यशस्वी होऊ," असं काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे पाटण्यात म्हणाले.
बिहारची राजधानी पाटणा येथे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी देशातील भाजपविरोधक पक्षांची बैठक बोलावली होती.
या बैठकीला काँग्रेस, आप, तृणमूल, शिवसेना, डीएमके, नॅशनल कॉन्फरन्स, सपा, डाव्यांसह 17 पक्षांचे नेते उपस्थित होते. मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, एमके स्टॅलिन, ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, अखिलेश यादव यांच्यासह विरोधकांमधील अनेक नेते उपस्थित होते.
या बैठकीत बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव हेही उपस्थित होते.
लालू प्रसाद यादव म्हणाले की, "भाजपनं हनुमानाचं नाव घेऊन निवडणुका लढवल्या. निवडणुका आल्या की 'जय हनुमान' करतात. आता हनुमान आमच्यासोबत असतात."
मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले, "विरोधकांच्या बैठकीत कन्याकुमारीपासून काश्मीरपर्यंतचे नेते होते. सर्व नेते एकजुटीने निवडणुका लढवण्यासाठी एक सामायिक अजेंडा तयार करत आहेत. आम्ही 10 किंवा 12 जुलै रोजी शिमल्यात बैठक घेत आहोत. तारखेत पुढे-मागे होईल."
"बिहारमध्ये काय करायचं, यूपीमध्ये काय करायचं, असं प्रत्येक राज्याची स्वतंत्र रणनीती तयार केली जाईल. 2024 ची लढाई एकजुटीने लढायची आहे. भाजपला सत्तेतून हाकलायचे आहे. यात आम्ही नक्कीच यशस्वी होऊ," असंही मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले.
या बैठकीचं आयोजन करणारे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार म्हणाले की, "पुढे आणखी एक बैठक होणार आहे. पण या बैठकीत एकत्र लढण्याबाबत सगळ्यांचं एकमत झालं. आताचं केंद्र सरकार देशाच्या हिताचं काम करत नाहीत. त्यामुळे सगळेच चिंतेत आहेत."
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधींनी अगदी छोटेखानी संबोधन केलं. ते म्हणाले की, "भारताच्या मुलभूत रचनेवर आक्रमण होतंय. संस्था मोडल्या जातायेत. आमच्यात काही मतभेद असतील. पण एकत्र काम करण्याचं आम्ही निर्णय घेतलाय. आमच्या विचारधारेचं आम्ही रक्षण करू."
यावेळी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, "खूप चांगल्या प्रकारे बैठकीचं आयोजन करण्यात आलं. पाटण्यातून जे सुरू होतं, त्याचं जनआंदोलन होतं. दिल्लीत बऱ्याच बैठकी झाल्या, त्यातून काही फार निष्पन्न झालं नाही. त्यामुळे म्हटलं पाटण्यातून सुरू करा."
"आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही एकत्रितपणे लढणार आहोत. भाजपचं हुकूमशाही सरकार आहे. आम्ही निवडून आलेल्या सरकारसमोर राज्यपालांचं समांतर सरकार चालवलं जातंय. कुणी काही बोललं, तर त्याविरोधात ईडी लावली जाते. माध्यमांना गप्प केलं गेलंय," असंही ममता बॅनर्जी म्हणाल्या.
या बैठकीला महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, सुप्रिया सुळे, मिलिंद नार्वेकर संजय राऊतही उपस्थित होते.
बैठकीनतंरच्या एकत्रित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे म्हणाले की, "आम्ही वेगवेगळे पक्ष असल्यानं अर्थातच विचारधारा वेगळ्या आहेत. मात्र, देशाची अखंडता कायम ठेवण्यासाठी एकत्र आलोय."
"देशावर आघात कोणी केला तर आम्ही पुढे येणार. देशात जे लोक हुकूमशाही आणतायेत, त्यांच्या विरोधात आम्ही लढू," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली आहे.
विरोधक देशासाठी नाही तर स्वार्थ, भ्रष्टाचार आणि घराणेशाहीसाठी एकत्र येत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.