रनिल विक्रमसिंघे: श्रीलंकेचे नवे पंतप्रधान म्हणतात, परिस्थिती आणखी....

फोटो स्रोत, Getty Images
"ज्या आर्थिक संकटामुळे श्रीलंकेतील लोकांच्या समस्या वाढल्या आहेत आणि अशांतता पसरली आहे, त्यात सुधारणा होण्यापूर्वी आताचं संकट अधिक वाईट होईल," असं श्रीलंकेचे नवे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघेंनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं.
श्रीलंका सध्या इंधनाची कमतरता आणि खाद्यपदार्थांच्या वाढत्या किंमतींचा सामना करत आहे. काही श्रीलंकन नागरिकांना तर अन्नासाठीही वणवण करावी लागतेय.
श्रीलंकेतल्या सरकारनं ज्या पद्धतीनं या संकटाशी लढण्याचा प्रयत्न केला, त्यातून लोकांमध्ये केवळ नाराजीच पसरली नाही, तर त्या नाराजीचं रुपांतर हिंसक निदर्शनांमध्ये झालं.
रनिल विक्रमसिंघेंना देशात सुरू असलेले निदर्शनं थांबवण्यासाठी आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नवे पंतप्रधान करण्यात आलंय.
विरोधी पक्षाचे खासदार असलेल्या रनिल विक्रमसिंघे हे सहाव्यांदा श्रीलंकेचे पंतप्रधान बनले आहेत.
पंतप्रधानपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर रनिल विक्रमसिंघेंनी बीबीसीला मुलाखत दिली. त्यात त्यांनी म्हटलं की, "श्रीलंकेतील नागरिकांना तीन वेळेचं जेवण मिळू शकेल, हे प्राधान्यानं पाहीन."

फोटो स्रोत, EPA
इतर देशांना आर्थिक मदत करण्याचं आवाहन करतानाच विक्रमसिंघे म्हणाले की, "भुकेची समस्या निर्माण होणार नाही. आम्ही त्यावर उपाय काढू."
देशाची अर्थव्यवस्था 'कोलमडली' आहे, असं म्हणतानाच विक्रमसिंघे पुढे म्हणाले की, "थोडा धीर धरा, मी परिस्थिती रुळावर आणेन."
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाय राजपक्षेंनी रनिल विक्रमसिंघेंना गुरुवारी (12 मे) पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र, त्यांच्या नियुक्तीवरून लोकांमध्ये असंतोष आहे. कारण त्यांनाही राजपक्षे कुटुंबाचे निकटवर्तीय म्हणूनच मानलं जातं.
विक्रमसिंघे बीबीसीच्या मुलाखतीत म्हणाले की, "आरोप करण्यानं काहीही होणार नाही. मी इथं यासाठी आलोय की, लोकांचं चांगलं व्हावं."
श्रीलंकेची अर्थव्यवस्था सातत्यानं कोलमडतेय. खाद्य, इंधन आणि औषधं यांचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय. परिणामी महागाईनं उच्चांक गाठलाय आणि लोकांना त्या किंमतीत खरेदी करता येत नाहीय. अनेक लोकांनी पेट्रोल पंपांवर तेल भरण्याच्या रांगेत आपला जीव गमावला हे.

फोटो स्रोत, Getty Images
1948 मध्ये ब्रिटनपासून स्वातंत्र्य मिळवल्यानंतर श्रीलंकेत आलेलं हे सर्वात मोठं आर्थिक संकट आहे.
रनिल विक्रमसिंघेंच्या मुलाखतीतले 7 मुद्दे :
1) आम्हाला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) शी चर्चा करावी लागेल, पैशाचं नियोजन करावं लागेल, आम्हाला मित्रराष्ट्रांशी चर्चा करावी लागेल, परकीय गुंतवणूक जुळवावी लागेल.
2) उद्योगात गुंतवणूक करायला आमच्या देशातील कंपन्यांकडे पैसा नाहीय. त्यामुळे बाहेरून पैसा आणावा लागेल.
3) मला काही योजना आणाव्या लागतील, जेणेकरून रेशनद्वारे लोकांना धान्य उपलब्ध करून देता येईल. मी हे जातीनं पाहीन की, देशातील प्रत्येक माणसाकडे खायला अन्न असेल.
4) आम्ही भारताशी चर्चा करू. भारत आमची मदत करतोय. पण आम्ही जपान, दक्षिण कोरियाशीही बोलतोय. आम्हाला पैशांची गरज आहे.

फोटो स्रोत, Getty Images
5) परिस्थिती सुधारण्यापूर्वी यापेक्षाही आणखी वाईट होऊ शकते. आता काय परिस्थिती आहे आणि येत्या काही महिन्यांमध्ये मी काय करणार आहे, हे सांगयला मला काही दिवस लागतील. कारण मला पूर्ण माहिती घ्यावी लागेल.
6) आम्हाला बाहेरून मदत मागवावी लागेल. अन्न आणि औषधं बाहेरून मागवणार आहोत. वर्षअखेरीस पेरणी सुरू होईल, मग त्यासाठी खतं लागतील. आताच्या पेरणीच्या हंगामासाठी आमच्याकडे खतं नाहीत. आम्हाला खताचा तुटवडाही भासतोय, कारण युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे.
7) जागतिक बँकेच्या अहवालानुसार, जुलैपासून अन्नाचा तुटवडा भासेल, तो 2024 पर्यंत. या दोन्ही प्रश्नांसाठी आम्हाला सज्ज राहावं लागेल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








