You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दोन देशांमध्ये पाण्यावरून हिंसक संघर्ष, 31 जणांचा मृत्यू, तर शेकडो जण जखमी
किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या वादग्रस्त सीमेवर पाण्यावरून झालेल्या संघर्षात 31 जणांचा मृत्यू झाला तर शेकडो जण जखमी झाले. पाण्यावरून वादंग निर्माण होऊन त्याचं पर्यावसान हिंसक घटनेत झालं.
या घटनेनंतर तिथून 10,000 नागरिकांना सुरक्षितपणे अन्यत्र नेण्यात आलं.
बुधवारी दोन गटांदरम्यान वादाला सुरुवात झाली, ते गट एकमेकांवर दगडफेक करू लागले. गुरुवारी या संघर्षाला हिंसक वळण लागलं. तिथे असलेल्या पाण्याच्या स्त्रोताच्या इथे लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरे बसवण्यात आले होते.
दोन्ही गटांचं माघार घेण्याबाबत एकमत झालं मात्र तरीही या भागातून बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येतच राहिले.
किर्गिस्तानच्या आरोग्यमंत्री अलीजा सोल्टनबिकोबा यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, हा वाद गुरुवारी सुरू झाला आणि आतापर्यंत यामध्ये 31 लोकांचा मृत्यू झाला आहे तर दीडशे लोक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एका लहान मुलीचाही समावेश आहे. मृतांमध्ये ताजिकिस्तानचे किती नागरिक आहेत याबाबत माहिती समोर आलेली नाही.
सोशल मीडियावर किर्गिस्तानच्या बाटकन या वादग्रस्त भागात अनेक घरं जळताना दिसत आहेत.
किर्गिस्तान इमर्जेन्सीज मिनिस्ट्रीनुसार ज्या ठिकाणी आगी लावण्यात आल्या त्यामध्ये एक सीमा चौकी, वीसहून अधिक घरं, एक शाळा, आठ दुकानं आणि एका कॅसिनोचा समावेश आहे.
किर्गिस्तानच्या बाटकन प्रांताचे गव्हर्नरांनी सांगितलं की पाण्याच्या स्रोताइथले निगराणीसाठी ठेवलेले कॅमेरे हटवण्यात यावेत यावर दोन्ही देशांची सहमती झाली. मात्र ताजिकिस्तानने तह मानण्यास नकार दिला.
संघर्ष तीव्र झाल्यानंतर सुरक्षायंत्रणाही यात सामील झाल्या होत्या.
गुरुवारी दोन्ही देशांच्या लष्करादरम्यानही गोळीबार झाला. मात्र त्याचदिवशी युद्धविरामाची घोषणाही झाली. याअन्वये दोन्ही देशांचे सैनिक रात्री आठ वाजता आपापल्या चेकपोस्टच्या इथे परतले.
बाटकन प्रदेशाच्या पोलीस प्रतिनिधींनी एएफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, मोठ्या प्रमाणावर नाही पण लष्करांदरम्यान गोळीबार झाला. सामान्य माणसांनीही गोळ्या चालवल्या.
शुक्रवारी ताजिकिस्तान माहिती आणि प्रसारण खात्याने निवेदन जारी केलं. त्यानुसार दोन्ही देशांच्या सीमेवर युद्धविराम आहे. ताजिकिस्तानची किती माणसं मृत्यूमुखी पडली आहेत याविषयी काहीही सांगण्यात आलेलं नाही.
संघर्षाचं कारण काय?
पाण्याच्या स्रोतावरून किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्यात गेली अनेक वर्ष द्वंद्वं सुरू आहे. दोन्ही देशांचा या स्त्रोतावर दावा आहे.
मध्य आशियातल्या अन्य देशांतील वादाप्रमाणे या दोन देशांमध्ये गेल्या तीन दशकांपासून हा वाद सुरूच आहे.
सोव्हियत संघाच्या विविध ठिकाणी लोक सहजी जा-ये करू शकत होते. मात्र सोव्हियत संघाच्या विघटनानंतर दोन्ही देशांमधील सीमेवर नाकेबंदी वाढली आणि तणावही वाढत गेला.
किर्गिस्तान आणि ताजिकिस्तान यांच्या सीमेवर 600 मैल प्रदेशापैकी एक तृतीयांश हिस्सा वादग्रस्त आहे. सीमेच्या अल्याड आणि पल्याड राहणारी मंडळी इथल्या जमीन आणि पाण्यावर दावा करतात. या मुद्यावरून आधीही हिंसक घटना घडल्या आहेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)