भारत चीन संघर्ष : गलवानमध्ये नेमकं काय घडलं? तुम्हाला पडलेल्या 11 प्रश्नांची उत्तरं वाचा

भारत आणि चीनचे जवान

फोटो स्रोत, Getty Images

भारत आणि चीनच्या सीमेवर मे महिन्यापासून तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं वृत्त येत आहे. 15 आणि 16 जूनला दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे.

पण हे नेमकं काय घडतंय, त्याचा अर्थ काय आहे? गलवान खोरं नेमकं काय आहे? किती चिनी जवान मारले गेले? यांसारख्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न बीबीसीनं केला आहे.

1) गलवानमध्ये 15/16 जूनच्या रात्री नेमकं काय झालं?

15 आणि 16 जूनच्या रात्री गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी जवानांसोबत झालेल्या हिंसक चकमकीत भारताच्या एका कर्नलसह 20 जवान शहीद झाले. या चकमकीत चीनी जवानांनी खिळे लावलेल्या लोखंडी रॉडचा हत्यार म्हणून वापर केल्याचं सांगितलं जात आहे. भारत-चीन सीमेवर तैनात असणाऱ्या एका वरिष्ठ भारतीय लष्करी अधिकाऱ्यानेही हा फोटो बीबीसीला पाठवला आहे आणि यानेच चीनी जवानांनी भारतीय जवानांवर हल्ला केल्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर दोन्ही देशांमधला तणाव अधिकच वाढला आहे. दोन्ही देशांनी एकमेकांवर अतिक्रमण केल्याचा आरोप केला आहे.

2020 च्या मे महिन्यात काही वृत्तांनुसार भारत आपला भूभाग समजत असलेल्या गलवान खोऱ्यातील काही ठिकाणी चिनी सैनिकांनी तंबू उभारले. तसंच अवजड साहित्यासहीत शिरकाव केला. भारताचे आघाडीचे सुरक्षा विश्लेषक अजय शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार, गेल्या महिन्याभरात चिनी सैन्याने भारतीय लष्कराची गस्त असलेल्या भूभागावर 60 चौरस किमीपर्यंत ताबा घेतला आहे.

तेव्हापासूनच भारत-चीन सीमेवर सुरू असलेल्या हालचालींबाबत वेगवेगळी वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये आली. पण त्याबाबतचा अधिकृत खुलासा मात्र दोन्ही देशांकडून करण्यात आला नाही. 15 आणि 16 जूनच्या दरम्यान घडलेल्या घटनेचं वर्णन 'काही वर्षांतल्या अत्यंत गंभीर संकटांपैकी एक' असं करण्यात आलंय. पण अद्याप या संघर्षाचे पूर्ण तपशील स्पष्ट नाहीत.

भारतीय लष्करानं याविषयीचं अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात त्यांनी 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं आहे.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव या संपूर्ण प्रकरणावर बोलताना म्हणाले, "दोन्ही देशांच्या सीनिअर कमांडरमध्ये चर्चा झाली. या चर्चेनुसारच पुढे कृती होईल, असं आम्हाला वाटलं होतं."

"पण 15 जूनच्या रात्री चिनी लष्करांने अचानक कल बदलला. चीनने एकतर्फी निर्णय घेत 'जैसे थे' परिस्थिती फेटाळली आणि याचाच परिणाम म्हणून दोन्ही बाजूने हिंसक चकमक झडली. दोन्हीकडचे लोक दगावले. हे टाळता आलं असतं. मात्र, चीनने कराराचं प्रामाणिकपणे पालन केलं नाही."भारत आणि चीनच्या सीमेवर मे महिन्यापासून तणावाची स्थिती निर्माण झाल्याचं वृत्त येत आहे. 15 आणि 16 जूनला दोन्ही देशांच्या जवानांमध्ये झालेल्या संघर्षात 20 भारतीय जवानांचा मृत्यू झाला आहे.

कोरोना
लाईन

2) या संघर्षाची सुरुवात कधी आणि कशी झाली?

भारत-चीन सीमेवरच्या तणावाची सुरुवात एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापासूनच सुरू झाली होती. तेव्हा लडाखच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनच्या बाजूला चीनी जवान आणि अवजड वाहनांची वाहतूक वाढायला सुरुवात झाली होती, असं संरक्षणतज्ज्ञांचं म्हणणं आहे.

यानंतर मे महिन्यापासून सीमेवर चीनी जवानांच्या हालचाली रिपोर्ट व्हायला सुरुवात झाली. लडाखमध्ये सीमा निश्चित करणाऱ्या तळ्यात चीनी जवान गस्त घालत असल्याच्या बातम्या येऊ लागल्या.

यावरूनच तणाव वाढत गेला आणि संघर्ष उफाळला.

भारत चीन संघर्ष

3) भारत-चीन संघर्षाची कारणं काय आहेत?

2018-19 च्या संरक्षण मंत्रालयाच्या वार्षिक अहवालानुसार केंद्र सरकारने भारत-चीन सीमेवर 3812 किमी भूभाग रस्ता बांधणीसाठी चिन्हांकित केला होता. यापैकी 3418 किमी. लांबीचा रस्ता उभारण्याचं काम बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनला देण्यात आलं होतं. यापैकी अनेक योजना पूर्ण झाल्या आहेत.

लडाखमध्ये भारताकडून रस्ता बनवला जातोय ही चीनसाठी चिंतेची बाब आहे की, या चकमकीमागे दुसरं काही कारण आहे.

दोन्ही देशांच्या घडामोडींवर अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांशी बीबीसीने चर्चा केली. त्यांच्यानुसार लडाखमध्ये रस्ता बांधणे हे एक कारण असू शकतं पण हे एकमेव कारण नक्कीच नाहीय.

भारतानं कलम 370 रद्द करणं, काराकोरममधून चालणारा चीनचा व्यापार, सध्याची कोरोना व्हायरसची उद्भवलेली स्थिती, त्यानंतर भारतानं चीनी गुंतवणुकीबाबत उचललेली पावलं आणि चीनमधलं अंतर्गत राजकारण या संघर्षाची कारणं ठरत असल्याचं बोललं जात आहे.

या कारणांविषयी तुम्ही सविस्तपणे इथं वाचू शकता. 45 वर्षांत असं काय घडलं, की भारत-चीन आक्रमक झाले?

चीनचे जवान

फोटो स्रोत, Getty Images

4) हा संघर्ष इतका महत्त्वाचा का आहे?

जवळपास 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवरच्या संघर्षाला हिंसक वळण लागलं. यापूर्वी 1975 साली भारतीय सैन्याच्या गस्ती पथकावर अरुणाचल प्रदेशात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनी जवानांनी हल्ला केला होता. त्यात भारतीय जवानांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर सीमेवर तणाव असायचा. मात्र, त्यात कुणाचा मृत्यू झाला नाही.

1962 च्या युद्धानंतर लडाखमध्ये दोन्ही बाजूच्या लष्करात कुणी मृत्युमुखी पडलेलं नाही. तर त्यानंतर अरुणाचल प्रदेश आणि सिक्किममध्ये ज्या घटना घडल्या त्यातही 1975 नंतर दोन्ही बाजूला कुणाचाही मृत्यू झाला नव्हता.

दरम्यानच्या काळात दोन्ही देशांच्या प्रमुखांच्या बैठका होत होत्या. गाठीभेटी व्हायच्या. त्यामुळे असं वाटायचं की व्यापारासोबतच सीमेवरही सगळं सुरळित सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या 6 वर्षात 18 वेळा चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे.

जाणकारांच्या मते तब्बल 45 वर्षांनंतर सीमेवर हिंसक चकमक झाली आहे आणि गेल्या 6 वर्षात एवढ्या भेटी होऊनही सीमेवर आपले जवान ठार झाले आहेत. त्यामुळे सध्या भारत-चीन सीमेवर असलेली स्थिती जास्त गंभीर आहे.

भारतीय जवान

फोटो स्रोत, Getty Images

5. गलवान खोऱ्यात भारत आणि चीनचे किती सैनिक ठार झाले.

भारत आणि चीनच्या जवानांमध्ये झालेल्या हिंसक चकमकीत भारताचे 20 जवान शहीद झाले. हे सर्व जवान बिहार रेजिमेंटचे होते. सुरुवातीला 3 जवान शहीद झाल्याची बातमी आली. मात्र, नंतर भारतीय सैन्यदलानेच पत्रक काढत गंभीररित्या जखमी असणाऱ्या इतर 17 जवानांचाही मृत्यू झाल्याचं कळवलं.

भारतीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 18 जवानांवर लेहमधल्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इतर 58 जणांना किरकोळ जखमा झाल्या. यापैकी कुणीही गंभीर जखमी नाही.

चीन कुठल्याही युद्धात मृत्यू झालेल्या जवानांची संख्या कधीही सांगत नाही.

17 जूनला हाच प्रश्न चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत पीटीआय या वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीने विचारला. त्यांनी विचारलं की भारतीय प्रसार माध्यमांमध्ये चीनचे जवानही ठार झाल्याचं वृत्त दाखवण्यात येतंय. या बातमीची तुम्ही खात्री करू शकता का?

या प्रश्नाचं उत्तर देताना चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते चाओ लिजियान म्हणाले, "मी तुम्हाला सांगितलंच आहे की दोन्ही देशांचे जवान ग्राऊंडवर काही विशिष्ट मुद्दे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. माझ्याकडे अशी कुठलीच माहिती नाही, जी मी इथे देऊ शकतो. मला वाटतं आणि तुम्हीही बघितलं असेल की जेव्हापासून हे घडलं तेव्हापासून दोन्ही पक्ष चर्चेतून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. जेणेकरून सीमेवर शांतता प्रस्थापित व्हावी."

भारतीय सैन्य

फोटो स्रोत, Reuters

6) भारतीय जवानांनी शस्त्रं का उगारली नाहीत?

भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी ट्विट करत सांगितलं आहे, "सीमेवर सर्वच जवान शस्त्रास्त्र घेऊनच जातात. विशेषतः पोस्ट सोडताना त्यांच्याजवळ शस्त्रं असतातचं. 15 जून रोजी गलवान खोऱ्यातल्या जवानांजवळही शस्त्रं होती. मात्र, 1996 आणि 2005 सालच्या भारत-चीन करारांमुळे अनेक वर्षांपासून असा प्रघात आहे की फेस-ऑफच्या वेळी जवान फायरआर्म्सचा (बंदुकींचा) वापर करत नाहीत."

7) गलवान खोरं दोन्ही देशांसाठी महत्त्वाचं का आहे?

गलवान खोरं अक्साई चीनमध्ये येतं. गलवान खोरं लडाख आणि अक्साई चीनच्या मधे भारत-चीन सीमेजवळ आहे. या भागात प्रत्यक्ष नियंत्रण रेषा अक्साई चीनला भारतापासून वेगळं करते.

अक्साई चीनवर भारत आणि चीन दोन्ही दावा सांगतात. हे खोरं चीनच्या दक्षिणेकडच्या शिंजियांग आणि भारताच्या लडाखपर्यंत पसरलं आहे. हा भूभाग भारतासाठी सामरिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा भाग पाकिस्तान, चीनच्या शिंजियांग आणि लडाखच्या सीमेला लागून आहे.

1962 च्या युद्धादरम्यान गलवान नदीचा हा प्रदेश युद्धाचं मुख्य केंद्र होतं. या खोऱ्याच्या दोन्ही बाजूचे डोंगर सामरिकदृष्ट्या सैन्याला फायदेशीर आहेत. जूनच्या भर उन्हाळ्यातही इथे तापमान शून्य अंश सेल्सियसच्याही खाली असतं.

इतिहासाच्या जाणकारांच्या मते गुलाम रसूल गलवान या लडाखी व्यक्तीच्या नावावरून या खोऱ्याला गलवान हे नाव पडलं. गुलाम रसूलनेच हा प्रदेश शोधून काढला होता.

भारताचा दावा आहे की गलवान खोऱ्यात आपल्या बाजूला भारत रस्ते बांधणीचं काम करतोय. मात्र, चीनचा या बांधकामाला विरोध आहे.

दारबुक-श्योक-दौलत बेग ओल्डी रोडचा भारताला या संपूर्ण प्रदेशात फायदा होणार आहे. काराकोरम पासच्या जवळ तैनात असणाऱ्या जवानांना रसद पुरवण्यासाठी हा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे.

भारतीय जवान

फोटो स्रोत, Getty Images

8) प्रत्यक्ष नियंत्रण रेषा काय आहे? नियंत्रण रेषा आणि प्रत्यक्ष नियंत्रण रेषा यांच्यात फरक काय?

भारताची जमिनीवरची सीमा (लँड बॉर्डर) 15,106.7 किमी लांब आहे. एकूण सात देशांशी आपली सीमा लागून आहे.

केंद्र सरकारच्या माहितीनुसार हे 7 देश आहे : बांगलादेश (4096.7 किमी), चीन (3488 किमी), पाकिस्तान (3323 किमी), नेपाळ (1751 किमी), म्यानमार (1643 किमी), भूटान (699 किमी) आणि अफगाणिस्तान (106 किमी).

भारताची चीनला लागून 3488 किमी लांब सीमारेषा आहे. ही सीमा जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश या भागातून जाते.

ही सीमा तीन सेक्टर्समध्ये विभागली आहे. पश्चिम सेक्टर म्हणजे जम्मू-काश्मीर, मीडल सेक्टर म्हणजे हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड आणि पूर्व सेक्टर म्हणजे सिक्कीम आणि अरुणाचल प्रदेश.

मात्र, दोन्ही देशांमध्ये अजूनही निश्चित सीमा आखण्यात आलेली नाही. याचं कारण म्हणजे अनेक भूभागांवरून दोन्ही देशांमध्ये वाद आहे.

या वादांमुळे भारत आणि चीन यांच्यात अजून सीमा निश्चिती होऊ शकलेली नाही. मात्र, जैसे थे परिस्थिती कायम ठेवण्यासाठी प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) या संज्ञेचा वापर करण्यात येतो.

सात दशकं लोटून गेल्यानंतरही जम्मू आणि काश्मीरवरून भारत आणि पाकिस्तान यांच्यात वाद आहे. किंबहुना वादाचा हा मुख्य मुद्दा आहे. हा भाग सध्या नियंत्रण रेषेने विभागला गेला आहे. त्याचा एक भाग भारताकडे आहे तर दुसरा पाकिस्तानकडे.

याला भारत-पाकिस्तान नियंत्रण रेषा म्हणतात.

9) या तणावाचा दोन्ही देशांच्या द्विपक्षीय संबंधांवर काय परिणाम होऊ शकतो?

या प्रश्नाचं उत्तर देणं अवघड आहे. दोन्ही देशांमध्ये अजूनही चर्चा सुरू आहे. पुढचे काही महिने दोन्ही देशांसाठी निर्णायक असतील. जाणकारांच्या मते सद्य स्थितीतून मार्ग काढण्यासाठी सैन्य पातळीवर चर्चा करावी लागेल. शिवाय राजकीय पातळीवरूनही चर्चा करणं गरजेचं असणार आहे.

जुन्या स्थितीत परतण्याला किंवा दोन्ही देशांमधला तणाव दूर करणं, याला डिसएंगेजमेंट प्रक्रियाही म्हणतात. दोन्ही देशांनी म्हटलेलं आहे की ते चर्चेतूनच हा मुद्दा सोडवू इच्छितात.

10) भारत आणि चीनमध्ये आधी कधीकधी संघर्ष झाला होता?

दोन्ही देशांमध्ये 1962 ला पहिलं युद्ध झालं होतं. त्यानंतर 3 वेळा दोन्ही देशांमध्ये संघर्ष झाला आहे.

1962- भारत-चीन युद्ध, हे युद्ध जवळपास महिनाभर चाललं. लडाखपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत या युद्धाचा परिसर होता.

1967- नाथू लामध्ये चीन आणि भारतीय सैनिक मारले गेले होते. मृत सैनिकांच्या आकड्यांबाबत दोन्ही देशांकडून वेगवेगळे दावे करण्यात येतात.

1975- अरुणाचल प्रदेशातील गस्ती दलावर नियंत्रण सीमा रेषेजवळ चीनी सैनिकांनी हल्ला केला होता.

भारत आणि चीनच्या इतिहासात 2020 या वर्षाचा उल्लेखही आता 1962, 1967 आणि 1975 प्रमाणे केला जाईल. कारण 45 वर्षांनंतर भारत-चीन सीमेवर इतक्या संख्येने सैनिकांचा मृत्यू झालाय.

दोन्ही देशांसाठी सीमेवरील तणाव हा नवीन नाहीय. पण सीमा वादावर चर्चा सुरू असतानाही दोन्ही देशांचे राजकीय, व्यापारी आणि आर्थिक संबंध गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहेत.

11. भारत - चीन संघर्ष : आता पुढे काय?

याआधीच्या प्रश्नांमधून तुम्हाला या संघर्षाची पार्श्वभूमी तर कळली. आता आपण एका वेगळ्या प्रश्नावर चर्चा करू. तो म्हणजे आता पुढे काय होणार? दोन्ही देशांसमोर काय पर्याय आहेत.

जवाहरलाल नेहरू विद्यापिठातील माजी प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक एस. डी. मुनी सांगतात, "चीनबरोबर चर्चा करत असताना भारतानं रणभूमीवरही मजबूत रहायला पाहिजे."

संरक्षण तज्ज्ञ सुशांत सिंह यांच्या मते ही समस्या राजकीय चर्चेतून सुटू शकते. सध्या चीनबरोबर आपली लष्करी स्तरावरची चर्चा सुरू आहे. पण त्यातून तोडगा निघेलच असं नाही. या समस्येचा तोडगा हा राजकीय आणि मुत्सद्दी चर्चेतूनच निघेल.

ते पुढे सांगतात, "भारतानं गेल्या 6 वर्षांत राबवलेल्या परराष्ट्र धोरणाची ही परीक्षा असणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दोन-तीन वेळा चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी चर्चा केली आहे. आता हे पाहावं लागेल की भारतानं गेल्या सहा वर्षांत चीनबरोबरच्या मुत्सद्देगिरीत जी गुंतवणूक केली आहे त्याचा मोबदला काय मिळतो."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)