आहार : 'हे' 5 पदार्थ खाणं तुमच्या जीवावर का बेतू शकतं?

मानवी इतिहासात माणसाने अनेक प्रकारच्या वनस्पती आणि प्राणी खाऊन स्वतःची भूक भागवली आहे.

आज जगातल्या अनेक विद्यापीठांमध्ये खाण्याचे वेगवेगळे पदार्थ आणि त्यांचे मानवी शरीरावर होणारे परिणाम यावर संशोधन सुरू आहे.

जगभरातल्या वेगवेगळ्या समाजांमध्ये काही पदार्थ वर्ज्य आहेत असं सांगण्यात आलं आहे.

अनेकदा असं दिसतं की काही समाजांमध्ये एखादा पदार्थ फार आवडीने खाल्ला जातो. तर दुसऱ्या कुठल्यातरी समाजात तो पदार्थ वर्ज्य मानला जातो.

यामागे कारण आहे. मानवी शरीर आणि मन या दोघांवर पदार्थांचा होणारा परिणाम, त्यावरून तो पदार्थ खावा की खाऊ नये, हे ठरवलं जातं.

गेल्या काही वर्षातल्या संशोधनातून वैज्ञानिकांनी अशी काही विशिष्ट खाद्यपदार्थ शोधले आहेत ज्यांचा शरीरावर गंभीर परिणाम होऊ शकतो. प्रसंगी असे पदार्थ प्राणघातकही ठरू शकतात.

या लेखात आपण अशा पाच गोष्टी बघणार आहोत ज्यांची संपूर्ण माहिती तुम्हाला नसेल त्या न खाल्लेल्याच बऱ्या.

1. पफर मासा

हा एक असा मासा आहे जो साईनाईड या विषापेक्षाही विषारी मानला जातो. या माशात टेट्रोडोटॉक्सीन नावाचं विष असतं. हे विष अत्यंत वेगाने पसरतं.

हा मासा इतका घातक असूनदेखील जपानमध्ये या माशापासून बनवलेली 'फुगू डिश' लोकप्रिय आहे.

जपानमध्ये फुगू एखाद्या सूपबरोबर दिला जातो.

मात्र, ही डिश बनवण्यासाठी अनेक वर्षांच्या ट्रेनिंगची गरज असते. ही डिश बनवणारे शेफसुद्धा अनेक वर्ष प्रॅक्टिस करून नंतरच ग्राहकांना सर्व्ह करतात.

ही डिश बनवताना माशाचा मेंदू, त्वचा, डोळे, अंडाशय, लिव्हर आणि आतडी असे विषारी अवयव काढून घेतले जातात.

2. कासू-मारजू चीज

हा पदार्थ कशाचा बनलेला आहे हे ऐकलं तर तुम्हाला मळमळू शकतं. हा पदार्थ इटलीत फार प्रसिद्ध आहे.

हे चीज बनवताना यात उडणाऱ्या किड्यांच्या अळ्यांचा समावेश करतात.

काही काळानंतर या अळ्यांचे कीडे बनतात आणि हे कीडे चीजला इतकं मऊ करतात की चीजचा आतला भाग क्रीमसारखा होतो.

कासू मारजू चीज चविष्ट असतं. त्याचं कारणही हे किडेच आहेत.

मात्र, हे चीज खाणं वाटतं तितकं सोपं नाही. हे चीज खाताना त्यातले किडे पकडावे लागतात. कारण जागा मिळताच हे किडे 15 सेंटीमीटरपर्यंत उडू शकतात.

हा जगातला सर्वाधित घातक पदार्थ असल्याचं सांगितलं जातं. कारण, चीजमधले किडे मेले तर चीज खराब होतं.

त्यामुळे असं खराब झालेलं चीज खाल्यास पोटदुखी, उलट्या आणि डायरियाचा त्रास होऊ शकतो.

3. रुबाब

ब्रिटनच्या पदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या रुबाबलादेखील घातक मानलं जातं. मात्र, रुबाब कितपत विषारी आहे, यावरून वाद आहेत.

या रुबाबच्या पानांमध्ये ऑक्झॅलिक अॅसिड असतं. या अॅसिडमुळे किडनी स्टोन होण्याची शक्यता असते.

रुबाबमध्येदेखील हे अॅसिड असतं, असं काहींचं म्हणणं आहे. मात्र, रुबाबच्या पानांमध्ये त्याचं प्रमाण जास्त असतं.

4. लाल सोयाबीन

कडधान्य आरोग्यदायी मानले जातात. मात्र, काही कडधान्यं अशीही आहेत जी खाल्याने तुम्ही आजारी पडू शकता.

लाल सोयाबीन त्यातल्याच कडधान्यांपैकी एक.

यात प्रोटीन (प्रथिनं), फायबर (तंतूमय पदार्थ), व्हिटामीन (जीवनसत्वे) आणि मिनरल्स (खनिजं) असतात.

मात्र, यात एक विशिष्ट प्रकारचा फॅट (मेद), असतो. हे फॅट पचायला खूप अवघड असते.

लाल सोयाबीन खाण्यापूर्वी 12 तास पाण्यात भिजवावे लागतात. त्यानंतर उकळून त्यापासून पदार्थ बनवता येतो.

5. जायफळ

मसाल्यातला हा प्रसिद्ध पदार्थ इंडोनेशियातल्या झाडांपासून मिळतो. काही विशिष्ट बिस्किटं बनवायला जायफळ वापरतात. महाराष्ट्रीय जेवणातही पुरणपोळी, बासुंदी असे काही पदार्थ बनवताना जायफळ वापरतात. अगदी कॉफीतही जायफळ घातलं जातं.

मात्र, प्रमाणाबाहेर जायफळ खाल्यास मळमळ, वेदना, श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो. तसंच मानसिक झटकेही येऊ शकतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)