You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
पाकिस्तान: काश्मीर स्वतंत्र होण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत लढू - इम्रान खान
"काश्मीरचे लोक आपल्याकडं आशेनं पाहतायत. आपण त्यांच्या बाजूनं उभे राहत नाही, तोपर्यंत त्यांना विश्वास मिळणार नाही. त्यामुळं 27 सप्टेंबरपर्यंत प्रत्येकानं अर्धा तास सर्वकाही थांबवून घराबाहेर पडा."
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी पाकिस्तानी नागरिकांना उद्देशून भाषण केलं, तेव्हा त्यांनी हे आवाहन केलंय. 27 सप्टेंबरला इम्रान खान हे संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भाषण करणार आहेत. तोपर्यंत काश्मीरमधील खरी परिस्थिती जगापुढे मांडायची आहे, असं इम्रान खान यावेळी म्हणाले.
त्यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे -
- काश्मीरला स्वातंत्र्य मिळत नाही, तोपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत. आम्ही अखेरच्या श्वासापर्यंत लढू.
- नरेंद्र मोदी यांच्या चुकीमुळं काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य मिळवण्याची मोठी संधी मिळालीय. भारताच्या या पावलामुळं काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय बनलाय.
- मी काश्मीरचा राजदूत बनेन. काश्मीरमधील परिस्थिती जगभरात पोहोचवेन. ज्या ज्या राष्ट्रप्रमुखांशी मी आतापर्यंत बोललोय, त्यांना काश्मीरची परिस्थिती सांगितली. यापुढेही ज्यांच्याशी बोलेन, त्यांना काश्मिरात काय होतंय, ते सांगेन.
- संयुक्त राष्ट्रावर मोठी जबाबादरी आहे. त्यांनी विश्वास दिला होता की, काश्मीरमधील नागरिकांना हक्क मिळवून देऊ. मात्र त्यांनी तसं केलं नाही. आता काश्मिरींवर अन्याय होतोय. आता ही संयुक्त राष्ट्राची जबाबदारी आहे.
- मानवतावादावर विश्वास असणारे सव्वा अब्ज मुसलमान संयुक्त राष्ट्राकडे आशेनं पाहतायत. आता संयुक्त राष्ट्र न्याय देणार का?
- काश्मीरचा मुद्दा युद्धाकडे गेला तर लक्षात असू द्या की दोन्ही देशांकडे अण्वस्त्र आहेत. अण्वस्त्र युद्ध कुणीही जिंकणार नाही. आणि यामुळे नुकसान फक्त इकडेच होईल, असं नाही. संपूर्ण जगावर याचे परिणाम होतील. त्यामुळं सुपरपॉवर देशांवरही आता जबाबदारी आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)