काश्मीर कलम 370: पाकिस्तानमधल्या या हिंदूबहुल जिल्ह्यात काय सुरू आहे?

    • Author, वुसअतुल्लाह ख़ान
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

कच्छ-गुजरातच्या सीमेला लागून असलेल्या थरपारकर या पाकिस्तानी जिल्ह्याच्या सीमेवर माझा शनिवारचा दिवस गेला.

एकीकडे काश्मीरच्या नियंत्रण रेषेवर दररोज होणाऱ्या गोळीबाराचा मागमूस नसलेली अत्यंत शांत सीमा आणि दुसरीकडे कच्छच्या वाळवंटात भारतीय बीएसएफच्या चौक्या आहेत.

बीएसएफच्या चौक्यांच्या अगदी समोर पाकिस्तानी सीमेच्या आत चोरयो नावाचं गाव आहे. इथल्या ग्रॅनाईटच्या पर्वतावर शेरावाली माँचं मंदिर आहे. इथे भाविक आणि पर्यटकांची गर्दी असते.

चोरयो गावातील लहान-लहान मुलं पर्यटक आणि त्यांच्या ये-जा करणाऱ्या गाड्यांच्या पुढे-मागे पळत 'जय माता दी' म्हणत स्वागत करत असतात. आपल्याला एखादं नाणं, नोट, चिप्सचं पॅकेट किंवा चॉकलेट मिळेल, अशी आशा या चिमुकल्यांना असते.

शेरा वाली माँच्या मंदिराच्या कळसावर काश्मीरचा नवा झेंडा, तर छपरावर पाकिस्तानचा झेंडा लावण्यात आलाय.

इथे साध्या कपड्यांवरील तैनात असलेला पोलीस कर्मचारी वारंवार इथल्या पर्यटकांना सूचना देत होता की, "हा सीमाभाग असल्याने इथे फोटो काढायला मनाई आहे. या फोटोंचा शत्रू दुरुपयोग करू शकतो."

मात्र, त्या पोलिसाचं कुणीच ऐकताना दिसत नव्हता.

मुस्लिमांपेक्षा हिंदूंची संख्या अधिक असलेला थरपारकर हा पाकिस्तानमधील एकमेव जिल्हा आहे. कदाचित म्हणून इथल्या अनेक गाड्यांवर हल्ली पाकिस्तानचा झेंडा दिसून येतो आणि म्हणूनच इथल्या सर्वात मोठ्या चौकाचं नाव 'काश्मीर चौक' असं करण्यात आलंय.

ज्या देशात राहता, त्या देशाशी प्रामाणिक राहिलं पाहिजे आणि त्या प्रामाणिकतेवर कुणीही शंका घ्यायला नको.

मात्र, जेव्हा आपण काहीही न विचारता भारतीय मुसलमान देशभक्तीचा मुद्दा उपस्थित करत असू किंवा कुणी पाकिस्तानी हिंदू काश्मिरींच्या रक्षणाबाबत बोलत असेल की, की दोन दिवसांआधी कशाप्रकारे थारपारकरमध्ये लोकांनी उत्साहात मिरवणूक काढली होती, तर शंका येऊ लागते. कारण, आपण न विचारताच, त्यांना ते का सांगावं लागतंय?

अस्सल पत्रकार असणं आणि प्रत्येक गोष्टीत बातमी शोधणं हीच कदाचित माझं उदरनिर्वाहाचं साधन आहे. मात्र शक्यच झालं, तर माझ्यासाठी एकदा विचार करून पाहा की, शेरा वाली माता पाकिस्तानामध्ये असेल तर पाकिस्तानच्या बाजूनं विचार करणं आणि केवळ अडीच किलोमीटर सीमेच्या पलिकडे असेल तर तिनं भारताच्या बाजूनं विचार करणं गरजेचं असतं, असं समजलं जातं.

कधी धर्म मोठा, देश छोटा, तर कधी देश छोटा आणि धर्म मोठा असतो, याचं नेहमी एकच उत्तर देणं शक्य नसेल, तर आपण एकमेकांबद्दल जाणूनबुजून चांगलं किंवा वाईट करत असू, तर ते का करतोय? याचा विचार करायला हवा.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)