पृथ्वीवर आलेलं संकंट टाळण्यासाठी आपण करू शकतो हे 5 उपाय

"Act now, or risk a major crisis!"

तात्काळ कृती करा अन्यथा मोठ्या संकटाला सामोरे जावे लागेल. जागतिक पातळीवर प्रचंड तापमानवाढीच्या पार्श्वभूमीवर जगातल्या अग्रगण्य शास्त्रज्ञांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

पूर्व औद्योगिक काळानंतर केवळ 12 वर्षांत पृथ्वीचं तापमान 1.5 सेल्सिअसचा टप्पा ओलांडू शकतं असं IPCC अर्थात UN Intergovernmental Panel on Climate Changeने हाती घेण्यात आलेल्या संशोधनात म्हटलं आहे.

यामुळे भयंकर दुष्काळ, वणवे, विनाशकारी पूर अशा धोकादायक संकटांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. या आपत्तींच्या बरोबरीने लक्षावधी लोकांना तीव्र अन्नटंचाईचा सामना करावा लागू शकतो.

पृथ्वीवर असलेल्या संकटाचा धोका टाळण्यासाठी वेगवान, व्यापक पातळीवर बदल करणं आवश्यक आहे.

आपण स्वत: काय करू शकतो?

अनेक साध्यासाध्या गोष्टी आपण करू शकतो असं अरोमर रेवी यांनी सांगितलं. IPCCच्या अहवालात अरोमर हे मुख्य लेखक आहेत.

तापमानवाढ आटोक्यात आणण्यासाठी नागरिक आणि ग्राहकांना काळजीपूर्वक पावलं उचलावी लागतील. दैनंदिन जीवनात ताबडतोब कोणते बदल करू शकतो याची ही माहिती.

1. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करा

बस, रेल्वे, मेट्रो यासारख्या सार्वजनिक वाहतूक यंत्रणेद्वारे प्रवास करणं कधीही हिताचं. ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे चालत किंवा सायकलने प्रवास करावा. चारचाकी गाडीच्या तुलनेत सार्वजनिक वाहतूक यंत्रणा कार्बन उत्सर्जन कमी प्रमाणात करतात. चालणं आणि सायकलने प्रवास करणं यानं आपल्या आरोग्यासही फायदा होतो.

शहरात फिरताना कसं फिरायचं याबाबत योग्य निर्णय घेणं आपली जबाबदारी आहे. शहरात पुरेशा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था नसेल तर अशी यंत्रणा उभारतील अशा राजकारण्यांना निवडून आणणं ही आपली जबाबदारी असल्याचं, डॉ. डेबरा रॉबर्ट्स यांनी सांगितलं. रॉबर्ट्स IPCCचे सहअध्यक्ष आहेत.

तुम्हाला अगदीच आवश्यक असेल तर इलेक्ट्रॉनिक कार वापरा. विमानापेक्षा ट्रेनची निवड करा.

अनावश्यक बिझनेस ट्रिप रद्द करा आणि व्हीडिओ कॉन्फरन्सिंगचा पर्याय स्वीकारा.

2. ऊर्जा वाचवा

वीजनिर्मितीसाठी जीवाश्म इंधनांच्या बळावर चालणाऱ्या टंबल ड्रायरऐवजी वॉशिंग लाइनचा उपयोग करा.

हवा थंड करण्यासाठी उच्च तापमान वापरा तर हवेत उष्णता निर्माण करण्यासाठी कमी तापमान वापरा.

थंडीच्या दिवसांमध्ये घरातली उष्णता बाहेर जाऊ नये यासाठी छताला आच्छादन करा.

वापर करत नसाल तेव्हा घरातली उपकरणं बंद करून ठेवा.

हे खूप छोटे बदल वाटू शकतात परंतु ऊर्जासंचयात त्यांचा वाटा मोठा असतो.

पुढच्या वेळी एखादं इलेक्ट्रॉनिक उपकरण घेण्यासाठी बाजारात जाल, त्यावेळी त्या उपकरणाची एनर्जी एफिशिअन्सी अर्थात ऊर्जा संवर्धनाची क्षमता जाणून घ्यायला विसरू नका. एनर्जी स्टार लेबल आठवणीने पाहा.

ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे अपारंपरिक ऊर्जास्रोतावर चालणारी म्हणजेच सौरऊर्जेवर चालणारी उपकरणं वापरा.

3. मांसाहार कमी करा किंवा शाकाहारीच व्हा.

चिकन, फळं, भाज्या आणि कडधान्यांच्या तुलनेत रेड मीटच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर हरितवायू उत्सर्जकं बाहेर पडतात.

पॅरिस इथे हवामान बदलासंदर्भातील परिषेदत 119 देशांनी शेतीच्या माध्यमातून उत्सर्जित होणारे हरितवायू कमी करण्याची प्रतिज्ञा केली आहे.

मात्र या प्रतिज्ञेचं पालन करण्यासाठी ते काय उपाययोजना आखणार याबाबत कोणत्याही देशाने ठोस योजना मांडली नाही.

पण तुम्ही कृतीतून या अभियानासाठी मदत करू शकता.

आहारातून मांसाहाराचं प्रमाण कमी करा आणि अधिकाअधिक शाकाहारी पदार्थांचा आस्वाद घ्या.

मांसाहार सोडणं तुम्हाला खूपच कठीण वाटत असेल, तर सुरुवातीला एक आठवडा मांसाहाराविना राहण्याचा प्रयत्न करा.

हरितवायूंचं मोठ्या प्रमाणावर उत्सर्जन करण्यात डेअरीजन्य पदार्थांचा वाटा मोठा असतो. म्हणूनच डेअरीसंलग्न पदार्थ आहारातून कमी करू शकता.

आपल्याच भागात तयार होणारे पदार्थ खाण्यावर भर द्या आणि कमीत कमी अन्न टाका.

4. पाण्याचा वापर कमी करा

पाण्याच्या पुनर्वापराचे फायदे आपल्याला वेळोवळी सांगण्यात आले आहेत.

मात्र पुनर्वापरासाठी वस्तूंची नेआण आणि त्यावर प्रक्रिया करण्यात मोठ्या प्रमाणावर कार्बन उत्सर्जन होतं.

नव्याने वस्तू तयार करण्यापेक्षा पुनर्वापरात कमी वेळ आणि ऊर्जा लागते. मात्र वस्तूंचा पुन्हापुन्हा वापर केल्यास कमीत कमी नुकसान होऊ शकतं.

हे पाण्यालाही लागू आहे.

"आपण जास्तीतजास्त पाण्याचं संवर्धन केलं पाहिजे. अधिकाअधिक पाण्याचा पुनर्वापर केला पाहिजे. जमिनीवर पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचा थेंबनथेंब कसा साठवता येईल याचा विचार व्हायला हवा," असं अरोमर यांनी सांगितलं.

5. लोकांना जागृत करा.

हवामान बदलाविषयी लोकांना माहिती द्या. त्याच्या परिणामांबद्दल जागृती निर्माण करा

शाश्वत समाजजीवनासाठी एकमेकांशी चर्चा करा.

नैसर्गिक वातावरणासाठी कोणत्या गोष्टी संयुक्तपणे वापरता येतील याचा आढावा घ्या.

प्रत्येकाने या छोट्या छोट्या गोष्टी अमलात आणल्या तर लक्षावधी लोकांना त्यांच्या जीवनात सुधारणा झाल्याचं अनुभवता येईल असं अरोमर यांनी सांगितलं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)