You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
5G आल्यावर आपल्या आयुष्यात काय बदल होतील?
- Author, जोनाथन अॅमोस
- Role, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी
येणारा काळ हा 5Gचा असणार आहे. भारतात लवकरच 5G हायस्पीड इंटरनेट सेवेची सुरुवात होण्याची चिन्हं आहेत. 5G स्पेक्ट्रमच्या लिलावा केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी (15 जून) मंजुरी दिसी आहे.
ही सेवा आल्यानंतर इंटरनेटचा स्पीड 10 पटीनं वाढणार आहे. 5G आल्यानंतर आपल्या आयुष्यात काय फरक पडू शकतो? जसं 3G आणि 4Gच्या वेळी करावं लागलं होतं, तसं लोकांना पुन्हा नवे फोन विकत घ्यावे लागतील का?
गावागावांत इंटरनेट पोहोचेल का? या प्रश्नांची उत्तरं शोधण्यापूर्वी आपल्याला हे तंत्रज्ञान काय आहे, हे आधी समजून घ्यावं लागणार आहे. या तंत्रज्ञानाला मोबाइल इंटरनेटची पाचवी पिढी मानलं जात आहे. 5Gचा स्पीड 4Gपेक्षा अनेक पटींनी जास्त असणार आहे. हे तंत्रज्ञान रेडिओ स्पेक्ट्रमच्या उत्तम वापराचं एक उदाहरण ठरेल आणि यामुळे अनेक डिव्हाइस एकत्र जोडता येतील.
"हे तंत्रज्ञान आल्यावर इंटरनेटचा वापर प्रभावीरीत्या करता येईल आणि जलदगतीने आपली कामं पूर्ण होतील," असं मोबाइल डेटा अॅनालिटिक्स कंपनी ओपन सिग्नलचे अधिकारी लॅन फॉग यांनी म्हटलं आहे. ते म्हणतात, "हायस्पीड इंटरनेटमुळे शहरं स्मार्ट होतील. अजून बरंच काही करता येईल ज्याचा अजून आपण विचार पण करू शकत नाहीत."
कल्पना करा की, आपल्याला एखाद्या ठिकाणी आपत्ती निवारणाचं कार्य करायचं आहे. त्या ठिकाणचा अंदाज घेण्यासाठी आपण ड्रोन्सचा वापर करत आहोत किंवा एखाद्या इमारतीला आग लागली आहे त्या ठिकाणी ड्रोन्सचा वापर करून परिस्थिती समजून घेत आहोत. हे ड्रोन्स एकमेकांसोबत वायरलेस तंत्रज्ञानाने जोडलेले आहेत आणि त्याचबरोबर कंट्रोल रूमसोबत देखील त्यांचा संपर्क आहे.
स्वयंचलित कारदेखील एकमेकांशी संपर्क साधू शकतील आणि मॅप्सशी संबंधित डेटा लाइव्ह शेअर करू शकतील. आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा होतील. त्याने नक्कीच आपल्या आयुष्यात बदल होऊ शकेल.
हे कसं शक्य आहे?
अद्याप 5Gचा निश्चित प्रोटोकॉल तयार करण्यात आलेला नाही. 5G हाय फ्रिक्वेन्सी बॅंडवर काम करण्याची शक्यता आहे. 3.5GHz से 26GHz या बॅंडवर किंवा याहून अधिक क्षमतेच्या बॅंडवर काम 5G चालेल. या फ्रिक्वेन्सी बॅंडमध्ये वेव्हलेंथ छोट्या असतात. अडचण ही आहे की, छोट्या वेव्हलेंथला आरामशीर थांबवता येऊ शकतं.
असं होऊ शकतं की, मिलिमीटर वेव्हला प्रसारित करण्यासाठी कमी उंचीचे टेलिफोन टॉवर लावावे लागतील, जे एकमेकांपासून जवळ असतील.
4Gपासून कसं वेगळं आहे?
हे तंत्रज्ञान 4Gपासून पूर्णपणे स्वतंत्र असेल. हे नव्या रेडियो टेक्निकवर काम करू शकेल. सुरुवातीला ते ओरिजनल स्पीडवर काम करू शकेल की नाही याबाबत शंका आहे, कारण ज्या टेलिकॉम कंपन्या यामध्ये गुंतवणूक करणार आहे त्यांच्यावर ते अवलंबून राहील.
सध्या 4Gवर सर्वाधिक स्पीड 45 एमबीपीएस पर्यंत मिळू शकतो. चिप बनवणारी कंपनी क्वालकॉमचा असा अंदाज आहे की, 5Gनं 10 ते 20 पट अधिक स्पीड वाढू शकतो.
म्हणजे याचाच अर्थ एखादा HD सिनेमा तुम्ही एक-दोन मिनिटांत डाउनलोड करू शकता.
कधीपर्यंत येईल?
बहुतेक देशांमध्ये 2020पर्यंत 5G लाँच होऊ शकतं. कतारच्या एका कंपनीचं म्हणणं आहे की, ही सेवा त्यांनी लाँच केली आहे. दक्षिण कोरियात पुढच्या वर्षीपर्यंत काम सुरू होईल. चीन पुढच्या वर्षी 5G लाँच करू शकतं.
भारतात कधीपर्यंत येईल 5G
भारतात 5G येण्यासाठी वेळ लागण्याची शक्यता आहे. टेलिकॉम तज्ज्ञ आशुतोष सिन्हा म्हणतात, "या तंत्रज्ञानात टेलिकॉम कंपन्यांनी गुंतवणूक करणं परवडण्यासारखं नाही. भारतीय टेलिकॉम बाजारात तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. कंपन्यांना नफा कमवणं कठीण झालं आहे. अशा स्थितीमध्ये मोठी गुंतवणूक करणं आव्हानात्मक होईल. याची दुसरी बाजू अशी आहे की, ग्राहकांची 5G सेवेसाठी जास्त पैसे मोजण्याची तयारी आहे का? भारतीय बाजारात 4G सेवा अतिशय स्वस्त दरात उपलब्ध आहे. अशा स्थितीत 5Gसाठी वेगळे पैसे कोण मोजणार?"
फोन बदलावा लागेल का?
याचं उत्तर आत्ताच देता येणं कठीण आहे. बहुतेक बदलावा लागेल. कारण जेव्हा 4G आलं तेव्हा फोन बदलावा लागला होता. असंही असं शकतं ही सेवा सिमकार्डशिवायही चालू शकेल. अनेक कंपन्या या तंत्रज्ञानावर काम करत आहेत. हे तंत्रज्ञान गावांगावांत पोहोचू शकतं पण सगळ्यांना हे परवडणारं असेल की नाही हे आत्ताच सांगणं कठीण आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)