You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कानपूर अपघात : अनेक कुटुंबं उजाडली, कुणाचा पोटचा गोळा गेला तर कुणाचा आधार हरवला - ग्राऊंड रिपोर्ट
- Author, अंकित शुक्ला,
- Role, बीबीसी हिंदीसाठी, कानपूरहून
कानपूरच्या घाटमपूर येथील कोरथा गावात सुमारे 300 घरं आहेत. यापैकी 8 घरांवर आलेल्या आपत्तीने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
ट्रॅक्टर अपघातात मारल्या गेलेल्यांचं शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचे मृतदेह शनिवारी (1 ऑक्टोबर) रात्री उशीरा गावात पाठवण्यात आले. यावेळची परिस्थिती ही अत्यंत हृदयद्रावक होती.
रामदुलारे यांच्या घरी 6 मृतदेह आले आहेत. ज्ञानवतीच्या कुटुंबातील 12 जणांचा मृत्यू झाला. त्यांचंच कुटुंब हे मुलाचं जावळ काढण्यासाठी उन्नाव येथील देवस्थानी गेलं होतं.
सर्वच्या सर्व 26 जणांच्या अंत्यविधीसाठी रविवारी सकाळी गावात एका ठिकाणीच तयारी करण्यात आली. या अपघातात कुणाची पत्नी, तर कुणाच्या मुलां यांचा समावेश आहे.
सकाळी सगळे मृतदेह अंत्यविधीसाठी कानपूरच्या डेओढी घाटावर नेण्यात आले. याठिकाणी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना, मंत्री अजित पाल आणि राकेश सचान यांच्यासह अनेक भाजप नेते दाखल झाले होते.
कानपूरमध्ये घाटमपूरजवळ एक ट्रॅक्टर ट्रॉली तलावात पलटी झाली होती. शनिवारी रात्री ही घटना घडली. या अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये सुमारे 50 जण बसले होते.
उन्नावच्या चंद्रिकादेवी मंदिर येथे जावळाचा कार्यक्रम आटोपून सगळे जण परत येत होते. हे सर्व नागरिक कोरथा गावचे रहिवासी होते. मृतांमध्ये 13 महिला तर 13 मुलं आहेत.
अपघातात जखमी झालेल्यांवर कानपूरच्या लाला लाजपत राय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
या अपघातावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शोक व्यक्त केला आहे. तसंच नुकसान भरपाईची घोषणाही करण्यात आली आहे.
कानपूरचे जिल्हाधिकारी विशाख जी. अय्यर यांनी 26 जणांच्या मृत्यूची माहिती दिली आहे.
घटनास्थळी पोहोचण्यात उशीर केल्याप्रकरणी कानपूर परिक्षेत्राचे महानिरीक्षक भानू भास्कर यांनी पाच पोलिसांना निलंबित केलं आहे.
या अपघाताचं कारणही समोर आलं आहे.
चालक दारू प्यायला होता...
या अपघातातून बचावलेल्या सुशीलने सांगितलं, "गावातील रहिवासी राजू निषाद याच्या मुलाच्या जावळाचा कार्यक्रम होता. शिवाय, राजू हाच ट्रॅक्टर चालवत होता. त्याने दारू प्यायलेली होती. तसंच तो अत्यंत वेगाने ट्रॅक्टर चालवत होता. प्रवाशांच्या विरोधानंतरही त्याने वेगाने वाहन चालवणं सुरूच ठेवलं होतं."
ते म्हणाले, "साढ आणि गंभीरपूर गावादरम्यान रस्त्यात एका ठिकाणी खड्डा होता. तिथून ट्रॅक्टर जात असताना अचानक एक दुचाकी समोर आली. त्यानंतर हा अपघात घडला."
विशेष म्हणजे, राजू निषाद अपघातातून बचावला असून सध्या तो फरार आहे.
रात्रभर घाटमपूर तालुक्यातील एका रुग्णालयात सर्व मृतांचं शवविच्छेदन करण्यात आलं. 10 डॉक्टरांच्या पथकाने पोस्टमार्टमचं हे काम पूर्ण केल्यानंतर पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास मृतदेहांची रवानगी कोरथा गावी करण्यात आली.
महानिरीक्षक भानू भास्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही सीसीटीव्ही फुटेज मिळाले आहेत, ज्यामध्ये ट्रॅक्टर चालक अत्यंत वेगाने वाहन चालवताना दिसून येतं. या प्रकरणाची न्यायाधीशांकडून चौकशी करण्यात येणार आहे.
गावात शोककळा
कोरथा गावातील रहिवासी शिवेंद्र यांच्या एका बहिणीचा अपघातात मृत्यू झाला. तर दुसऱ्या बहिणीवर उपचार सुरू आहेत.
शिवेंद्र म्हणाले, "शनिवारी संध्याकाळी सव्वा सात वाजता फोन वाजला. आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा 20 जणांचा मृत्यू झाला होता. अनेकजण ट्रॉलीच्या खालून आरडाओरडा करत होते."
अनेकांचा मृत्यू ट्रॉलीच्या खालील बाजूस पाण्यात बुडूनच झाला आहे. शिवेंद्र ट्रॅक्टर चालक राजूवर प्रचंड संतप्त आहे. आम्ही राजूला गावात राहू देणार नाही, त्याने संपूर्ण गाव उद्ध्वस्त केलं, असं शिवेंद्रनी म्हटलं.
या अपघातात गावातील कित्येक कुटुंबांमध्ये जिवितहानी झाली असली तरी राजूच्या कुटुंबातील कुणीही यामध्ये दगावलं नाही.
अनेक कुटुंबं उद्ध्वस्त
गावातील तारादेवी यांच्या कुटुंबातील अनेकांनी या अपघातात प्राण गमावले. आता त्यांची दोन मुलं राम दुलारे आणि शिवराम हेच फक्त जिवंत वाचले आहेत. या कुटुंबातील 6 जणांचा अपघातात मृत्यू झालाय.
गावातील उषा या महिलेचा मृत्यू अपघातात झाला. तिच्या नवऱ्याचा यापूर्वीच मृत्यू झालेला होता. त्यामुळे आता त्यांच्या घरात तीन अनाथ मुले उरली आहेत.
मुख्यमंत्र्यांचं आवाहन
अपघातानंतर योगी आदित्यनाथ यांनी ट्विटर हँडलवरून नागरिकांना आवाहन केलं आहे.
ते म्हणाले, "ट्रॅक्टर ट्रॉली आणि लोडरसारख्या मालवाहतूक करणाऱ्या वाहनांचा वापर प्रवासी वाहतुकीसाठी करू नये. जीवन अमूल्य आहे. निष्काळजीपणा करू नका."
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ रविवारी जखमींना भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. त्यांनी डॉक्टरांना आवश्यक ते सर्व उपचार करण्याची सूचना दिली.
पंतप्रधान मदतनिधीमधूनही मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी दोन लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. राज्याकडूनही इतकीच मदत देण्यात येईल.
NCRBच्या 2021च्या अहवालानुसार, उत्तर प्रदेशात रस्ते अपघातात सर्वाधिक मृत्यू हे कानपूरमध्येच झाले आहेत.
कानपूरमध्ये गेल्या वर्षी 593 जणांचा मृत्यू झाला, तर 299 जण जखमी झाले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)