UK मध्ये हिंदू-मुस्लीम तणाव, 47 जण अटकेत, लोक म्हणतात, ‘कमावलेली इज्जत गेली’

ब्रिटनच्या लेस्टर शहरात हिंदू आणि मुस्लीम युवकांमध्ये संघर्ष झाला असून पोलिसांनी 47 लोकांना अटक केली आहे. हिंदू मुस्लीम गटात तणाव निर्माण होण्याची ही पहिली घटना नाही. या तणावाची सुरुवात 28 ऑगस्टला झालेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यानंतर झाली होती.

इंग्लंडच्या पूर्व मिडलँड्समध्ये वसलेल्या शहरात 37 टक्के लोक दक्षिण आशियाई आहेत. त्यातही बहुतांश लोक भारतीय आहेत.

लेस्टरच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, लोकांनी एकमेकांवर हल्ला करताना 16 पोलीससुद्धा जखमी झाले आहेत. या घटनेत एक कुत्राही जखमी झाला.

दोन पक्षात तणाव निर्माण झाल्याची बातमी कळल्यावर महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या अंतिमसंस्कार कार्यक्रमात तैनात झालेल्या पोलीस अधिकाऱ्यांचा वेळ तिथला तणाव शांत करण्यात गेला.

पोलिसांनी सांगितलं की शनिवारी झालेल्या एका तणावाची सुरुवात निदर्शनांनी झाली होती. त्याची परवानगी देण्यात आली नव्हती.

त्यानंतर रविवारी झालेल्या एका आंदोलनात 100 लोक सहभागी झाले होते.

मात्र पोलिसांच्या मते रविवारी झालेल्या आंदोलनात कोणत्याही प्रकारची अप्रिय घटना घडल्याचं समोर आलेलं नाही.

स्थानिक लोकांची प्रतिक्रिया

या हिंसाचाराचा बळी ठरलेल्या बेलग्रेव रस्त्यावरील एका रेस्टॉरेंटचे मालक धर्मेश लखानी यांनी बीबीसीशी बोलताना काळजी व्यक्त केली.

ते म्हणतात, "आम्ही आमच्या सहकारी, कर्मचारी, आणि ग्राहकांबद्दल चिंतेत आहोत. ते खूप घाबरले आहेत असं ते म्हणताहेत आणि बुकिंग रद्द करण्याचं म्हणत आहेत."

धर्मेश लखानी यांच्यासाठी हे अतिशय त्रासदायक होणार आहे कारण महागाईमुळे आधीच त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शनिवारी ही घटना याचि देही याचि डोळा पाहण्याऱ्या लोकांपैकी धर्मेश एक आहेत.

ते सांगतात, "पोलीस हा हिंसाचार थांबवण्यासाठी बराच प्रयत्न करत होते. हे सगळं माझ्या शहरात होत आहे हे पाहून मला अतिशय वाईट वाटत होतं"

त्याबरोबरच ते म्हणतात, "या स्थितीत सुधार होण्यासाठी आणि लेस्टरमध्ये शांतता प्रस्थापित होण्यासाठी दोन्ही पक्षात चर्चा आणि एकमेकांचा स्वीकार करण्याची गरज आहे."

धर्मेश यांच्याप्रमाणे यास्मिन सुर्ती सुद्धा गेल्या 40 वर्षांपासून इथं राहत आहेत.

ते सांगतात की, "इथे हिंदू, मुसलमान, शीख आणि कृष्णवर्णीय वंशांचे लोक एकत्र राहत आहेत. आम्ही एकत्र काम केलं आहे. आतापर्यंत अशी घटना कधीही घडली नाही."

या परिसरात त्यांचं बालपण व्यतित करणारे अहमद सुद्धा यास्मिन आणि धर्मेश यांच्याशी सहमत आहे.

ते सांगतात, "इथले काही लोक हिंदुत्ववादी विचारसरणीचे आहेत. ते इथल्या लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हा गट बराच नवीन आहे. लेस्टरमध्ये जी परिस्थिती आधी कधीच उद्भवलेली नव्हती. काही लोकांमुळे इथली शांतता भंग झाली आहे आणि हिंदू समाज नाराज आहे."

लोक तणावात आहेत आणि असं व्हायला नको आहे, असंही ते पुढे म्हणाले.

शांततेचं आवाहन

लेस्टरस्थित मुस्लीम संस्थांशी निगडीत सुलेमान नगदी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आम्ही रस्त्यावर जे पाहिलं ते सावधगिरीचा इशारा देणारं आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्यानंतर तणाव निर्माण होतो. पण इतका होत नाही. आम्हाला शांतता हवी आहे. हा गोंधळ थांबायला हवा. हे लगेच व्हायला हवं. काही असंतुष्ट लोक तणाव निर्माण करत आहेत. हा तणाव निर्माण करण्यासाठी त्यांनी आपल्या मुलांना समजावायला हवं."

लेस्टर येथील इस्कॉन मंदिराशी निगडत प्रद्युम्न गज्जर सांगतात, "लेस्टरमध्ये जे सुरू आहे ते अतिशय दु:खद आणि लाजिरवाणं आहे. संपूर्ण देश महाराणीच्या निधनामुळे दु:खात आहे. अशा परिस्थितीत 40-50 वर्षांत या समुदायाने जे नाव आणि इज्जत कमावलं होतं ते खराब झालं आहे."

भारतीय उच्चायुक्ताने या घटनेवर प्रतिक्रिया देताना म्हटलं, "आम्ही लेस्टरमध्ये भारतीय संप्रदायाच्या विरोधात झालेल्या हिंसाचाराची निंदा करत आहोत."

या वक्तव्यात असं सांगितलं गेलं की, "आम्ही हे प्रकरण ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या समोर उपस्थित केलं आहे. या हल्ल्यात सामील झालेल्या लोकांविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. आम्ही पीडित कुटुंबियांना सुरक्षा उपलब्ध करून देण्यास सांगितलं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)