You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
स्वातंत्र्य दिनानंतर तिरंगा कसा सांभाळायचा? ध्वज खराब झाला तर?
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान आपल्या घरावर तिरंगा फडकावावा, असं आवाहन लोकांना केलं. त्याला प्रतिसाद देत अनेकांनी आपापल्या घरावर तिरंगा फडकवला. पण स्वातंत्र्यदिन झाल्यानंतर हा ध्वज कसा सांभाळायचा?
समजा ध्वज खराब झाला असेल किंवा फाटला असेल तर अशावेळी ध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेत तिरंग्याचं काय करायचं? ध्वजसंहितेमध्ये त्याबद्दल काय सांगितलं आहे?
पण हे जाणून घेण्याआधी भारताची ध्वजसंहिता काय आहे ते पाहूया.
ध्वजसंहिता काय आहे?
राष्ट्रध्वज फडकावण्यासाठी ध्वजसंहिता 2002 चं पालन करावं लागतं. तसंच राष्ट्रीय प्रतिक अपमान विरोधी कायदा 1971 चंही पालन करावं लागतं.
या संहितेच्या 2.1 या कलमानुसार सामान्य नागरिकांना राष्ट्रध्वजाचा पूर्ण मान ठेवून कोणत्याही ठिकाणी ध्वज फडकावण्यावर बंदी नाही.
राष्ट्रध्वजाचा अपमान केल्यास मात्र तीन वर्षं तुरुंगवास आणि पहिल्यांदाच गुन्हा केल्यास दंड करण्याची तरतूद आहे.
26 जानेवारी 2002 ला ही संहिता अस्तित्वात आली. याआधी राष्ट्रीय प्रतिकं आणि नावं कायदा 1950 आणि राष्ट्रीय प्रतीक अपमान विरोधी कायदा 1971 अस्तित्वात होता.
या संहितेत नुकतेच दोन मोठे बदल करण्यात आलेत.
20 जुलै 2022 ला केलेल्या सुधारणेनुसार आता राष्ट्रध्वज दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेला फडकावता येईल. मग तो खुल्या जागेवर किंवा घरावर असेल तरीही तो फडकावण्याची परवानगी देण्यात आली आहे.
या आधी राष्ट्रध्वज सूर्योदय ते सूर्यास्त या काळातच फडकावण्याची परवानगी होती.
30 डिसेंबर 2021 ला केलेल्या बदलानुसार पॉलिस्टरच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी दिली होती. याआधी फक्त खादीच्या कापडाचा ध्वज तयार करण्याची परवानगी होती.
या ध्वजसंहितेप्रमाणे भारताचा राष्ट्रध्वज फडविण्याचे काही नियम आहेत. त्या नियमांनुसारच हर घर तिरंगा मोहिमेअंतर्गत ध्वज फडकवणं आवश्यक होतं. या नियमानुसार-
1. ध्वज फडकावताना तो फाटलेला, मळलेला किंवा चुरगळलेला नसावा. तो व्यवस्थित ठिकाणी फडकावावा.
2. भारताच्या राष्ट्रध्वजाच्या ज्या उंचीवर फडकावला आहे त्याच्या बरोबरीच्या लांबीवर किंवा त्यापेक्षा उंचीवर कोणताही इतर ध्वज फडकावू नये.
3. कोणत्याही प्रकारच्या सजावटीसाठी ध्वजाचा वापर करू नये.
4. ध्वज फडकावताना नारिंगी रंग वर राहील याची दक्षता घ्यावी.
5. ध्वजस्तंभावर किंवा ध्वजाच्या वर, फुलं, पानं, फुलांचे हार ठेवू नये.
6. ध्वजावर काहीही लिहू नये. कोणतीही वस्तू झाकण्यासाठी त्याचा वापर करू नये.
7. ध्वजारोहणासाठी झेंडा तयार करताना त्यात फुलं गरज असल्यास ठेवता येतील.
8. राष्ट्रध्वज फरशीवर पडलेला नसावा, तसंच पाण्यावर तरंगलेला नसावा.
9. कोणत्याही प्रकारच्या वेशभूषेवर, ध्वजाचा वापर करू नये. तसंच तो कमरेच्या खाली गुंडाळू नये. रुमाल, सोफ्याचे कव्हर, नॅपकिन, अंतरवस्त्रं यासाठी कापड म्हणून त्याचा वापर करू नये.
10. जेव्हा ध्वज फडकावतो तेव्हा तो ध्वजस्तंभाच्या उजव्या बाजूला असावा.
स्वातंत्र्यदिनानंतर ध्वज कसा सांभाळायचा?
स्वातंत्र्यदिनानंतर राष्ट्रध्वज नीट सांभाळून ठेवणं गरजेचं आहे. तो मळणार, फाटणार किंवा खराब होणार नाही याची काळजी घेत तो सांभाळायचा असतो.
पण समजा जर राष्ट्रध्वज खराब झालाच किंवा फाटला तर तो कुठेतरी बाजूला ठेवून देऊ नये किंवा त्याचा अवमान होईल अशा पद्धतीनं इकडेतिकडे टाकू नये.
ध्वज खराब झाला किंवा फाटला तर...
भारतीय ध्वज संहितेमधील परिच्छेद 2.2 नुसार -
• जर राष्ट्रध्वज खराब झाला असेल किंवा फाटला असेल तर पूर्णपणे एकांतामध्ये तो नष्ट करावा. शक्यतो तो जाळावा किंवा राष्ट्रीय ध्वजाचा अपमान होणार नाही याची काळजी घेऊन तो नष्ट करावा. एखाद्या पेटीत ठेवून तो जमिनीत पुरला जाऊ शकतो. त्यानंतर तिथे उभं राहून दोन मिनिटं मौन बाळगावं.
• राष्ट्रध्वज हा जर कागदी असेल तर लोकांनी तो जमिनीवर टाकून देऊ नये. राष्ट्रध्वजाच्या सन्मानाचा विचार करत तो एकांतातच नष्ट करावा.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)