You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खासगी जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया काय आहे?
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी
खासगी मालकीच्या जमिनीवर अतिक्रमण केल्याची प्रकरणं वारंवार आपल्या कानावर येतात. या प्रकरणांतून वादही उद्भवतात.
जमिनीची मालकी एका व्यक्तीकडे असते, पण दुसरा व्यक्ती हेतुपुरस्सर त्या जमिनीवर अतिक्रमण करताना दिसून येतो. त्या जमिनीवर मालकीचा दावा सांगतो.
जमिनीवरील अतिक्रमण हे बांधकामाच्या किंवा ताबा मिळवण्याच्या स्वरूपात दिसून येतं.
त्यामुळे मग एखाद्या खासगी भूभागावर अतिक्रमण झाल्यास ते हटवण्यासाठी नेमकी कुठे दाद मागता येते? मूळात अतिक्रमण म्हणजे काय? ते थांबण्यासाठी वैयक्तिक पातळीवर काय काळजी घेणं गरजेचं असतं? याची माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.
अतिक्रमण म्हणजे काय
कोणताही कायदेशीर करार न करता जागामालकाच्या किंवा जमीनमालकाच्या इच्छेविरुद्ध एखाद्या भूभागावर ताबा सांगणं, याला कायदेशीर भाषेत अतिक्रमण असं म्हटलं जातं.
यामध्ये शेतात बांध घालणं, शेतीवर ताबा मिळवणं, दुसऱ्याच्या हद्दीतील जमिनीतील काही भागात बांधकाम करणं (हौद, जिना इ.), दुसऱ्याच्या मालकीची जमीन स्वत:ची असल्याचा दावा करणं इत्यादी बाबींचा समावेश होतो.
अतिक्रमणाची कारणं काय?
जमिनीवर अतिक्रमण करण्याची प्रामुख्यानं 4 कारणं दिसून येतात.
- जमिनीचा मालक बाहेरगावी राहत असल्यास अतिक्रमण केलं जातं.
- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या जमिनीच्या दरांमुळेही अतिक्रमण होतं.
- वारस नसलेलं कुटुंब किंवा गरीब कुटुंबाच्या जमिनीवर अतिक्रमण करून त्यावर ताबा सांगितला जातो.
- प्लॉटला कंपाऊंड नसेल किंवा शेतजमिनीच्या बांधाला खुणा नसेल तर यापरिस्थितीतही अतिक्रमण केलं जातं.
अतिक्रमण काढण्याची जबाबदारी कुणाची?
खासगी जमिनीवरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही संबंधित जमिनीच्या मालकाचीच असते.
खासगी जमिनीवरील अतिक्रमणात शासकीय यंत्रणा, तहसीलदार, जिल्हाधिकारी दखल देऊ शकत नाही. ते हटवण्याची जबाबदारी संबंधित जमीन मालकाचीच असते, असं सर्वोच्च न्यायालयानं एका निर्णयात नमूद केल्याचं महसूल कायदेतज्ञ डॉ. संजय कुंडेटकर सांगतात.
"नेमकी हीच बाब अनेकांना माहिती नसल्यामुळे अतिक्रमण हटवण्यासाठी ते सरकारी कार्यालयात अर्ज करतात, खेटे मारतात. पण, त्यात फक्त वेळ आणि पैसा खर्च होतो. त्यामुळे खासगी जागेवर अतिक्रमणाविरोधात वेळ वाया न घालवता दिवाणी न्यायालयात दाद मागायला हवी," असंही कुंडेटकर सांगतात.
अतिक्रमण हटवण्याची कायदेशीर प्रक्रिया काय?
खासगी जमिनीवर अतिक्रमण झाल्यास त्याविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करता येते. पण, यावर पोलिस यंत्रणा लगेच कारवाई करेल अशी अपेक्षा करता येऊ शकत नाही.
कारण खासगी जमिनीवरील अतिक्रमण ही बाब दिवाणी स्वरुपाची आहे. याबाबत कारवाई करण्याचे अधिकार पोलिसांना नाही.
खासगी मालकीच्या जमिनीत झालेले अतिक्रमण दूर करण्यासाठी दिवाणी न्यायालयात दाद मागणं हाच एकमेव उपाय आहे.
पण, अशाप्रकारच्या अतिक्रमणाविरुद्ध पोलिसांकडे तक्रार केल्यास त्याचा दिवाणी न्यायालयात पुरावा म्हणून वापर करता येतो.
जमिनीवरील मूळ मालकी हक्क सिद्ध करण्यासाठी जमिनीची कागदपत्रं, जमीन मोजणीचा नकाशा इत्यादींसह दिवाणी न्यायालयात दाद मागता येते.
त्यानंतर मग न्यायालयाच्या आदेशाने कोर्ट कमिशन नेमून संबंधित भूभागाची किंवा जमिनीची मोजणी केली जाते. त्यावरून अतिक्रमण झाले की नाही हे सिद्ध करता येते.
अतिक्रमण टाळण्यासाठी करू शकता?
खासगी जमिनीवरील अतिक्रमण टाळण्यासाठी 4 उपाय असल्याचं महसूल कायदेतज्ञांशी केलेल्या चर्चेतून समोर येतं.
- जमिनीचा मूळ मालक बाहेरगावी वास्तव्यास असल्यास जमिनीच्या संरक्षणाची जबाबदारी गावातील विश्वासू व्यक्तीकडे सोपवता येऊ शकते. त्यासाठी पॉवर ऑफ अटर्नी करता येऊ शकते.
- जमिनीच्या संरक्षणासाठी भाडेकरू नेमता येऊ शकतो. पण तुम्ही भाडेकरू ठेवणार असाल, तर जवळच्या पोलिस ठाण्यात त्याचं व्हेरिफिकेशन करून घेणं आवश्यक असतं. सध्या काही शहरांमध्ये अशाप्रकारची नोंदणी करणं अनिवार्य आहे.
- आपल्या मालकीच्या जमिनीला कंपाऊंड करता येऊ शकतं. मालमत्तेभोवती बोर्ड लावता येऊ शकतो.
- वेळोवेळी जमिनीला भेट देऊन पाहणी करावी.
- शेजाऱ्यांकडून याबाबतचे नियमितपणे अपडेट घेत राहावे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)