You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
दीपाली सय्यदः आधी अभिनय नंतर शिवसेना आता शिंदे गट- जाणून घ्या त्यांचा प्रवास
- Author, प्राजक्ता पोळ
- Role, बीबीसी मराठीसाठी
माझा शिंदे गटात प्रवेश होतोय , अशी माहिती खुद्द दीपाली सय्यद यांनीच माध्यमांशी बोलताना दिली आहे. 'मला शिंदे यांनी राजकारणात आणले, म्हणून त्यांच्या सोबत जाते आहे. मातोश्री वर पोहोचणारे खोके कमी झाले म्हणून रश्मी वहिनी नाराज आहेत. एकत्र आणायला प्रयत्न केला पण नाही आले म्हणून प्रवेश करत आहेत. शनिवार पर्यंत पक्षप्रवेश करणार', असंही त्या म्हणाल्या आहेत.
दीपाली सय्यद या अचानक चर्चेत का आल्या? दीपाली सय्यद यांची पार्श्वभूमी काय आहे? याबाबतचा हा आढावा...
कोणत्या वक्तव्यांमुळे आल्या चर्चेत?
काही दिवसांपूर्वी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना हनुमान चालिसा पठण प्रकरणी अटक करण्यात आली. त्यादरम्यान खार पोलीस ठाण्यात भाजप नेते किरीट सोमय्या हे राणा दाम्पत्यास भेटायला गेल्यावर त्यांच्यावर शिवसैनिकांनी हल्ला केला.
या हल्याचं समर्थन दीपाली सय्यद यांनी केलं होतं. त्या म्हणाल्या, "सोमय्याच काय, त्या कारमध्ये मोदी असते तरी ती कार फोडली असती. ही बाळासाहेबांची शिकवण आहे, जो नडला त्याला फोडला."
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मशिदींवरचे भोंगे उतरवले. यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी त्याचं जाहीर कौतुक केलं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी "ए भोगी, काहीतरी शिक आमच्या योगीकडून" असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उद्देशून ट्वीट केलं होतं.
त्याला दीपाली सय्यद यांनी प्रत्युत्तर देताना म्हटलं, "योगी होण्यासाठी बायकोला सोडावं लागतं फडणवीस बायकोला सोडणार का?"
या ट्वीटची राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती.
त्याचबरोबर अमृता फडणवीस यांच्याकडून सातत्याने येणार्या राजकीय वक्तव्यांबाबत दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या, "मी फडणवीसांना एकच सांगते, घरातल्या दावणीची म्हैस शिवसेनेच्या वाट्याला सोडू नका. शिवसैनिक कोणालाही ऐकत नाहीत. अन्यथा तुमचं पुन्हा येईन, पुन्हा येईन हे स्वप्नच राहील."
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या औरंगाबादच्या सभेत पुन्हा मशिदींवरचे भोंगे आणि जातीय द्वेष याचा उल्लेख केला. त्यानंतर दिपाली सय्यद यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
"जर दंगली झाल्या तर हे प्रेतं तरी बघायला येतील का? यामध्ये सर्वसामान्य हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं नुकसान होणार आहे. जर काही झालं तर अमित ठाकरे जातील परदेशात... इथे फक्त श्रध्दांजलीचे बोर्ड लागतील."
कोण आहेत दीपाली सय्यद?
दीपाली भोसले सय्यद यांचा जन्म 1 एप्रिल 1978 साली बिहारमध्ये झाला. बिहारच्या सीव्हीआर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
पण लहानपणापासून नृत्याची आवड असलेल्या दीपाली सय्यद यांनी 2006 साली सिनेसृष्टीतून त्यांच्या करिअरला सुरवात केली. बंदिनी, समांतर या दीपाली सय्यद यांच्या अभिनय कारकिर्दीच्या सुरवातीच्या मालिका होत्या.
त्यानंतर त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी मालिका, जाहिराती तसंच सिनेमांमध्ये काम केलं आहे. दीपाली सय्यद या उत्तम नृत्यांगना आहेत त्यामुळे अनेक रियालिटी शोमध्ये त्या परीक्षकाच्या भूमिकेत दिसल्या.
'जाऊ तिथे खाऊ', चष्मेबहाद्दूर, लग्नाची वरात लंडनच्या दारात या सिनेमांमधल्या त्यांच्या भूमिकांमधून त्यांची ओळख निर्माण झाली. 'जत्रा' सिनेमातील दिपाली सय्यद यांचं "ये गो ये, ये मैना पिंजरा बनाया सोने का" हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं.
2008 साली दीपाली भोसले सय्यद यांनी दिग्दर्शक बॉबी खान उर्फ जहांगीर सय्यद यांच्याशी लग्न केलं. लग्नानंतर दीपाली यांचं नाव सोफिया जहांगीर सय्यद असं ठेवण्यात आले. लग्नानंतर दीपाली सय्यद अभिनयात फारश्या रमल्या नाहीत. पण विविध रिअॅलिटी शोच्या माध्यमातून त्या प्रेक्षकांसमोर येत राहिल्या.
राजकीय प्रवास
दीपाली सय्यद यांनी 2014 ला अहमदनगरमधून आम आदमी पक्षातून निवडणूक लढवली होती. पण त्यात त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर काही दिवसांनी दीपाली सय्यद यांनी शिवसंग्राम या पक्षात प्रवेश केला होता.
नगर जिल्ह्यातील साकळाई पाणी योजनेसाठी त्यांनी काही दिवस आंदोलन केलं. ज्या आंदोलनाची चर्चा झाली होती. पण त्यानंतर दीपाली सय्यद या फारशा सक्रिय दिसल्या नाहीत.
2019 च्या निवडणूकीवेळी त्या पुन्हा चर्चेत आल्या. दिपाली सय्यद यांनी 3 ऑक्टोबर 2019 च्या निवडणुकीवेळी रात्री उशिरा मातोश्री निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आणि हातावर शिवबंधन बांधून घेतले.
ठाणे जिल्ह्यातील कळवा मुंब्रा हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांचा बालेकिल्ला मानला जातो. राष्ट्रवादीची या भागातील 'हॅट्रीक' मोडण्यासाठी शिवसेनेचे कळवा - मुंब्रा मतदारसंघातून दीपाली भोसले - सय्यद यांना उमेदवारी देण्यात आली.
एक दिवसआधी शिवसेनेत प्रवेश करून लगेच दुसर्या दिवशी दीपाली सय्यद यांनी मुंब्रा कळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पण जितेंद्र आव्हाड यांच्यासमोर दिपाली सय्यद पराभूत झाल्या.
त्यावेळी निवडणुकीसाठी दीपाली सय्यद यांनी 'सोफिया जहांगीर सय्यद' नावाने होर्डिंग्ज लावून प्रचार केल्यामुळे सोईनुसार नावाचा आणि धर्माचा वापर करत असल्याची टीका त्यांच्यावर झाली होती.
"बर्याचदा लोक माझ्या आडनावामुळे मला बोलतात. लोकांना त्याचा फार त्रास होतो. मग या पाठोपाठ माझे आई- वडिल माझे संस्कार याविषयी चर्चा सुरू होतात. पण मी या गोष्टीला फारसे महत्त्व देत नाही," असं याबाबत प्रत्युत्तर देताना दिपाली सय्यद यांनी म्हटलं होतं.
पण या निवडणुकीतही त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर काही दिवस त्या राजकारणात फारशा सक्रिय दिसत नव्हत्या. पण राजकारणात धर्मांचे मुद्दे गाजत असताना त्या काही दिवसांपासून पुन्हा सक्रिय झालेल्या बघायला मिळतायेत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)