राज ठाकरेंची 'उत्तर सभा' तलवारीमुळे अडचणीत?

फोटो स्रोत, Getty Images
"येत्या 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवले नाहीत, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लावू," असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिलाय. ठाण्यात राज ठाकरेंची काल (12 एप्रिल) सभा झाली. 'उत्तर सभा' असं या सभेला नाव देण्यात आलं होतं. मात्र आता या सभेतील एका घटनेमुळे राज ठाकरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
मजकूर उपलब्ध नाही
Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.Facebook पोस्ट समाप्त
राज ठाकरे यांनी या सभेत तलवार उंचावून पुन्हा म्यान केली होती. परंतु आता भारतीय हत्यार कायद्यान्वये त्यांच्याविरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. मनसेच्या ठाणे शहराध्यक्ष रवींद्र मोरे यांनी राज ठाकरे यांचे स्वागत केले आणि ही तलवार भेट दिली होती. ही तलवार म्यानातून बाहेर काढून पुन्हा म्यान करणाऱ्या राज ठाकरेंविरोधात 104/22 कलम 425 हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. राज ठाकरे यांच्यासह अविनाश जाधव, रवींद्र मोरे यांच्याविरोधातही हा गुन्हा दाखल झाला आहे.
राज ठाकरे सभेमध्ये काय म्हणाले होते?
"तुम्हाला नमाज पढायचीय, अजान द्यायचीय, घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय?" असा प्रश्न विचारत राज ठाकरेंनी मशिदींवरील भोंग्यांना लक्ष्य केलं.
राज ठाकरे म्हणाले, "जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही."
"नवरात्रोत्सव असतो, दहा दिवस आपण समजू शकतो. तरीही लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. 365 दिवस तुम्ही लाऊडस्पिकरवरून ऐकवता. कशासाठी, कुणासाठी? 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठचीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही. महाराष्ट्राला स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे, 12 एप्रिल ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मौलवींना बोलवा, सर्व मशिदींवरचे लाऊडस्पिकर उतरवले पाहिजे. 3 मेनंतर तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडून होणार नाही," असं राज ठाकरे म्हणाले.
तसंच, "मतांसाठी वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही," असंही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -
- सभेकडे येताना अग्निशमन दलाचा बंब दिसला. इतकी काही आग लावणार नाहीय.
- माझ्या ताफ्याला अडवणार हे गुप्तचर यंत्रणेला माहीत आहे. पण पवार साहेबांच्या घराकडे एसटी कर्मचारी जाणार हे माहीत नव्हतं.
- आपली सभा मोठे स्क्रीन लावून जम्मूमध्येही दाखवली जातेय, अनेक राज्यात दाखवली जातेय. म्हणून जाहीर सभा घेण्याचं ठरवलं.
- गुढीपाडव्याच्या सभेनंतर अनेक नेत्यांनी अकलेचे तारे तोडले. त्याचं उत्तर मला द्यायचं होतं. पण पत्रकार परिषद घेऊन मला याचं उत्तर द्यायचं नव्हतं.
- ज्यावेळी मी नरेंद्र मोदींवर बोलत होतो, त्यावेळी त्यांच्या भूमिका पटल्या नव्हत्या. उघडपणे बोललो. आता ईडीची नोटीस आली म्हणून ट्रॅक बदलला. मी नाही ट्रॅक बदलला. मला नाही लगत ट्रॅक बदलायला.
- शरद पवार साहेबांना नुसती चाहूल लागली ईडीच्या नोटिशीची, त्यावर केवढं नाटक केलं. या हातानं पापच केलेलं नाही, तर नोटिशी कोणतीही येवो, भीक नाही घालत मी त्यांना.
- 370 कलम रद्द केलं, तेव्हा पहिलं ट्वीट माझं होतं. नरेंद्र मोदींसारखा पंतप्रधान या देशाला मिळावा हे बोलणारा पहिला मी होतो.
- नरेंद्र मोदींना माझं सांगणं आहे की, एक म्हणजे समान नागरी कायदा आणा आणि दुसरं म्हणजे या देशातील लोकसंख्येवर नियंत्रण ठेवता येईल असा कायदा आणा.
- पवारसाहेब आज संजय राऊतांवर खुश आहेत. कधी टांगलेला दिसेल काही सांगता येत नाही. यात बरेच काँग्रेसवाले गेलेले आहेत.
- अजित पवारांवर रेड पडते, तरी नरेंद्र मोदी आणि पवारसाहेबांमध्ये मधुर संबंध राहतात.
- सुप्रिया सुळेंनी बोलू नये. यांचे खायदे दात वेगळे आणि दाखवायचे सुळे वेगळे आहेत.
- मनसे विझलेला पक्ष नसून, समोरच्या विझवत जाणारा पक्ष आहे
- सगळे म्हणतात, संपलेला पक्ष आहे. तरी बोलतात. रकानेच्या रकाने भरतात, लिहितात.
- अजित पवार म्हणतात, यांना भोंगे आताच आठवले का? याआधी काय झोपा काढत होते का? हे दाखवण्यासाठी मी तीन व्हिडीओ आणले आहेत. सोक्षमोक्ष लावलेला बरा असतो.
- भोंग्यांवर याआधीही बोललो. पण अजित पवारांना ऐकू आलं नसेल. लॉकडाऊनमध्ये कान साफ झाले असतील.
- तुम्हाला नमाज पढायचीय, अजान द्यायचीय, घरामध्ये द्या. शहरांचे रस्ते, फूटपाथ कशाला अडवताय? प्रार्थना तुमची आहे, आम्हाला का ऐकवताय?
- सांगून पटत नसेल, तर तुमच्या मशिदीच्या बाहेर हनुमान चालिसा लावणार म्हणजे लावणार
- पाच पाच वेळा बांग देतात, एकतर सगळे बेसूर असतात. काय म्हणून आम्ही ऐकायचं? रस्त्यावर घाण झाल्यास रस्ता साफ करतो, फूटपाथवर घाण झाल्यास, फूटपाथ साफ करतो. मग कानाला त्रास होत असेल तर भोंगे खाली उतरवलेच पाहिजेत. राज्य सरकारला आमचं सांगणं आहे, आम्ही यातून मागे हटणार नाही, काय करायचं ते करा.
- नवरात्रोत्सव असतो, दहा दिवस आपण समजू शकतो. तरीही लाऊडस्पिकर कमीच लावला पाहिजे. काही सणवार असेल तर आपण समजू शकतो. 365 दिवस तुम्ही लाऊडस्पिकरवरून ऐकवता. कशासाठी, कुणासाठी? 3 तारखेला ईद आहे. माझी राज्य सरकारला, गृहखात्याला विनंती आहे की, कुठचीही तेढ आम्हाला निर्माण करायची नाही. महाराष्ट्राला स्वास्थ्य आम्हाला बिघडवायचं नाही. पण आज 12 तारीख आहे, 12 एप्रिल ते 3 मे महाराष्ट्रातील सर्व मौलवींना बोलवा, सर्व मशिदींवरचे लाऊडस्पिकर उतरवले पाहिजे. 3 मेनंतर तुम्हाला कुठलाही त्रास आमच्याकडून होणार नाही.
- मतांसाठी वाटेल त्या प्रकारे धर्म चालवणार आणि आम्ही उघड्या डोळ्यांनी बघत बसायचं. हा देशभर त्रास आहे. जे आज माझं भाषण ऐकत असतील, त्या तमाम हिंदूंना माझं सांगणं आहे, 3 तारखेपर्यंत ऐकत नसतील, तर जिथं मशीद आहे तिथं हनुमान चालिसा लागलीच पाहिजेत. एकमेकांना त्रास देणारा धर्म असू शकत नाही.
- मुंब्र्यातल्या एकही मदरश्यामध्ये वस्तारा जरी सापडला तरी राजकारण सोडेन. कसा सापडलेल? दाढीच करत नाही. वस्तारा कसा सापडणार. यांच्या बुद्धीची किव करावीशी वाटते. इतके अतिरेकी सापडतायेत.
- शरद पवारांनी आणि राष्ट्रवादीने सांगावं? की राज ठाकरे भूमिका बदलतो? परदेशी पंतप्रधान चालणार नाही, म्हणत पवार काँग्रेसमधून बाहेर पडले. दोन महिन्यात काँग्रेससोबत गेले आणि कृषिमंत्री झाले. असंख्य भूमिका बदलल्याचे सांगता येतील.
- गुढीपाडव्याच्या सभेनंतर एकदम सगळे सरपटले. मग एकच पालुपद लावलं, ईडीची नोटीस आली, ईडीची नोटीस आली. परत आली तर परत जाईन. तुम्ही जाताय का? नुसत्या संपत्त्या जप्त केल्या तर पत्रकार परिषदेत शिव्या देऊ लागले.
- आमच्या आजोबांनी यांच्यासाठी (संजय राऊत) चांगला शब्द काढला होता, 'लवंडे'. व अक्षरवार अनुस्वार आहे लक्षात ठेवा.
- देशात, महाराष्ट्रात असंख्य जात आहे. प्रत्येक जातीला आपापल्या जातीबद्दल अभिमान होता. 1999 ला राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि त्यानंर दुसऱ्या जातीबद्दल द्वेष सुरू झाला.
- शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यामुळे ते धर्माकडे नास्तिकतेनं पाहतात. ते धर्म-बिर्म, देव-बिव काही मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीनं राजकारण समजावण्याचा प्रयत्न करतात.
- महाराष्ट्राला कुणी हरवू शकलं नव्हतं. महाराष्ट्राला हरवतंय कोण, तर जात. या जाती आपल्याला नष्ट करायला निघाल्यात.
- महाराष्ट्राला हात जोडून विनंती आहे की, या सर्व भामट्यांपासून दूर राहा. स्वत:ला हव्या असलेल्या पैशांसाठी सर्वांना खड्ड्यात घालतील.
राज ठाकरेंच्या सभेआधी मनसेने ठाण्यात लावले हिंदी भाषेत बॅनर?
या सभेआधी राज ठाकरेंचे ठाण्याच्या पाचपाखाडी भागात 'मुंबई मे बैठा हिंदुओ का राजा अपनी हिफाजत चाहिये तो मनसे आजा,' असे हिंदी भाषेमध्ये फलक लागलेले बघायला मिळतायेत.
गुढीपाडव्याच्या मनसेच्या सभेत हिंदुत्व, उत्तरप्रदेशच्या विकासाचं कौतुक यामुळे मनसेचा मराठीचा मुद्दा आता मागे पडणार का, असा प्रश्न उपस्थित होतोय.
मनसेच्या स्थापनेपासून राज ठाकरेंनी मराठी भाषा, मराठी माणसांचे हक्क इत्यादी मुद्दे अजेंड्यावर ठेवले. त्याचबरोबर 'महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठीतच बोलावं लागेल' हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी वारंवार सांगितले आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
काही वर्षांपूर्वी फक्त मराठी प्रसारमाध्यमांना मुलाखती देणार असल्याची भूमिका राज ठाकरे यांनी घेतली होती. त्यांच्या पत्रकार परिषदांना हिंदी माध्यमांच्या प्रतिनिधींना प्रवेश नाकारण्यात आला होता. त्याचबरोबर सर्व दुकानांवर मराठी भाषेत पाट्या लावल्या पाहिजेत, यासाठी मनसे स्टाईलने 'खळ्ळखट्याक' आंदोलनही करण्यात आले होते. मग आता मनसेच्या सभांचे बॅनर हिंदी भाषेत लावण्याचे काय कारण असावे?
'हिंदीत बॅनर लावले म्हणून मराठीचा मुद्दा सोडला असं नाही...'
मनसेकडून उत्तर भारतीयांचे महाराष्ट्रात येणे, मराठी भाषेत बोलणे हे सर्व मुद्दे मनसेने सोडून दिले का?
हे प्रश्न आम्ही हे बॅनर लावणारे मनसेचे विभाग अध्यक्ष महेश कदम यांना विचारले असता ते म्हणाले, "राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला आहे. 'मुंबई मै बैठा है हिंदुओ का राजा, अपनी हिफाजत चाहिए तो मनसे आजा!' ही वाक्यरचना राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेला साजेशी आहे. मी ती मराठीत करण्याचा प्रयत्न केला. पण त्याची शब्दरचना नीट होत नव्हती. ती वाचायलाही चांगली वाटत नव्हती म्हणून आम्ही हिंदीमध्ये लिहिलं."

फोटो स्रोत, Facebook/MNS Adhikrut
पण मराठीत तुम्हाला हिंदुत्वावर एकही मराठी घोषणा सापडली नाही? मराठीचा मुद्दाही आता सोडून मनसे हिंदी भाषेला अधिक महत्त्व देतय का? या प्रश्नावर महेश कदम सांगतात, "मराठी भाषेचा मुद्दा हा मनसे कधीच सोडणार नाही. तोच आमचा प्रमुख मुद्दा आहे. आम्ही मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी भांडत राहणार. पण देशपातळीवर राज ठाकरे हिंदुत्वाचं नेतृत्व करावं ही सर्वांची इच्छा आहे. हिंदी ही आपली राष्ट्रभाषा आहे. त्यामुळे हिंदीत बॅनर लावले म्हणून मराठीचा मुद्दा सोडला असं नाही."
मनसेला फटका बसू शकतो?
हिंदूत्वासाठी हिंदी भाषेचा आधार घेणं गरजेचं आहे का? या भूमिकेमुळे मनसेला कितपत फायदा होईल किंवा तोटा सहन करावा लागेल? याबाबत बोलताना जेष्ठ पत्रकार रवींद्र आंबेकर सांगतात, "मनसेची वाटचाल शिवसेनेच्या पावलावर पाऊल ठेवून होत आहे. जी 'पोकळी' बाळासाहेब ठाकरेंनी भरली होती. ती 'पोकळी' आता मनसे घेऊ पाहतेय. मराठीच्या मुद्द्यावरून हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जाताना बाळासाहेबांनाही हिंदीचा आधार घ्यावा लागला होता. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती."

फोटो स्रोत, MNS
"शिवसेना-भाजप मित्रपक्ष होते. त्यावेळी शिवसेनेची भूमिका भाजपविरोधी नव्हती. पण मनसेकडून ज्या भूमिका मांडल्या गेल्या, त्या सोईनुसार बदलल्या गेल्या. त्यामुळे मनसेला धोका निर्माण होऊ शकतो. 80 टक्के हिंदू प्राबल्य असलेल्या देशात अनेक हिंदुत्ववादी पक्षांची तशी स्पेस आहे. मात्र आता भाजपा 'हार्डकोअर' हिंदुत्वाच्या रणनितीवर आहे, शिवसेनेची भूमिका थोडी मवाळ झालेली दिसतेय, पण त्यांनी हिंदूत्व सोडलं नाही. त्यामुळे मनसे हिंदूत्वाचा मुद्द्यावर लक्ष केंद्रित करत असेल तर त्याचा मर्यादित स्वरूपात फायदा मनसेला होईल. पण यातून जर मराठी माणसाचे मूळ मुद्दे बाजूला ठेवतं असेल तर याचा फटका पक्षाला पडू शकतो," असंही रवींद्र आंबेकर म्हणाले.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








