You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
असदुद्दीन ओवेसी- मी टोपी घालणार आणि माझी मुलगी हिजाब घालणार #5मोठ्याबातम्या
आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...
1. मी टोपी घालणार, दाढी ठेवणार आणि माझी मुलगी हिजाब घालणार - असदुद्दीन ओवेसी
हिजाबवरील कोणत्याही प्रकारच्या बंदीला विरोध करणार, असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.
कर्नाटकमध्ये हिजाबवरुन वाद कायम असून अद्याप या प्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू आहे.
या मुद्यावर आता ओवेसेंनी भाष्य केलं असून त्यांनी आपल्या ट्वीटरवर याबाबतचा एक व्हीडिओ पोस्ट केला आहे.
त्यात ते म्हणतात, "आपण कोणाचे गुलाम नाही. टोपी आणि दाढी ठेवणार आणि आपली मुलगी हिजाब घालणार."
लोकसत्ताने हे वृत्त दिलं.
या व्हिडिओमध्ये ते म्हणतात, "मी भारतीय राज्यघटनेनुसार माझी प्रतिष्ठा राखून जगेन."
ओवेसी यांनी हे वक्तव्य कधी आणि कुठे केलं याची माहिती मात्र या व्हिडिओमध्ये नाही.
2. 'या' कारणामुळे नारायण राणेंविरोधात महिला आयोगात तक्रार
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. दिशा सॅलियन मृत्यू प्रकरणी वक्तव्य केल्याने राज्य महिला आयोगात राणेंविरोधात तक्रार दाखल झाली आहे.
अभिनेता सुशांतसिंह राजपूतची मॅनेजर राहिलेल्या दिशा सॅलियनची बदनामी केल्याप्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश राज्य महिला आयोगानं पोलिसांना दिले आहेत.
सकाळने हे वृत्त दिलं आहे.
मुंबईतील मालवणी पोलिसांना येत्या 48 तासांत अहवाल सादर करण्याची सूचना देण्यात आली आहे.
दिशा सॅलियनच्या मृत्यूनंतर पोलिसांनी शवविच्छेदन अहवाल दिला असूनही नारायण राणे यांनी आरोप केल्याने कुटुंबाची बदनामी होत आहे, अशी तक्रार मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी महिला आयोगाकडे केली आहे.
महिला आयोगाने आता यासंदर्भात पोलिसांकडून अहवाल मागवला आहे. अशा वक्तव्यांसंदर्भात सॅलियन कुटुंबाकडूनही आक्षेप घेण्यात आला होता.
3. 'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती - प्रकाश आंबेडकर
'जय भवानी' ही घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिली होती असा दावा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
दैनिक प्रभातने हे वृत्त दिलं आहे.
यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या अधिकृत लेटरहेडवर भवानीचं चित्र असल्याचंही सांगितलं.
त्यांनी म्हटलं, "छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काही ऐतिहासिक तथ्य समोर येणे गरजेचे आहे. आंबेडकरी चळवळ आणि शिवाजी महाराज यांचं नातं जुनं आहे. 'जय भवानी'ची घोषणा सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली."
परळ येथील दामोदर सभागृहात बाबासाहेबांना भेटण्यासाठी येणारे लोक एकमेकांना जय भवानी म्हणत अभिवादन करायचे, असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले.
महाडच्या सत्याग्रहाच्यावेळी बाबासाहेबांनी छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ आणि गांधीजींची प्रतिमा ठेवली होती. यावेळी दासगाव ते महाडपर्यंत निघालेल्या जमावाने जय जिजाऊ आणि शिवाजी महाराजांचा जयजयकार केला होता, असंही प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं.
4. 'नाना पटोलेंनी माहिती घेऊन बोलावं', जयंत पाटलांचा सल्ला
तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. यावरुन राज्यातील काँग्रेसमध्ये मात्र नाराजी असल्याचं दिसून येत आहे.
नाना पटोलेंनी यावर आक्षेप घेत काँग्रेस शिवाय आघाडी होऊ शकत नाही असं म्हटलं होतं.
त्यांच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने आता प्रतिक्रिया दिली आहे. न्यूज 18 लोकमतने हे वृत्त दिलं आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, नाना पटोले यांनी आधी माहिती घ्यावी.
राज्य पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय राजकारणाबद्दल कशाला बोलायचं असा टोलाही त्यांनी पटोलेंना लगावला.
मोदी सरकारविरोधात समविचारी पक्ष एकत्र येत आहेत. त्यादृष्टीने वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा सुरू आहे. नाना पटोले यांनी आधी संपूर्ण माहिती घ्यावी, असंही जयंत पाटील म्हणाले.
5. HSC,SSC विद्यार्थ्यांना 'या' विषयासाठी अतिरिक्त गुण मिळणार
दहावी आणि बारावी बोर्डाच्या विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील सहभागाच्या आधारावर सवलतीचे गुण देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.
शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
दहावीच्या परीक्षेसाठी प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यांना इयत्ता सातवी आणि आठवीमध्ये विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेण्यात येऊन त्यांना 2021-22 या वर्षाकरता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत. एबीपी माझाने हे वृत्त दिलं आहे.
तसंच बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट विद्यार्थ्यांना इयत्ता नववी आणि दहावीमधील विद्यार्थ्यांचा क्रीडा स्पर्धेतील सहभाग विचारात घेऊन 2021-22 करता सवलतीचे क्रीडा गुण देण्यात यावेत, असे निर्देश राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांना देण्यात आल्याचं मंत्री वर्षा गायकवाड यांनी सांगितले आहे.
बारावीची लेखी परीक्षा 4 मार्च 2022 ते 30 मार्च 2022 या दरम्यान होणार आहे. तर प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 14 फेब्रुवारी 2022 ते 3 मार्च 2022 या दरम्यान होणार आहे.
दहावीची लेखी परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल 2022 दरम्यान होईल. तसंत , प्रात्यक्षिक आणि तोंडी परीक्षा 25 फेब्रुवारी ते 14 मार्च या दरम्यान होणार आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)