You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
युवराज सिंगला या शब्दामुळे झाली अटक
भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगला हरियाणाच्या हांसी इथे हिसार पोलिसांनी १७ ऑक्टोबरच्या रात्री उशिरा अटक केली. थोड्या वेळात त्याला जामिनही मिळाला. नेमकं कशामुळे युवराजवर ही कारवाई झाली?
अनुसूचित जातीविरोधात अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या वर्षी रोहित शर्मासोबत लाइव्ह चॅटमध्ये यजुर्वेंद्र चहलवर या भारतीय खेळाडूवर अनुसूचित जातीबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप युवराजवर आहे.
उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर युवराज चंदीगडला पोहोचला. तिथे त्याला हिसार पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिसांनी त्याची चौकशी केली आहे. अटकेनंतर हिसार जिओ मेसमध्ये युवराजची चौकशी करण्यात आली. यानंतर, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची औपचारिक जामिनावर सुटका करण्यात आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते रजत कलसन यांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. ज्यावर युवराजवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी युवराजने जगासमोर आपली चूक मान्य केली. सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून त्याने माफी मागितली. यासाठी त्याने ट्वीट करत एक पत्र पोस्ट केलंय. यात युवराज म्हणतो की,
"मला हे स्पष्ट करायचं आहे की, मी कधीही जाती, रंग, वर्ण आणि लिंगाबाबत कोणत्याही प्रकारच्या असमानतेवर विश्वास ठेवला नाही. मी लोकांच्या भल्यासाठी माझे आयुष्य दिले आहे आणि ते आजही चालू आहे. मी माझ्या मित्राशी बोलत होतो, माझा मुद्दा चुकीचा समजला गेला, जो निराधार आहे. तथापि, एक जबाबदार भारतीय असल्याने, मी हे सांगू इच्छितो की जर मी अजाणतेपणे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मला त्याबद्दल खेद वाटतो. माझे भारत आणि तेथील लोकांसाठी प्रेम नेहमीच राहील."
दरम्यान युवराजनं युजवेंद्र चहलला उद्देशून बोलताना 'भंगी' या शब्दाचा वापर केला होता. एकेकाळी हा शब्द मैला वाहून नेणाऱ्या विशिष्ट जातीच्या व्यक्तींसाठी कथित उच्चवर्णीयांकडून वापरला जायचा. त्यात समोरच्या व्यक्तीचा अपमान करण्याची भावना असायची.
तरीही आजच्या काळात अनेकांना या शब्दाच्या अर्थाची आणि त्यामागच्या दाहकतेची कल्पनाही नाही. युवराजच्या प्रकरणातून तेच दिसून येतं.
असा शब्दप्रयोग करणारा युवराज एकटाच नाही, याआधी सलमान खान, शिल्पा शेट्टी, सोनाक्षी सिन्ना, कॉमेडियन मुनमुन दत्ता अशा सेलिब्रिटींनीही हा शब्द वापरला होता आणि मग माफी मागितली होती.
याचसंर्भात मागे एकदा बीबीसी हिंदीशी बोलताना अडव्होकेट नितीन सातपुते यांनी माहिती दिली होती, की "सरकारच्या सर्क्युलर नुसार समाजाच्या एका खास स्तरातील लोकांना 'भंगी' न म्हणता 'वाल्मिकी' म्हटलं जावं." ते पुढे म्हणतात, "कोणतीही गोष्ट तुम्हाला आवडत नसेल, म्हणून त्यासाठी 'भंगी' शब्द वापराल हे कसं चालेल? भंगी लग रहा है, म्हणजे तो काय माणूस नाही जनावर वाटतो का?"
कुणी म्हणेल फक्त एक शब्दच तर आहे. पण एखाद्या गोष्टीचं वर्णन करण्यासाठी एखादा समाज कोणते शब्द आणि भाषा वापरतो, त्यावरून त्यांचे विचार व्यक्त होत असतात. अनेकदा शब्दांमध्ये विचार घडवण्याची ताकद असते.
त्यामुळे आपण वापरतो आहोत, त्या शब्दांचा अर्थ काय होतो हे समजून घेणं आणि अनवधानानंही काही शब्दांचा वापर टाळणं यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असं समानतेसाठी काम करणारे कार्यकर्ते सांगतात.
म्हणूनच ब्लॅक अमेरिकन्सासाठी निग्रो या शब्दाचा वापर करणं किंवा LGBTQ समाजाच्या व्यक्तींसाठी काही विशिष्ट शब्द वापरणं अयोग्य मानलं जातं.
भारतात तर सर्वोच्च न्यायालयानं 2008 साली 'चमार' या शब्दाचा वापर करणं शिक्षापात्र गुन्हा ठरतो, असा निर्वाळा दिला होता. 2017 साली दिल्ली हायकोर्टानं दिलेल्या निर्णयानुसार सोशल मीडियावर अगदी प्रायव्हेट ग्रुपमध्येही असे शब्द वापरणं गुन्हा ठरतो.
एससीएसटी प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटीज कायद्यानुसार अशा काही शब्दांचा उल्लेख एखाद्या व्यक्तीला उद्देशून करणं हा गुन्हा ठरतो आणि त्यासाठी शिक्षाही होऊ शकते.
एरवी भारतीय समाजात आजही जातीव्यवस्था आणि जातीभेद टिकून आहे, आणि त्यामुळेच आजही असमानता, अपमान आणि अन्यायालाही सामोरं जावं लागतं, हे दुर्दैवी वास्तव आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)