जालियनवाला बाग स्मारकाचं नूतनीकरण हा इतिहासातील महत्त्वाचं पर्व पुसण्याचा प्रयत्न?

भारतात ब्रिटिश साम्राज्य असताना, इतिहासातली हिंसक घटना म्हणून जालियनवाला घटनेकडे पाहिलं जातं. जालियनवाला स्मारकाच्या नूतनीकरणावरून रोष पसरला आहे.

शनिवारी (29 ऑगस्ट) अमृतसरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नूतनीकरण करण्यात आलेल्या जालियनवाला स्मारकाच्या वास्तूचं अनावरण केलं.

1919 साली सभेसाठी जमलेल्या नागरिकांवर ब्रिटिश सैन्याने अमानुष गोळीबार केला. भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतलं अत्यंत निर्णायक अशी ती घटना होती.

जालियनवाला बाग ही वास्तू, ते दगडी स्मारक, पोर्टिको, मार्गिका हे सगळं एकत्रित भारताच्या इतिहासातल्या एका वेदनादायी आठवणीची साक्ष देतं. जगभरातील अनेक पर्यटक या वास्तूला भेट देतात.

नूतनीकरणानंतर काय बदललं?

केंद्र सरकारने या ऐतिहासिक वास्तूचं नूतनीकरण केलं आहे. संग्रहालय खुलं करण्यात आलं आहे. 13 एप्रिल 1919 रोजी काय घडलं होतं हे उलगडणारा लाईट अँड साऊंड शो आता दररोज आयोजित करण्यात येतो.

ज्या अरूंद अशा बोळसदृश रस्त्याने ब्रिटिश अधिकारी जनरल डायर जालियनवाला बागेत प्रवेश केला त्या मार्गाचं रुपडं आता बदलण्यात आलं आहे. या मार्गावर त्या घटनेत जीव गमावलेल्या नागरिकांचे म्यूरल्स तयार करण्यात आली आहेत. त्या नागरिकांच्या स्मृतीला अभिवादन म्हणून ही म्यूरल्स या मार्गावर मांडण्यात आली आहेत.

ब्रिटिश सैन्याकडून होणारा गोळीबार टाळण्यासाठी त्यावेळी असंख्य नागरिकांनी विहिरीत उड्या मारल्या, त्या विहिरीला 'शहिदांची विहीर' असं संबोधलं जातं. पारदर्शक अडथळा ठेऊन आता ही विहीर पाहता येते.

जालियनवाला बाग वास्तूच्या नूतनीकरणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या वास्तूला भेट दिल्यानंतर नव्या पिढीला स्वातंत्र्यासाठी आधीच्या पिढ्यांनी काय संघर्ष केला होता याची जाणीव होईल. इतिहासाकडून शिकण्याची त्यांना प्रेरणा मिळेल.

इतिहासकारांचं मत काय?

मात्र या वास्तूचं नूतनीकरण म्हणजे इतिहासातलं एक महत्त्वाचं पर्व पुसून टाकण्याचा प्रयत्न असल्याचं टीकाकारांनी म्हटलं आहे.

नृशंस हत्याकांडाचं साक्षीदार अशा वास्तूची चकचकीत रंगरंगोटी करणं हे जुन्या अमृतसर शहराचं पर्यटन केंद्र म्हणून सादर करण्याचा भाग आहे असं किम वॅगनर यांनी म्हटलं आहे.

जालियनवाला बागेचं नूतनीकरण म्हणजे इतिहासाचा एक कप्पा बाजूला सारणे.

"इतिहासाला रंगसफेदी करून आकर्षक करण्याचा हा प्रकार आहे," असं इतिहासकार आणि जेएनयू विद्यापीठातील प्राध्यापक चमन लाल यांनी म्हटलं आहे.

"जालियनवाला बागेला भेट दिल्यानंतर लोकांच्या मनात जीव गमावलेल्या नागरिकांप्रति सहवेदना निर्माण व्हायला हवी. त्यांनी भोगलेल्या दु:खाचा विचार करून त्यांनी व्यथित व्हायला हवं. मात्र आता जालियनवाला बाग हे मजेचं ठिकाण झालं आहे. सुंदर बगीचा आहे. ही बाग, या ठिकाणी जे घडलं ते आनंददायी नव्हतं.

जालियनवाला बागेचं नूतनीकरण म्हणजे आपल्या ऐतिहासिक वास्तूंचं कॉर्पोरेटायझेशन असल्याचं इतिहासकार एस.इरफान हबीब यांनी म्हटलं आहे. इतिहासाचा बळी देऊन, गतस्मृतींना बाजूला सारून हे करण्यात आलं आहे.

नूतनीकरणात जे करण्यात आलंय ते उग्र स्वरुपाचं आहे. मार्गिकेत म्यूरल्स का तयार करण्यात आली आहेत? असा सवाल त्यांनी केला.

विरोधकांकडून टीका

जालियनवाला बाग इथे अमानुष क्रौर्य घडलं होतं. जालियनवाला बागेचं नूतनीकरण म्हणजे इतिहासाची क्रूर थट्टा आहे असं मत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केलं.

"जालियनवाला बाग घटनेत शहीद झालेल्या नागरिकांचा हा अपमान आहे. शहीद होणं म्हणजे काय हे ज्यांना माहिती नाही तेच वास्तूचं नूतनीकरण करू शकतात. मी शहीदाचा पुत्र असून, मी शहीद नागरिकांचा अपमान कदापि सहन करू शकणार नाही," असं ते म्हणाले.

दुसऱ्या एका ट्विटमध्ये राहुल गांधींनी म्हटलं, "ज्यांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला नाही ते स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना समजू शकत नाहीत."

राहुल यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची 1991 मध्ये हत्या करण्यात आली. श्रीलंकेच्या नागरी युद्धात भारतीय सहभागाचा बदला म्हणून राजीव यांची हत्या करण्यात आला असा प्रवाद आहे. श्रीलंकेत शांतता प्रस्थापित व्हावी यासाठी भारताने लष्कराची तुकडी श्रीलंकेत पाठवली होती.

'ज्या ठिकाणी असंख्य नागरिकांनी हौतात्म्य पत्करलं त्या वास्तूला चकचकीत झळाळी देणं म्हणजे इतिहासाला धक्का लावण्यासारखं आहे,' असं मत शिवसेनेच्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे.

इतिहासाचं एक पान नाहीसं करण्याचा हा प्रयत्न असल्याचं ब्रिटिश खासदार प्रीत कौर गिल यांनी म्हटलं आहे.

भाजप खासदार श्वेत मलिक यांनी जालियनवाला बागेच्या नूतनीकरण योग्य असल्याचं म्हटलं आहे.

मार्गिकेत म्यूरल्स बसवण्याचा हेतू हाच आहे की तिथून जाताना त्या दिवशी नागरिकांनी काय भोगलं याची कल्पना यावी. इतिहासाचा भाग झालेल्या नागरिकांना साक्षी ठेऊन त्यांनी तिथून जावं अशी यामागची भूमिका आहे असं मलिक म्हणाले.

मोठ्या प्रमाणावर लादण्यात आलेला युद्धकर तसंच भारतीय सैनिकांना युद्धात सक्तीने पाठवण्याच्या निर्णयाला विरोध म्हणून 1919 मध्ये या मैदानात नागरिक जमले होते. शीख धर्मीयांचा बैसाखीचा सण होता. आंदोलनकर्ते आणि सण साजरे करणारे एकत्र झाले.

तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अमृतसर शहरात मार्शल लॉ लागू केला होता. सार्वजनिक आंदोलनं वाढत असल्याने लोकांच्या एकत्र येण्यावर बंधनं घालण्यात आली होती.

जनरल डायर यांनी कोणताही इशारा न देता जालियनवाला बागेचे बाहेर जाणारे रस्ते, वाटा बंद केल्या आणि उपस्थितांवर गोळीबार केला. दारुगोळा संपेपर्यंत दहा मिनिटं त्यांनी गोळीबार केला.

या दुर्घटनेत नेमका किती लोकांनी जीव गमावला हे स्पष्ट करण्यासाठी आयोगाची स्थापना करण्यात आली. तत्कालीन ब्रिटिश अधिकाऱ्यांनी या घटनेत 379 लोकांनी जीव गमावला असं म्हटलं मात्र भारतीयांनी या घटनेत हजारांच्या आसपास नागरिकांनी जीव गमावला असं सांगितलं.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)