पश्चिम बंगाल : ममता बॅनर्जी यांच्या विरोधात पोटनिवडणुकीत भाजपचा उमेदवार ठरला

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूरमधून पोटनिवडणूक लढवणार आहेत. भाजपकडून ममता बॅनर्जींविरोधात लढण्यासाठी प्रियंका टिबरीवाल यांना तिकीट देण्यात आलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये 30 सप्टेंबरला भवानीपूरसह तीन जागांवर पोटनिवडणुका होणार आहेत. या मतदानाची 3 ऑक्टोबरला मतमोजणी होईल.

ममता बॅनर्जी यांना मुख्यमंत्रिपदावर कायम राहण्यासाठी पोटनिवडणूक जिंकणं गरजेचं आहे.

एप्रिल-मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसनं चांगलं यश मिळवलं. मात्र, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा नंदिग्राममधून भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांनी पराभव केला होता.

नियमांनुसार, मुख्यमंत्रिपदावरील व्यक्तीनं सहा महिन्यांच्या आत कुठल्याही एका जागेवरून निवडणूक लढवून जिंकणं अनिवार्य असतं.

नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींना शुभेंदू अधिकारींनी केलेलं पराभूत

सर्व देशाचं लक्ष लागलेल्या नंदीग्रामच्या लढतीत भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 1956 मतांनी पराभूत केले होते.

2 मे 2021 रोजी झालेल्या मतमोजणीमध्ये तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमध्ये 200 च्या वर जागा जिंकल्या. पण मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या ज्या ठिकाणाहून उभ्या होत्या त्या नंदीग्रामच्या जागेचं गूढ क्षणागणिक वाढत होतं. या चुरशीच्या लढतीत अनेक नाट्यमय वळणं आली.

सुरुवातीला ममता बॅनर्जी यांचा नंदीग्राममध्ये 1200 मतांनी विजय झाल्याची बातमी समोर आली होती. एएनआय वृत्तसंस्थेननं या संदर्भात ट्वीट केलं की, "भाजपच्या शुभेंदू अधिकारी यांचा पराभव झाला असून ममता बॅनर्जी यांचा 1200 मतांनी विजय झाला आहे."

दुसरीकडे भाजपने मात्र नंदीग्राममध्ये ममता बॅनर्जींचा पराभव झाल्याचा दावा केला होता.

भाजप उमेदवार शुभेंदू अधिकारी यांनी आपल्याला निवडून दिल्याबद्दल जनतेचे आभार देखील मानले होते.

ते म्हणाले, "नंदीग्राम मतदारसंघातल्या नागरिकांनी मला त्यांचा आमदार म्हणून निवडलंय, त्याबदद्ल मी त्यांचे आभार मानतो. मी या नागरिकांच्या भल्यासाठी सदैव काम करत राहिलो. "

शुभेंदू अधिकारी यांचा 1622 मतांनी विजय झाल्याचा दावा भाजपचे नेते अमित मालवीय यांनी केल्याचा दावा केला होता.

हे सर्व सुरू असतानाच तृणमूल काँग्रेसनं म्हटलं की मतमोजणी अद्याप बाकी आहे.

या सर्व घडामोडीनंतर आता नंदीग्रामच्या जागेचा निकाल लागला आहे. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी हे विजयी झाले आहेत आणि ममता बॅनर्जी यांचा या ठिकाणी पराभव झाला आहे.

'कोर्टात जाणार'

ममता बॅनर्जी यांनीही आपण न्यायालयात जाणार असल्याचं म्हटलं आहे.

"मी निकाल मान्य करते. पण निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर काही छेडछाड झाल्याची माहिती माझ्याकडे आली आहे. याविरोधात आम्ही न्यायालयात जाणार असून आम्ही सत्य समोर आणू," असं ममता बॅनर्जी यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आतापर्यंत 221 जागांवर आघाडीवर आहे. याविषयी बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "हा बंगालच्या लोकांचा, भारतातल्या लोकांचा आणि लोकशाहीचा विजय आहे."

भाजपचा या निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यांनी घाणेरडं राजकारण केलं, असंही ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.

कोरोनाची स्थिती बघता शपथविधीचा कार्यक्रम छोटेखानी केला जाईल, असंही त्यांनी म्हटलंय.

'हा तर रडीचा डाव!'

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपचे नाव न घेता बंगालमध्ये रडीचा डाव खेळत असल्याची टीका केलीय.

ते म्हणाले, "बंगालमध्ये मतदारांनी ममता बॅनर्जींना भरभरून पाठिंबा दिला. सबंध देशाच्या सत्तेला त्यांनी पराभूत केलं. हा निकाल मोठ्या मनाने स्वीकारायला हवा होता पण तिथे जे चाललंय याला रडीचा डाव एवढंच म्हणता येईल."

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीवर असल्याचं समोर आल्यानंतर राज्यातल्या काही भागात हिंसाचाराच्या घटना समोर आल्या आहेत.

यात काही लोकांनी हुगळी जिल्ह्यातल्या भाजप कार्यालयाला आग लावली आहे. भाजपनं याप्रकरणी तृणमूल काँग्रेसवर आरोप केले आहेत. तर तृणमूलनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, एकूण 294 जागा असणाऱ्या पश्चिम बंगाल विधानसभेवर वर्चस्व मिळवण्यासाठी 148 जागांचा आकडा पार करणं गरजेचं आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)