You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नरेंद्र मोदी यांच्या कुंभमेळा प्रतीकात्मक साजरा करण्याच्या आवाहनाला साधू-संत प्रतिसाद देतील?
कोरोना साथीचा प्रादुर्भाव पाहता कुंभमेळा आता फक्त प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधू संतांना केलं आहे.
पंतप्रधानांनी ट्वीट करून साधू संतांना हे आवाहन केलं.
त्यांनी लिहिलं, "जुना आखाडाचे पीठीधीश्वर आचार्य महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी यांच्याशी माझी आज फोनवर चर्चा झाली. आता दोन शाही स्नान पार पडले आहेत. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता कुंभमेळा प्रतिकात्मक स्वरुपात साजरा करावा, अशी प्रार्थना मी त्यांच्याकडे केली आहे. याने कोरोनाविरुद्धच्या लढाईला ताकद मिळेल"
साधूसंतांकडून प्रशासनाला होत असलेल्या सहकार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वांचे आभारही मानले आहेत.
स्वामी अवधेशानंद गिरी यांनी ट्विटरवर पंतप्रधान मोदी यांच्या ट्वीटला उत्तर दिलं.
ते म्हणाले, "माननीय पंतप्रधानांच्या आवाहनाचा आम्ही आदर करतो. जीवाची रक्षा हे पुण्याचं परमोच्च कार्य आहे. कोव्हिडची परिस्थिती पाहून नागरिकांनी स्नानाला येणं टाळावं तसंच नियमांचं पालन करावं, अशी मी विनंती करतो."
गेल्या एका आठवड्यापासून कुंभमेळ्यात जमलेल्या भाविकांच्या संख्येवरून देशात जोरदार चर्चा सुरू आहे. बहुतांश लोक कुंभमेळ्यावर टीका करताना दिसत आहेत. कोरोना काळात इतक्या मोठ्या संख्येने लोक एका ठिकाणी जमा होणं धोकादायक ठरू शकतं, असा इशारा देण्यात येत आहे.
हरिद्वारचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. के. झा यांनी दिलेल्या माहितीनुसार 10 ते 14 एप्रिलदरम्यान कुंभमेळ्यात 1664 कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यापैकी 35 जण साधू आहेत. डॉ. झा यांच्या मते येथील पॉझिटिव्हिटी रेट 0.29 टक्के इतकं आहे.
महामंडलेश्वर कपिल दास यांचं कोरोनामुळे निधन
मध्य प्रदेशातल्या निरंजनी आखाड्याचे महामंडलेश्वर कपिल देव दास यांचं कुंभमेळ्यात सहभागी झाल्यानंतर कोव्हिड 19मुळे निधन झालं. ते 65 वर्षांचे होते.एकीकडे देशातील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असतानाच दुसरीकडे उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये सुरू असलेल्या कुंभमेळ्यात लाखो भाविकांनी सहभाग घेतला आहे.
कपिल दास यांच्या निधनानंतर निरंजनी आखाड्याने कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं टाईम्स ऑफ इंडियाने म्हटलंय.कुंभमेळ्यात सहभागी झालेल्या 68 जेष्ठ साधूंना कोरोनाचा संसर्ग झाल्याचंही या बातमीत म्हटलं आहे.कुंभमेळ्यात सहभागी होणाऱ्या नागा साधूंच्या आखाड्यांमध्ये 'जुना आखाडा' सर्वात मोठा आहे. त्यानंतर निरंजनी आखाडा हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा आखाडा आहे. शाही स्नानानंतर आपल्यासाठी कुंभमेळा संपुष्टात आल्याचं या आखाड्याने म्हटलंय.आपल्या छावणीतल्या बहुतेक साधू आणि भाविकांमध्ये कोव्हिडसारखी लक्षणं दिसत असल्याने 17 एप्रिलपासून आपण कुंभमेळ्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं निरंजनी आखाड्याने म्हटलंय.कुंभमेळा अधिकृतपणे 30 एप्रिलला संपणार आहे. यादरम्यान 27 एप्रिलला पुढचं शाही स्नान होईल.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)