You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
देवेंद्र फडणवीसः 'अनिल देशमुख यांच्यावरील आरोप अतिशय गंभीर, तात्काळ राजीनामा द्या'
एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा आणि अनिल देशमुखांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपुरात केली.
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड-परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे.
माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, "परमबीर सिंग यांनी या पत्रात त्यांनी जो संवाद जोडला आहे, त्यातून स्पष्ट होते की, पैशाची थेट मागणी झालेली आहे. ज्याप्रकारे पोस्टिंग, विशिष्ट अधिकार देणे यासाठी आर्थिक व्यवहार होतात, यातून पोलिस दलाचे मोठ्या प्रमाणात खच्चीकरण होताना दिसते आहे. इतके गंभीर आरोप झाल्यानंतर गृहमंत्री आपल्या पदावर राहूच शकत नाही. त्यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे किंवा मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे.
या संपूर्ण आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी करावी. जर केंद्रीय यंत्रणा राज्याला अमान्य असतील, तर न्यायालयाच्या देखरेखीत चौकशी झाली पाहिजे. संपूर्ण महाराष्ट्राची मान खाली घालणारा हा प्रसंग आहे. पोलिस दलाची बदनामी करणारा प्रकार आहे. सेवेत असलेल्या महासंचालकांनी लावलेला हा आरोप असून, त्यांच्या पत्रात थेट पुरावा आहे.
हे सुद्धा आणखी गंभीर आहे की, "परमबीर सिंग यांनी या पत्रात नमूद केल्यानुसार, हा संपूर्ण प्रकार मुख्यमंत्र्यांच्या नजरेस आणून दिला असेल तर त्यांनीं त्याचवेळी कारवाई करायला हवी होती. सरकार वाचविण्यासाठी त्यांनी दुर्लक्ष केले असेल तर असे करून त्यांनी संपूर्ण राज्य धोक्यात टाकण्याचे काम केले आहे".
"गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपांची केंद्रीय यंत्रणांमार्फत चौकशी व्हावी. ती सरकारला मान्य नसेल तर 'कोर्ट मॉनिटर्ड' तपास व्हावा. पत्रातील थेट पुरावे लक्षात घेता हे आरोप संपूर्ण महाराष्ट्राची मान शरमेने खाली घालणारे आहेत. एकतर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा वा मुख्यमंत्र्यांनी त्यांना बडतर्फ करावे", अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केली.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दरमहा 100 कोटी रुपयांची मागणी केली असं पत्र मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वीच सचिन वाझे प्रकरणी परमबीर सिंह यांची मुंबई पोलीस आयुक्त पदावरून बदली करण्यात आली होती.
दरम्यान, 'मुकेश अंबानी प्रकरणी तसेच मनसुख हिरेन हत्याप्रकरणी यांचा सहभाग स्पष्ट हेत असताना त्याचे धागेदोरे परमबीर सिंग यांच्यापर्यंत पोहचणार असल्याचं तपासातून स्पष्ट होत असताना परमबीर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी आणि कारवाईपासून वाचण्यासाठी खोटा आरोप केला आहे', अशी अनिल देशमुख यांनी आपली बाजू ट्वीटरवर मांडली आहे.
जवळपास आठ पानांचं हे पत्र आहे. त्यात त्यांनी गंभीर स्वरुपाचे आरोप करण्यात आले आहेत. वाझेंना खात्यात घेतल्यानंतर त्यांच्यावर मंत्र्यांनी काय काय टार्गेट दिलं होतं आणि कोणी कोणी वाझेंना काय काय सांगितलं होतं, याची सर्व धक्कादायक माहिती या पत्रात देण्यात आली आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)