You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती का? सोशल मीडियावर का सुरू आहे वाद?
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती किंवा नाही, यावरून सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.
या विषयावर सोशल मीडियावर दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे.
या प्रकरणाची सुरुवात महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्या एका ट्विटनंतर झाली होती. त्यानंतर याबाबत आपलं म्हणणं सिद्ध करण्यासाठी दावे-प्रतिदावे करण्यात येत आहेत. हे प्रकरण नेमकं काय ते आपण समजून घेऊ.
शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली होती की नाही याबाबत इतिहासकारांनी आपलं मत नोंदवलं आहे. ते वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
अधिवेशनातील चर्चा आणि सचिन सावंत यांचं ट्वीट
सध्या महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. अधिवेशनातल्या चर्चेदरम्यान बाबरी मशिदीचा मुद्दा उपस्थित झाला होता.
बाबरीबद्दल झालेल्या उल्लेखाच्या पार्श्वभूमीवर ट्वीट केलं होतं, अशी माहिती सचिन सावंत यांनी बीबीसीशी बोलताना दिली.
शुक्रवारी (5 मार्च) दुपारी 12 वाजून 26 मिनिटांनी केलेल्या या ट्विटमध्ये सचिन सावंतांनी म्हटलं होतं, "बाबरी मशीद पाडणे हा भारतीय लोकशाहीवरील कलंक होता आणि शिवरायांच्या विचारांच्या विरोधातही आहे. शिवरायांनी मशीद पाडली नाही, बांधून दिली. शिवरायांचे नाव घेऊन त्यांच्या विचारांना विरोध कसा होऊ शकतो? भाजपाला ते भूषणावह वाटणं असेल तर न्यायालयात मान्य का नाही केलं? पळ का काढला?"
यानंतर सचिन सावंत यांनी त्याच दिवशी रात्री संबंधित आशयाचा एक व्हीडिओ ट्विट केला.
आपल्याला ट्रोल करणारे सगळे भाजपचे कार्यकर्ते असून भाजपच्या आयटी सेलचं हे काम असल्याचा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे.
ट्विटरवरील ट्रोलिंग आणि सावंतांचा पुरावा
सावंत यांच्या या ट्विटनंतर ट्विटरवर दावे-प्रतिदाव्यांना उधाण आलं. काहीजण सचिन सावंत यांचं समर्थन करत होते. तर काहीजण त्यांच्या विरोधात बोलताना दिसले. अनेकांनी सचिन सावंतांना याविषयीचे पुरावेही मागितले.
शंकर मुरकूंबी नामक एका युझरने कल्याण-भिवंडीमधील एका मशिदीबाबत उल्लेख केला आहे. सोबत त्यांनी एक फोटोही जोडलेला आहे. या फोटोची सत्यता बीबीसीने पडताळलेली नाही.
आनंद कथापूरकर यांनीही अशाच प्रकारची प्रतिक्रिया दिली. शिवाजी महाराजांचा खरा इतिहास काँग्रेसनेच बाहेर पडू दिला नव्हता, असा आरोप कथापूरकर यांनी केला.
प्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी यासंबंधी एक थ्रेड ट्वीट केला आहे. मल्हार पांडे यांनी केलेल्या एकाहून अधिक ट्वीट्समध्ये रायगडाबद्दल माहिती दिली आहे. तो ट्वीट करत कौशल इनामदार यांनी लिहिलं आहे की, अत्यंत वाचनीय धागा. आपण सर्वांनी शांत राहून मुळापर्यंत जाणं का गरजेचं आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित करणारा हा धागा आहे. आपण दक्ष राहिलो नाही तर आपल्या गळी इतिहासाच्या नावावर कुठलीही भेसळ उतरवली जाऊ शकते आणि म्हणून इतिहासाच्या मूळ स्रोतांकडे जायला हवं.
सोशल मीडियावर या उलटसुलट प्रतिक्रियांबद्दल बोलताना सावंत यांनी म्हटलं, "माझ्या त्या ट्विटनंतर मला मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आलं. हे काम भाजपचं आहे हे माझ्या तेव्हाच लक्षात आलं होतं. पण कुणीही आपल्या अधिकृत अकाऊंटवरून मला प्रश्न विचारत नव्हतं.
"हिंमत असल्यास भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरून मला थेट प्रश्न विचारा असं आव्हान मी दिलं होतं. पण कुणीही समोर न आल्याने, अखेर मीच याबाबतचा पुरावा सगळ्यांना दिला," असं सावंत म्हणाले.
मशीद बांधल्याचा पुरावा देताना सावंत म्हणतात, "प्रकांड पंडित इतिहास संशोधक जी. एस. प्रभूदेसाई यांच्या 'न्यू हिस्टरी ऑफ द मराठाज - व्हॉल्यूम 1' या पुस्तकात 264-265 क्रमांकाच्या पानावर शिवरायांनी मुस्लीम सैनिकांसाठी मशीद बांधली याचा उल्लेख आहे."
हे ट्विट त्यांनी शनिवारी (6 मार्च) संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांनी केलं आहे.
यासोबत सावंत यांनी एकामागून एक आणखी काही ट्विट केले.
त्यांनी प्रेम हनवते यांच्या पुस्तकाचाही संदर्भ दिला. त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे आद्य शिवचरित्रकार कृष्णाजी केळुसकर यांनी 1907 साली लिहिलेल्या पुस्तकातही छत्रपती शिवाजी महाराज या ग्रंथात महाराजांच्या धर्मनिरपेक्षतेबद्दल लिहिल्याचं सावंत यांनी सांगितलं. तसंच शिवाजी महाराजांच्या राज्यात मुस्लीम प्रजेला आणि त्यांच्या धार्मिक स्थळांना कधीच उपद्रव करण्यात आला नाही, असं मत सचिन सावंत यांनी मांडलं.
इतिहासकारांचं मत काय?
याप्रकरणी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी बीबीसी मराठीने ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्याशीही संपर्क साधला.
"शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली हा दावा कोणत्या आधारांवर केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं आहे. त्याशिवाय शिवाजी महाराजांनी मशीद बांधल्याचा दावा करणं हे अत्यंत धाडसाचं आहे," असं पांडुरंग बलकवडे म्हणाले.
"माझा जितका अभ्यास आहे, त्या माझ्या समजुतीनुसार कोणत्याच कागदपत्रात शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधल्याचा कुठेही उल्लेख नाही. कोणत्याच कागदपत्रात याबाबत लिहिलेलं नाही. 1689 मध्ये रायगड किल्ला मुघलांच्या ताब्यात गेला. त्यानंतर 1707 पर्यंत हा किल्ला मुघलांच्याच ताब्यात होता. मुघलांनी 1707 पासून ते 1733 दरम्यान हा किल्ला जंजिऱ्याच्या सिद्दी जौहरच्या ताब्यात दिला होता. तब्बल 44 वर्षे रायगड किल्ला मुस्लीम शासकांच्या ताब्यात होता."
पांडुरंग बलकवडे यांनी पुढं म्हटलं, "यादरम्यान त्यांनी रायगडावर मशीद बांधली असेल, याची शक्यता गृहीत धरायला हरकत नाही. याचा अर्थ रायगडावर मशीद किंवा त्यासारखी वास्तू असेल तर ती शिवाजी महाराजांनी बांधली असं म्हणणं अत्यंत धाडसाचं ठरेल. कागदोपत्री आजपर्यंत आपल्याकडे शिवाजी महाराजांनी किंवा संभाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधल्याचा कुठलाही पुरावा नाही. त्यांनी याबाबत कागद दाखवल्यास आम्ही ते स्वीकारायला तयार आहोत. "
"1733 मध्ये रायगड किल्ला सिद्दी जौहरकडून पुन्हा मराठ्यांच्या ताब्यात आला. त्यावेळी शाहू महाराजांची सत्ता होती. तेव्हापासून 1818 ला इंग्रजांच्या ताब्यात रायगड किल्ला जाईपर्यंत येथील मोडी भाषेतील 92 रुमाल आहेत. त्यामध्येही कुठे रायगडावर मशिदीचा उल्लेख नाही. ब्रिटिशांनी रायगड किल्ल्याचा ताबा घेतानाही मशिदीचा कुठे उल्लेख केलेला नाही.
कुठल्याही एका पुस्तकावरून शिवाजी महाराजांनी रायगडावर मशीद बांधली असं म्हणता येणार नाही. कांदबरीकार किंवा लेखक पुस्तकात काहीही लिहू शकतो. आवळसकर यांनीही अशा प्रकारचं काही लेखन केल्याचं माझ्या निदर्शनास आलेलं नाही," असं पांडुरंग बालकवडे यांनी म्हटलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)