You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
शेतकरी आंदोलन: टुलकिटवरून दिल्ली पोलिसांनी दाखल केली FIR, ग्रेटाचा उल्लेख नाही
नरेंद्र मोदी सरकारविरोधात सोशल मीडियावर दिलेल्या काही प्रतिक्रियांविरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली आहे. शेतकरी आंदोलनाच्या आडून सरकार विरोधात अशा प्रतिक्रिया दिल्या जात असल्याचे सांगत दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
या एफआयआरमध्ये पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गच्या नावाचा उल्लेख नाहीय.
दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त प्रवीर रंजन यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी आंदोलन सुरू असताना सोशल मीडियावरही पोलिसांची नजर आहे. जवळपास 300 ट्विटर हँडल्स असे आहेत जे शेतकरी आंदोलनाच्या आडून केंद्र सरकारविरोधात ट्वीट करत आहेत.
प्रवीर रंजन यांनी सांगितले, "सोशल मीडियावरील एका अकाऊंटच्या माध्यमातून आम्हाला काही कागदपत्रं मिळाली आहेत. हे एक टूलकिट आहे. यामध्ये 'प्रायर अॅक्शन प्लॅन' नावाचा सेक्शन आहे. या सेक्शनमध्ये शेतकरी आंदोलनादरम्यान काय करायचे आहे याची माहिती देण्यात आलीय. शेतकरी आंदोलन सुरू असताना 23 जानेवारीपासून सलग अनेक ट्वीट्स करायचे आहेत. 26 जानेवारी रोजी दिल्लीच्या सीमेजवळ होणाऱ्या आंदोलनात शिरकाव करायचा आहे आणि पुन्हा सीमेवर परतायचे आहे."
"26 जानेवारीचा घटनाक्रम पाहता या टूलकिटमध्ये दिलेल्या माहितीचे पालन करण्यात आले आहे याचा अंदाज येतो. ही टूलकिट खालिस्तानी समर्थक संघटना पोएटिक जस्टिस फाऊंडेशच्या माध्यमातून बनवले आहे. काही दिवसांपूर्वी हे अपलोड करण्यात आले आणि काही दिवसांनी हे डिलिट करण्यात आले."
"या माहितीच्या आधारे दिल्ली पोलिसांनी आयपीसी कलम 124 ए, 153, 153 ए आणि 120 बी अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाची चौकशी सायबर सेल करत आहे. आम्ही एफआयआरमध्ये कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही," अशी माहिती दिल्ली पोलिसांनी दिली.
पॉप सिंगर रिहानासह पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्ग आणि इतर आंतरराष्ट्रीय कलाकारांनी भारतातल्या शेतकरी आंदोलनावर चर्चा का होत नाहीये असं म्हटल्यानंतर त्यावर सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे.
याआधी, भारताच्या परराष्ट्र खात्याने म्हटले होते की काही सोशल मीडियावर सेन्सेशनिलिजम हवा असतो त्यामुळे काही सेलिब्रिटी परिस्थिती समजून न घेता ट्वीट करत आहेत. त्यानंतर त्यांनी इंडिया अगेन्स्ट प्रोपगंडा हा हॅशटॅग वापरला. हाच हॅशटॅग भारतीय सेलिब्रिटी वापरताना दिसत आहेत.
केंद्र सरकारची भूमिका
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात म्हटले, "भारताच्या संसदेने व्यापक चर्चेनंतर कृषी कायदे मंजूर केले आहेत. हे कायदे शेतकऱ्यांच्या हिताचे असून आर्थिक आणि बाजारपेठांच्यादृष्टीने महत्त्वाचे आहेत.
भारताच्या काही भांगामधील शेतकऱ्यांचा एक छोटा वर्ग या सुधारणांशी सहमत नाही. या आंदोलकांच्या मतांचा आदर राखत सरकारने त्यांच्याशी चर्चा सुरू केली आहे. आतापर्यंत केंद्रीय मंत्र्यांसोबत शेतकऱ्यांची अकरा वेळा चर्चा झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या कायद्यांना स्थगित करण्याचा प्रस्ताव दिला आहे."
परराष्ट्र मंत्रालयाने आपल्या पत्रकात #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग्सचा उल्लेख केला आहे.
"काही गट आपला अजेंडा या आंदोलनाच्या माध्यमातून राबवण्याचा प्रयत्न करत आहेत. असे गट आता आंतरराष्ट्रीय समर्थन घेत आहेत." असंही या पत्रकात म्हटले आहे.
'भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही'
परराष्ट्र मंत्रालयाच्या या पत्रकानंतर बॉलिवूड कलाकारांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांनीही पत्रकाच्या समर्थनार्थ आपले मत मांडले आहे. यावेळी #IndiaTogether आणि #IndiaAgainstPropaganda या हॅशटॅग्सचा वापर करण्यात आला.
सचिन तेंडुलकर म्हणतो, "भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केली जाणार नाही. बाह्यशक्ती बघ्याची भूमिका घेऊ शकतात पण हस्तक्षेप करू शकत नाही. भारतीयांना भारत माहिती आहे आणि देश म्हणून आपण एकत्र राहूया."
तर अभिनेता अक्षय कुमार यांनीही भाष्य केले आहे. अक्षय कुमार म्हणतात, "शेतकरी आपल्या देशाचा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मतभेद निर्माण करणाऱ्यांपासून दूर राहा."
भारताविरोधातल्या दुष्प्रचाराला बळी पडू नका असं अजय देवगणने म्हटलं आहे.
अभिनेते सुनील शेट्टी यांनी ट्वीट करून म्हटले, "कोणत्याही गोष्टीची संपूर्ण माहिती असल्याशिवाय आपण बोलणे योग्य नाही. अर्धसत्याहून धोकादायक काहीच नसते."
दिग्दर्शक करण जोहर यांनीही #IndiaTogether हे हॅशटॅग वापरून म्हटले, "अडचणीच्या काळात आपण संयम राखणं गरजेचे आहे. सर्वांसाठी हिताचा असणारा उपाय काढण्यासाठी आपण एकत्र येऊ. शेतकरी देशाचा कणा आहेत. आम्ही कोणालाही देशाचे विभाजन करू देणार नाही."
गायक कैलास खेर यांनीही समाज माध्यमांवर आपले मत मांडले. ते लिहितात, "आपल्या सर्वांना कल्पना असली पाहिजे की भारत एक आहे आणि याविरोधात आम्ही कोणतेही भाष्य खपवून घेणार नाही."
तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर शेतकरी आंदोलन करत आहेत. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सिंघू, गाजीपूर आणि टिकरी सीमांवर शेतकरी ठाण मांडून बसले आहेत.
या आंदोलनाची देशभरात चर्चा आहे. इतकंच नाही तर हा आता आंतरराष्ट्रीय मुद्दा बनला आहे.
रिहानाने 2 फेब्रुवारी रोजी भारतातल्या शेतकरी आंदोलनासंबंधी ट्वीट केलं. सीएनएनच्या एका बातमीची लिंक शेअर करत ती लिहिते, "आपण या विषयावर का बोलत नाही?" या ट्वीटमध्ये त्यांनी #FarmersProtest हा हॅशटॅगही वापरला आहे.
रिहानाच्या या ट्वीटवर आजवर 66.9 हजार प्रतिक्रिया आल्या आहेत. 14 हजारांहून अधिक लोकांनी हे ट्वीट रिट्वीट केलंय. तर 154.4 हजार लोकांनी या ट्वीटला लाईक केलंय. भारतात रिहाना टॉप ट्वीटर ट्रेंड आहे.
भारताचे अनेक सेलिब्रिटी रिहानाविरोधात एकवटले आहेत. क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरने ट्वीट करून म्हटले आहे की बाहेरच्या देशातील व्यक्तीला भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नाही.
अजय देवगण, कंगना राणावत, अक्षय कुमार या सेलिब्रिटींनी देखील रिहानावर निशाणा साधला आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)