राजीव गांधींच्या मारेकऱ्यांच्या जेलमुक्तीला केंद्र सरकारचा विरोध, सुप्रीम कोर्टात धाव

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या मारेकऱ्यांना तत्काळ तुरुंगातून मुक्त करण्यात यावं, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यावर आता केंद्र सरकारनं पुनर्विचार करण्याची मागणी केली आहे.
या प्रकरणात आम्हाला बाजू मांडण्याची संधी मिळाली नाही, ती मांडण्याची संधी मिळावी, अशी मागणी केंद्रानं सुप्रीम कोर्टाकडे केली आहे. तसंच सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामध्ये त्रुटी असल्याचा दावा केंद्रानं त्यांच्या याचिकेत केला आहे.
राजीव गांधी यांच्या हत्येचा आरोप सिद्ध झाल्यानंतर एकूण 6 आरोपी जन्मठेपेची शिक्षा भोगत होते.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 1
त्याच्या याचिकेवर सुनावणी करताना 11 नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं नलिनी श्रीहरन, आर. पी. रविचंद्रन यांच्यासह 6 आरोपींची तुरुंगातून मुक्तता करावी, असं म्हटलं होतं.
या आरोपींना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट मिळावी, असं तमिळनाडू सरकारने एका प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं. तसंच 2018 मध्ये राज्यपालांनीही आरोपींना शिक्षेतून सूट मिळण्यासाठी विनंती केली होती.
नलिनीने केला होता आत्महत्येचा प्रयत्न
राजीव गांधी यांची मारेकरी नलिनी श्रीहरनने वेल्लोर तुरुंगामध्ये आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं होतं.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त, 2
नलिनी यांना वेल्लोर तुरुंगात सुरक्षित वाटत नाहीये. त्यांना पूझल तुरुंगात हलवण्यात यावं अशी विनंती नलिनीच्या वकिलांनी केली होती.
भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्याप्रकरणातील दोषी नलिनी श्रीहरन हिनं तुरुंगातच आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. नलिनी सध्या तामिळनाडूतील वेल्लोर महिलासाठीच्या विशेष तुरुंगात आहे.
नलिनी ही राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात दोषींपैकी एक आहे.
पोलीस आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, नलिनीची प्रकृती व्यवस्थित आहे. तिने केवळ आत्महत्येची धमकी दिली होती.
मात्र, नलिनीच्या वकिलांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना नलिनीचे वकील म्हणाले, "या प्रकरणाच्या पूर्ण चौकशीची आम्ही मागणी करत आहेत. गेल्या 30 वर्षांच्या तुरुंगवासात तिनं असा कुठलाच आत्महत्येचा प्रयत्न केला नव्हता."
शिवाय, नलिनीला चेन्नईतल्या पुझल तुरुंगात हलवावं. वेल्लोर तुरुंगात ती सुरक्षित नाही, अशी मागणी नलिनीच्या वकिलांनी तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांकडे केलीय.
राजीव गांधी यांची हत्या कशी झाली होती?
21 मे 1991 च्या रात्री 10 वाजून 21 मिनिटांनी तामिळनाडूच्या श्रीपेरंबुदूरमध्ये असंच काहीसं घडलं. जे घडलं ते भीषण होतं. 30 वर्षांची एक बुटकी, सावळी आणि जाडी मुलगी हातात चंदनाचा हार घेऊन राजीव गांधी यांच्या दिशेनं चालू लागली. ती मुलगी राजीव यांच्या पाया पडण्यासाठी वाकली आणि.... आसमंत हादरला, कानठळ्या बसणारा एक स्फोट झाला.
त्यावेळी व्यासपीठावर राजीव यांच्या सन्मानासाठी एक गाणं गायलं जात होतं... त्याचा अनुवाद काहीसा असा होता - 'राजीव यांचं जीवन आमचं जीवन आहे... जर हे जीवन इंदिरा गांधी यांच्या मुलाला समर्पित नाही केलं, तर मग, हे जीवन मिथ्या आहे....'
तिकडून फार तर दहा फूटांवर तेव्हाच्या गल्फ न्यूजच्या प्रतिनिधी आणि सध्या बंगळुरूच्या डेक्कन क्रॉनिकलच्या निवासी संपादकपदी असणाऱ्या नीना गोयल होत्या. राजीव गांधींच्या सहकारी सुमन दुबे यांच्याशी त्या तिथे बोलत उभ्या होत्या.

फोटो स्रोत, Getty Images
त्या प्रसंगाबद्दल नीना थोडं आठवून सांगतात, "सुमनशी बोलून मला दोन मिनिटंही झाली नव्हती आणि तेवढ्यात माझ्या डोळ्यांसमोर बाँबस्फोट झाला. मी शक्यतो पांढरे कपडे वापरत नाही. पण, त्या दिवशी घाईत मी समोर दिसलेली पांढरी साडी नेसले होते. बाँब फुटल्यानंतर मी माझ्या साडीकडे पाहिलं. माझी साडी पूर्ण काळी झाली होती आणि त्यावर मांसाचे तुकडे, रक्ताचे डाग पडले होते. त्या भयानक स्फोटातून मी वाचणं हा चमत्कारच होता. माझ्या पुढे उभे असलेले सगळेच जण त्या स्फोटात मृत्युमुखी पडले."
नीना सांगतात, "बाँब फुटण्याआधी फटाके फुटण्याचा आवाज आला होता. त्यानंतर काही क्षणांच्या शांततेनंतर जोरात बाँबस्फोट झाला. त्या धक्क्यातून बाहेर येत जेव्हा मी पुढे आले तेव्हा आजूबाजूच्या लोकांच्या कपड्यांना आग लागलेली दिसली. लोक जीवाच्या आकांतानं ओरडत होते, चारही बाजूंना पळापळी दिसत होती. आम्हाला हे देखील माहित नव्हतं की राजीव गांधी जिवंत आहेत की नाही."
श्रीपेरंबुदूरमध्ये झालेल्या त्या भयंकर स्फोटावेळी तामिळनाडूतले काँग्रेसचे जी. के. मूपनार, जयंती नटराजन आणि राममूर्ती हे तीनही नेते उपस्थित होते. धूर सरल्यावर राजीव गांधींचा शोध सुरू झाला. त्यांच्या शरीराचा काही भाग छिन्नविच्छिन्न होऊन पडला होता. राजीव यांचं कपाळ फुटल्यानं नीटसं काहीच लक्षात येत नव्हतं. पण, डोक्यातून बाहेर आलेला त्यांचा मेंदू त्यांचे सुरक्षा अधिकारी पी. के. गुप्ता यांच्या पायावर पडला होता. गुप्ता यांना त्याची जाणीव असायचा प्रश्नच नव्हता. कारण, ते स्वतःच शेवटच्या घटका मोजत होते.
नलिनी आणि प्रियंका गांधी भेट
राजीव गांधी यांची मुलगी आणि सध्या काँग्रेस नेत्या असलेल्या प्रियंका गांधी यांनी नलिनी यांची 2008 साली भेट घेतली होती. या भेटीची त्यावेळी बरीच चर्चा झाली होती. नलिनीने या भेटीचा वृत्तांत तिच्या आत्मचरित्रात लिहिला आहे.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








