You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
प्रवीण परदेशी यांची बदली, इक्बाल चहल होणार मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त
मुंबई शहरामधील कोरोनाच्या प्रादूर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय रचनेत काही महत्त्वाचे बदल झाले आहेत.
मुंबई महापालिकेचे आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे आयुक्त म्हणून पदभार स्वीकारतील. प्रवीण परदेशी यांची अर्बन डेव्हलपमेंट विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली करण्यात आलीये.
अश्विनी भिडे यांची मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली झाली आहे. भिडे 1998 च्या तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. मुंबई मेट्रोच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून त्यांची कारकीर्द गाजली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांची या पदावरून उचलबांगडी करण्यात आली होती.
कोव्हिड-19 शी लढा देण्यासाठी स्थापन केलेल्या टास्क फोर्स मध्ये त्यांची नियुक्तीही करण्यात आली होती.
ठाण्याचे माजी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांची मुंबई महापालिकेचे नवीन अतिरिक्त आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड हे नवीन मदत आणि पुनर्वसन सचिव असतील.
मदत आणि पुनर्वसन खात्याचे सचिव किशोरराज निंबाळकर यांची सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मनोज सौनिक यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
कोण आहेत प्रवीण परदेशी?
प्रवीण परदेशी 1986 च्या तुकडीचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी महाराष्ट्र शासनात अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं आहे.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात ते मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होते. गेल्या वर्षी त्यांची मुंबई महापालिका आयुक्त म्हणून नेमणूक झाली होती. लातूर, सोलापूरचे जिल्हाधिकारी, पुणे, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त अशा अनेक महत्त्वाच्या पदांवर त्यांनी काम केलं आहे.
1993 साली लातूर इथं झालेल्या भूकंपाच्या वेळी ते लातूरचे जिल्हाधिकारी होते.
'परदेशी बळीचा बकरा'
"ठाकरे सरकारमुळे मुंबईत कोरोनाची राजधानी झाली आहे आणि बळीचा बकरा म्हणून मुंबई आयुक्त परदेशी परदेशींची तडकाफडकी बदली करण्यात आली," असा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला.
"कोरोनाच्या याची जबाबदारी राजकीय नेतृत्वानं घेतली पाहिजे. मुंबईच्या दोन्ही पालकमंत्र्यांनी त्याची जबाबदारी घ्यायला हवी," असं सोमय्या यांनी म्हटलं.
"मुंबईच्या एका पालकमंत्र्यांचा वरळी मतदारसंघ तर कोरोनामुळे देशात सर्वाधित प्रभावित झाला आहे," असं म्हणत किरीट सोमय्या यांनी आदित्य ठाकरे यांनाही टोला लगावला.
अधिकाऱ्यांमधील धुसफुशीत परदेशींचा बळी- प्रवीण दरेकर
अजॉय मेहता आणि परदेशींमध्ये युद्ध सुरू होतं. दोघांपैकी एकाचा (परदेशींचा) बळी गेलाय. अधिकाऱ्यांमधली धुसफूस या निमित्ताने बाहेर आली आहे. नविन येणाऱ्या अधिकाऱ्याला आता सगळं नव्याने समजून घ्यावं लागेल. बदली हा काही मार्ग नाही. जुन्या अधिकाऱ्याला अधिक मदत देऊन काम करून घेणं जास्त योग्य असलं असतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)