You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नारायण राणे : बाजारात अजून बरेच आमदार आहेत
"राष्ट्रवादीचे आमदार अजित पवारांनी फसवून आपल्याला राजभवनात नेलं असं म्हणत आहेत. ते काय लहान आहेत का 10-12 वर्षांचे की फसतील? मी त्या सर्व आमदारांना ओळखतो, आम्ही सोबत कामही केलयं. 1 ते 2 आमदार गेले म्हणून फरक पडत नाही, बाजारात आणखी बरेच आमदार आहे. काही येणारे आहेत, काही सीमेवर आहेत, त्यामुळे काही फरक पडत नाही."
हे वक्तव्य आहे भाजप नेते राणे यांचं. शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या 'महाविकास आघाडी'चं सरकार सत्तेत येणार, अशी चिन्हं असताना शनिवारी सकाळी देवेंद्र यांनी मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
त्यानंतर झालेल्या संपूर्ण घटनाक्रमाबदद्ल बीबीसी मराठीशी बातचित केली.
"महाराष्ट्रात भुकंप झाला असं म्हटलं जातयं, पण हा भुकंप नसून ही गोष्ट घडणारच होती. मी काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की, महाराष्ट्रात फक्त भाजपचं सरकार बनवणार आहे आणि लवकरच सरकार बनवलं जाईल. त्याला एक आठवडा होत नाही, तोच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली. उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतली आहे. परत भाजपचंच सरकार आलेलं आहे, सहकारी म्हणून अजित पवार यांचा पाठिंबा आहे," भाजप नेते नारायण राणे म्हणाले.
"मला वाटतं सरकार महाराष्ट्रात पाच वर्ष टिकेल, चांगलं काम करेल, कारण देवेंद्र फडणवीस यांना 5 वर्षांचा अनुभव आहे. अनेक वर्षांचा अनुभव अजित पवारांना आहे. दोघंही नेते अनुभवी आहेत, याचा भाजपला नक्कीच फायदा होईल," असंही राणे यांनी सांगितलं.
नारायण राणे यांच्याशी प्राजक्ता पोळ यांनी केलेली बातचित-
प्रश्न - अजित पवार किती दिवसांपासून भाजपच्या संपर्कात होते?
ती माहिती देणं योग्य होणार नाही, पण आजही शिवसेना आणि कॉंग्रेसचे लोक संपर्कात आहे. याचा अर्थ असा नाही की, अजित पवारच संपर्कात होते, अनेक पक्षाचे लोक संपर्कात आहे. पण त्यांना बंद करुन ठेवलंय, हॉटेलमध्ये ठेवलयं. अर्थात, किती दिवस ठेवू शकतील. काही लोक राहणारच नाही शिवसेनेमध्ये अथवा कॉंग्रेसमध्ये. शिवसेना किंवा शिवसेनेच्या संजय राऊतांकडून जी भाषा बोलली जाते, ती भाषा महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यात शोभणारी नाहीये.
भाजपवर होणाऱ्या आरोपांना मी येत्या दोन दिवसात उत्तर देइलच. 56 आमदार निवडून आल्यावर मुख्यमंत्री आमचा म्हणणं चुकीचं आहे. बहुमताला 145 लोक लागतात, पण 145 नसतांना आमचंच सरकार येणार, आमचाच मुख्यमंत्री होणार असं बोलणं चुकीचं आहे भाजपला बहुमत सिद्ध करण्यासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. हा विश्वासदर्शक ठराव भाजप आणि अजित पवार सिद्ध करतील यावर माझा विश्वास आहे.
प्रश्न - किती आमदार संपर्कात आहे आणि फ्लोअर टेस्टच्या वेळेला ते दिसतील का?
30 तारखेच्या आधी मी काहीही सांगू शकत नाही. भाजप 165चा आकडा पार करेल, सरकार 5 वर्षं टिकेल एवढं नक्की.
प्रश्न - अजित पवार भाजपात राहू शकतील का?
अजित पवारांसारखा नेता जेव्हा निर्णय घेतो, तेव्हा तो आपल्या विचाराशी ठाम असतो. मी कुणाच्या कुंटुबाअंतर्गतचा विषय बोलू इच्छित नाही. तो त्यांचा प्रश्न आहे, पण अजित पवारांनी ज्या अर्थी हा निर्णय घेतलाय, त्या अर्थी ते आपल्या विचाराशी एकदम पक्के असतील, यावर माझा विश्वास आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)