विधानसभा निवडणूक : राज्यात 60 टक्के मतदान, एक्झिट पोल्सचा अंदाज युतीचं सरकार येणार

महाराष्ट्रातल्या 288 जागांसाठी आज मतदान झालं. राज्यात आज 60 टक्के मतदान झाल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. काही अपवाद वगळता राज्यात सर्वत्र शांततेत मतदान पार पडलं.

मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे सर्वेक्षण आले आहेत. या सर्वेक्षणांचा असा अंदाज आहे की राज्यात पुन्हा शिवसेना-भाजपचं सरकार येऊ शकतं. यासंदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.

विधानसभेबरोबरच सातारा लोकसभेची पोटनिवडणूकही आज होत आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 60.5 टक्के मतदान झालं आहे.

राज्यात बहुतेक ठिकाणी पाऊस होता पण मतदारांचा उत्साह अवर्णनीय होता. राजकीय नेते आणि सेलिब्रिटींनी मतदानाला सहकुटुंब मतदान केलं. काही ठिकाणचे अपवाद वगळता राज्यभरात शांततेत मतदान पार पडलं.

एक्झिट पोल्सचे निकाल काय सांगत आहेत?

सर्व एक्झिट पोल्सचे निकाल आले आहेत. सर्व पोल्सनुसार राज्यात पुन्हा शिवसेना भाजपचीच सत्ता येणार, असा अंदाज सर्व पोल्सनी व्यक्त केला आहे.

या सर्व पोल्समध्ये एक गोष्ट समान आहे. ती म्हणजे महायुतीला पुन्हा लोकांनी कौल दिलाय, असा अंदाज सर्वांनी व्यक्त केलाय. 145 हा बहुमताचा आकडा आहे. सर्व पोल्सनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळू शकतं. अधिक माहितीसाठी या लिंकवर क्लिक करा.

सायंकाळी 6.30 वाजता - निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद

  • राज्यात 8 कोटी 97 लाख 22 हजार 19 मतदार. यापैकी 4 कोटी 28 लाख 43 हजार 635 महिला मतदार.
  • एकूण 3 हजार 237 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.
  • 352 पोलिंग स्टेशन पूर्णपणे महिला कर्मचाऱ्यांनी सांभाळले.
  • 2014 मध्ये मतदानाची टक्केवारी 63.08 होती, 2019 लोकसभेत ती 60.79 टक्के, तर 2019च्या विधानसभा निवडणुकीत 60.05 टक्के मतदान.
  • सातारा लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 60.5 टक्के मतदान.

बारामतीत ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा पूल तयार करून मतदान

बारामती तालुक्यातल्या कांबळेश्वरमध्ये प्रचंड पाऊस झाल्यामुळे मतदान केंद्र परिसरात चिखल साचला होता. त्यामुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचता यावं म्हणून गावकऱ्यांनी ट्रॅक्टरच्या ट्रॉलीचा पूल तयार केला.

दुपारी 3.30 वाजता - शाहरूख खान यांनी बजावला मतदानाचा हक्क

अभिनेते शाहरूख खान आणि त्यांच्या पत्नी गौरी खान यांनी बांद्रा पश्चिम या पोलिंग बूथवर मतदान केलं आहे.

दुपारी 2 वाजून 39 मिनिटं - वरळी मतदारसंघातल्या बूथवरचं ईव्हीएम मशिन बदललं

आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातल्या बूथ क्रमांक 62 वर ईव्हीएम मशिनमध्ये तांत्रिक अडचण उद्भवली. नंतर ते मशिन बदलण्यात आलं त्यानंतर मतदान सुरळीत पार पडल्याचं निवडणूक अधिकारी सुषमा सातपुते यांनी सांगितलं.

दुपारी 1.52 - माधुरी दीक्षित यांचं आवाहन

माधुरी दीक्षित यांनी त्यांचा मतदान केलेला फोटो ट्वीट करत तुम्ही मतदान केलं का, असं चाहत्यांना विचारलं आहे.

दुपारी 1.20 - 100 वर्षांच्या आजींचेही मतदान

सखुबाई नामदेव चुंभळे या 100 वर्षांच्या आजींनी आज मतदानाचा अधिकार बजावला. 1960 पासून आजपर्यंत प्रत्येक विधानसभा निवडणुकीत त्यांनी मतदान केलं आहे.

दुपारी 1 - मुनगंटीवार यांचे मतदान

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कुटुंबीयांसह मतदानाचा हक्‍क बजावला. चंद्रपुरातल्या सिटी हायस्‍कूलमध्ये त्यांनी मतदान केलं.

दुपारी 12.31 - हर्षवर्धन पाटील यांचे सहकुटुंब मतदान

दुपारी 12.10 - राज्यात 11 वाजेपर्यंत 17.50 टक्के मतदान

राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये आतापर्यंत 17.50 टक्के मतदान झालं आहे. रत्नागिरी मतदारसंघात आतापर्यंत सर्वांत जास्त म्हणजे 62.20 मतदान झालं आहे. तर सर्वांत कमी मतदन हडपसर मतदारसंघात झालं आहे. इथं 7.66 टक्के मतदान झालं आहे.

सकाळी 11.59 - काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचं मतदान

काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी सहकुटुंब मतदान केलं. मतदान करणं हे राष्ट्रीय कर्तव्य असून सर्वांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन त्यांनी यावेळी केलं.

सकाळी 11.58 - आठवलेंचे पवारांना प्रत्युत्तर

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वांद्रे पूर्व इथं मतदान केलं. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्या कुस्तीच्या वक्तव्यावर कवितेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिलं.

सकाळी 11.30 - लातूरमध्ये देशमुख कुटुंबीयांचे मतदान

देशमुख कुटुंबीयांनी लातूरच्या बाभुळगावमध्ये मतदान केलं. यावेळी रितेश आणि जेनेलिया देशमुखसद्धा उपस्थित होते.

सकाळी 11.26 - उद्धव ठाकरे यांचं मतदान

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी वांद्रे पूर्व इथल्या जीवन विद्यामंदिरात त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी 11.19 - राज ठाकरे यांनी केले मतदान

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दादरमधल्या बालमोहन विद्यामंदिरात मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांचे कुटुंबीयही उपस्थित होते.

सकाळी 11 - मतदारसंघात लढायचं आमचं ठरलं होतं - पृथ्वीराज चव्हाण

यंदाच्या निवडणुकीत काँग्रेसचा प्रचार एवढा का ढेपाळला होता, याविषयी जेव्हा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना विचारलं तेव्हा, 'यंदा आम्ही मतदारसंघांमध्ये लढायचं ठरवलं होतं,' असं उत्तर त्यांनी दिलं आहे.

सकाळी 10.52 - काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांचे मतदान

सकाळी 10.43 - गोपीचंद पडळकर यांचे मतदान

गोपीचंद पडळकर यांनी आटपाडीमध्ये मतदान केलं. ते बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात भाजपच्या तिकीटावर निवडणूक रिंगणात आहेत.

सकाळी 10.40 - बाळासाहेब थोरात यांचे मतदान

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी संगमनेरमध्ये कुटुंबीयांसह मतदान केलं.

सकाळी 10.31 - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मतदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबीयांसह नागपूरमध्ये मतदान केलं. यावेळी त्यांनी सर्वांना मतदान करण्याचं आवाहन केलं. देवेंद्र फडणवीस यांनी धरमपेठेतील मतदार केंद्रात मतदान केलं. यावेळी त्याच्या पत्नी अमृता फडणवीस आणि त्यांच्या आई देखील उपस्थित होत्या.

सकाळी 10.24 - प्रकाश आंबेडकर यांचे मतदान

'जसं पावसाने हवामान विभागाचा अंदाज खोटा ठरवला तसंच तुम्हाला निवडणुकीत दिसेल,' असं मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय.

सकाळी 10.15 - विकास महात्मे यांचे सायकलवरून मतदान

सकाळी 10.10 - नवनीत राणा यांचे मतदान

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवीराणा यांनी अमरावतीमध्ये मतदान केलं.

सकाळी 10 - शरद पवार यांचे मतदान आणि आवाहन

शरद पवार यांनी मुंबईमध्ये त्यांच्या मतदनाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. निसर्गाचं सहकार्य नसलं तरी मतदान करा असं आवाहन त्यांनी यावेळी मतदारांना केलं आहे.

सकाळी 9. 30 - रोहि आर. आर. पाटील यांचे मतदान

सकाळी 9.15 - मोर्शीमध्ये स्वाभिमानी पक्षाच्या उमेदवारावर हल्ला

अमरावती जिल्ह्यातील मोर्शीमध्ये कृषिमंत्री अनिल बोंडे यांच्या विरोधात उभे असलेले उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला झाला आहे. वरुड गावापासून 6 किमी अंतरावर अज्ञातांकडून हल्ला झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. यात देवेंद्र भुयार बचावले असले तरी त्यांची चारचाकी गाडी जळून राख झाली आहे. या घटनेनंतर रक्तदाब कमी झाल्याने भुयार यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

सकाळी 9 - सांगलीत मतदान केंद्राबाहेर पाणी

सकाळी 8.52 - परळी नाट्यावर बोलण्यास सुप्रिया सुळे यांचा नकार

मी यंदा परळीला प्रचाराला गेले नाही, त्यामुळे तिथल्या परिस्थतीवर भाष्य करणार नाही, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. बीबीसी मराठसाठी हलिमा कुरेशी यांनी त्यांना परळीत मुंडे भाऊबहिणीमध्ये सुरू असलेल्या वादावर विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिलं आहे.

सकाळी 8.37 - मुंबईत पावसाची उघडीप

मुंबईत पावसाच्या उघडीपीत मतदानाला सुरूवात झाली आहे. वांद्रे पूर्वमधली नवजीवन विद्यामंदिरातील मतदान केंद्राचा आढावा घेतला आहे बीबीसीच्या प्रतिनिधी जान्हवी मुळे यांनी.

सकाळी 8.30 सुप्रिया सुळे आणि प्रतिभा पवार यांचे मतदान

शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांनी रिमांड होम, बारामती इथं मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी 8.10 - देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होणार

केंद्रीय रस्तेवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरमध्ये मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीसच पुन्हा मुख्यमंत्री होतील असं त्यांनी म्हटलंय.

पंतप्रधान मोदींचे आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मराठीमध्ये ट्वीट करून सर्वांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावण्याचं आवाहन केलं आहे.

सकाळी 7.11 - उदयनराजेंचे मतदान

साताऱ्यामध्ये लोकसभेची पोटनिवडणूकसुद्धा होत आहे. त्यासाठी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांनी मतदानाचा हक्क बजावला.

सकाळी 7 - महाराष्ट्रात मतदानाला सुरुवात

राज्यात ठिकठिकाणी मतदानासा सुरूवात झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीमधल्या काठेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

नागपूरमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांनी मतदानाचा हक्क बजावला.

भारतीय जनता पक्ष, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि वंचित बहुजन आघाडी रिंगणात आहेत.

मतदानासाठी यंदा राज्यात एकूण 96,661 मतदानकेंद्रं उभारण्यात आली आहेत, तर 1,35,021 VVPAT मशीन असतील.

सकाळी 6.30 - मुंबई परिसरात तुरळक पाऊस

मुंबई आणि परिसरात आजच्या मतदानाच्या दिवशीसुद्धा तुरळक पाऊस पडत आहे. राज्यात आज काही ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

नाशिक, अहमदनगर परिसरात सुद्धा तुरळक पाऊस सुरू आहे.

रात्री 10.30 वाजता - पाहा महाराष्ट्राची लढत आकड्यांमध्ये

रविवारी रात्री 8.30 वाजता - मतदान केंद्रांची तयारी

मुंबईतील धारावी परिसरात मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे.

संध्याकाळी 7 वाजता - 'मतदानकेंद्रांभोवतीची इंटरनेट सेवा बंद करा'

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवाजीराव गरजे यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवून 'मतदानकेंद्रांभोवतीची इंटरनेट सेवा बंद ठेवण्याची' विनंती केली आहे.

"EVM आणि VVPAT मशीन हॅक होऊ शकतात. त्यामुळे आपलं मत आपल्या पसंतीच्या उमेदवाराला जात नाही, अशी शंका महाराष्ट्राच्या जनतेला आजही आहे. हे हॅकिंग मोबाईल नेटवर्कने होतं, त्यामुळे मतदानकेंद्रं आणि आणि जिथे मतपेट्या ठेवल्या जातील, त्या स्ट्राँगरूमभोवतीच्या 3 किमी परिघातील सर्व मोबाईल इंटरनेट सेवा बंद करण्यात याव्या," असं या पत्रात म्हटलं आहे.

विधानसभा निवडणूक 2019 ची आकडेवारी (स्त्रोत - निवडणूक आयोग)

पक्षनिहाय उमेदवारांची संख्या

इतर रंजक माहिती

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)