मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्र: नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर, अरविंद सावंत, रावसाहेब दानवेंनी घेतली शपथ

गुरुवारी संध्याकाळी नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह देशभरातल्या अनेक नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात महाराष्ट्रातले अनेक चेहरे होते.

भाजप नेते नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. भाजपचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचीही मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. रामदास आठवले यांनीही केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली.

चार वेळा लोकसभेत निवडून येणारे अकोल्याचे खासदार संजय धोत्रे हे मोदींच्या मंत्रिमंडळातील नवीन चेहरा आहेत.

महाराष्ट्रातले मंत्री आणि त्याना मिळालेली खाती

गेल्या वेळेस नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्याला अनेक महत्त्वाची खाती आली होती. यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपसह शिवसेनेनेही घवघवीत यश मिळावलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या खात्यात कोणती मंत्रिपदं येणार, खातेवाटपात शिवसेनेच्या वाट्याला काय येणार, याची उत्सुकता आहे.

पहिल्या मोदी सरकारमध्येही महाराष्ट्रातले अनेक मंत्री होते - नितीन गडकरी, गोपीनाथ मुंडे, अनंत गीते, प्रकाश जावडेकर, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, डॉ. सुभाष भामरे, रावसाहेब दानवे, हंसराज अहीर, रामदास आठवले.

परंतु शपथविधीनंतर आठवड्याभराच्या अंतरानेच गोपीनाथ मुंडे यांचे निधन झाले. तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यावर मार्च 2015 मध्ये रावसाहेब दानवे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला.

नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचे अनंत गीते आणि भाजपाचे हंसराज अहीर पराभूत झाले. मात्र अहीर यांना पुन्हा संधी देण्यात येईल, अशी चर्चा आहे.

शिवसेनेतर्फे अरविंद सावंत

शिवसेनेचे अनंत गीते पराभूत झाल्यामुळे आता त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार नाही, असं दिसतं. गेल्या मंत्रिमंडळामध्ये ते अवजड उद्योग खात्याचे मंत्री होते.

आता शिवसेनेकडून अरविंद सावंत शपथ घेतील, असं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शपथविधीच्या आधी स्पष्ट केलं होतं. अरविंद सावंत दक्षिण मुंबई मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा विजयी झाले आहेत.

1999-2002 आणि 2004-2010 या कालावधीत ते महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. गेल्या लोकसभेत त्यांनी मुंबईतील विविध विषयांवर आपली मते मांडली होती. शिवडी येथील बीडीडी चाळीच्या पुनर्वसनाचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला होता.

अनंत गीते यांच्यासह शिवाजीराव आढळराव पाटील, चंद्रकांत खैरे, आनंदराव अडसूळ यांचाही या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला आहे. त्यामुळे आता मंत्रिपद कोणाला मिळणार यावर चर्चा सुरू होती. आता राऊत यांनी केलेल्या घोषणेमुळे त्याला पूर्णविराम मिळाला आहे.

कोणाचे मंत्रिपद कायम राहाणार?

गेल्या मंत्रिमंडळातील सदस्य नितीन गडकरी, पीयूष गोयल, सुरेश प्रभू, प्रकाश जावडेकर यांची मंत्रिपदं कायम राहातील, असं सांगण्यात येतं.

त्याचप्रमाणे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एकमेव खासदार रामदास आठवलेसुद्धा या नव्या मंत्रिमंडळात असतील असं सांगितलं जात आहे. दिल्लीमध्ये आठवले यांच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी त्यांच्या अभिनंदनासाठी तयारी सुरू केली आहे.

मुंबईच्या पारड्यात काय?

पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळामध्ये मंत्रिमंडळात मुंबईतील खासदार मोठ्या संख्येने होते. मनोहर जोशी, राम नाईक, जयवंतीबेन मेहता या कालावधीमध्ये मंत्री झाले. लोकसभेचे सभापती जीएमसी बालयोगी यांचे निधन झाल्यानंतर मनोहर जोशी यांच्याकडे लोकसभेचे सभापतिपद आले.

त्याप्रमाणे प्रमोद महाजन मंत्रिमंडळात महत्त्वाच्या स्थानी होते. (1996-98 या कालावधीत प्रमोद महाजन मुंबई ईशान्य मतदारसंघातून लोकसभेत गेले होते.)

नरेंद्र मोदी यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात पीयूष गोयल, सुरेश प्रभू, स्मृती इराणी, हे मुंबईत राहाणारे परंतु राज्यसभेत निवडून गेलेले सदस्य होते.

आता अरविंद सावंत यांच्या निमित्ताने मुंबईला मंत्रिमंडळात स्थान मिळाले असले तरी भाजप आपल्या कोणत्या सदस्याला संधी देतो याची उत्सुकता सर्वांना आहे.

गेल्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्राच्या वाट्याला भूपृष्ठ वहन, जहाजबांधणी, संरक्षण (राज्यमंत्री), रेल्वे, मनुष्यबळ विकास, नागरी हवाई उड्डाण, सामाजिक न्याय (राज्यमंत्री) अशी महत्त्वाची खाती आली होती.

दरम्यान, उत्तर गोवा मतदारसंघातून पाचव्यांदा लोकसभेत जाणारे श्रीपाद नाईक यांना यंदा पुन्हा मंत्रिपद मिळू शकतं. पहिल्या मोदी सरकारमध्ये केंद्रीय आयुष मंत्री (स्वतंत्र कारभार) राहिलेले नाईक यांनी ANI शी बोलताना सांगितलं, "मी आभार मानतो पंतप्रधान मोदींचे की त्यांनी मला पुन्हा सरकारमध्ये घेऊन देशसेवेची संधी दिली. मला शपथविधीसाठी बोलावणं आलं आहे, मात्र अजूनपर्यंत कुठलं खातं मिळेल, हे सांगण्यात आलेलं नाही."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)