लोकसभा निवडणूक: पाचव्या टप्प्यात सात राज्यांतील 51 जागांसाठी 62.46 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीतील मतदानाच्या पाचव्या टप्प्यांत 7 राज्यांमधील 51 मतदारसंघांमध्ये 62.46 टक्के मतदान झालं आहे. निवडणूक आयोगानं मतदानाची अंतरिम टक्केवारी जाहीर केली आहे.

बिहारमध्ये 57.76 टक्के, जम्मू-काश्मिरमध्ये 17.07 टक्के, झारखंडमध्ये 64.60 टक्के, मध्य प्रदेशमध्ये 62.61 टक्के, राजस्थानमध्ये 63.69 टक्के, उत्तर प्रदेशमध्ये 57.06 टक्के मतदान झाल्याची आकडेवारी निवडणूक आयोगानं प्रसिद्ध केली आहे. पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक म्हणजे 74.42 टक्के मतदान झालं आहे.

पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, सोनिया गांधी, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि स्मृती इराणी यांच्यासह अनेकांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे.

या टप्प्यात उत्तर प्रदेशातील 14, मध्य प्रदेशातील 7, बिहारमधल्या 5, राजस्थानातील 13, झारखंडमधल्या 4, जम्मू-काश्मीरमधील 2 आणि बंगालमधील 7 जागांवर मतदान झालं.

हा टप्पा भाजपसाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण 2014च्या निवडणुकीत या 51 जागांपैकी 39 जागा भाजपने जिंकल्या होत्या.

राजस्थानमधील ज्या 12 जागांवर मतदान होत आहे, त्या सर्व जागा 2014च्या निवडणुकीत भाजपच्या पारड्यात पडल्या होत्या.

उत्तर प्रदेशमधील 14 जागांपैकी 12 जागा भाजपच्या खात्यात गेल्या होत्या. काँग्रेसनं जिंकलेल्या दोन जागा होत्या रायबरेली आणि अमेठी. पण आता उत्तर प्रदेशमध्ये सपा आणि बसपाची युती झाली आहे. राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुका जिंकल्यानंतर काँग्रेसचाही आत्मविश्वास वाढला आहे. त्यामुळेच उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपसाठी ही निवडणूक तितकी सोपी नाहीये.

अमेठीकडे सर्वांचेच लक्ष

पाचव्या टप्प्यातील सर्वांत लक्षवेधी लढत आहे अमेठीची. इथं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींसमोर केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचं आव्हान आहे. अमेठी हा काँग्रेसचा परंपरागत मतदारसंघ आहे. काँग्रेस केवळ दोन वेळा अमेठीमध्ये पराभूत झाली आहे.

राहुल गांधी 2004 पासून अमेठीचं प्रतिनिधीत्व करत आहेत. गेल्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींना 4 लाख 8 हजार मतं मिळाली होती तर स्मृती इराणी यांना 3 लाख. पराभवानंतरही स्मृती इराणी अमेठीमध्ये आपलं काम सुरूच ठेवलं होतं. त्यामुळंच यावेळी राहुल गांधींसमोर स्मृती इराणींचं आव्हान अधिक कडवं असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.

रायबरेलीतून निवडणूक लढवत असलेल्या सोनिया गांधींसाठी मात्र ही निवडणूक फारशी कठीण जाणार नाही, असं राजकीय विश्लेषक सांगतात. काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले दिनेश प्रताप सिंह सोनिया गांधींविरोधात निवडणूक लढवत आहेत.

राजनाथ सिंह विरुद्ध पूनम सिन्हा

केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह हे लखनौमधून निवडणूक लढवत आहेत. लखनौ हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा मतदारसंघ होता.

राजनाथ सिंह यांच्या विरोधात सपा-बसपा आघाडीनं शत्रुघ्न सिन्हा यांच्या पत्नी पूनम सिन्हांना उमेदवारी दिली आहे. स्वतः काँग्रेसचे पाटणा साहीबचे उमेदवार असलेले शत्रुघ्न सिन्हा हे पूनम यांच्या प्रचारसभांमध्ये ठळकपणे दिसत होते.

राजस्थानमध्ये दोन खेळाडूंमध्ये लढत

राजस्थानमध्ये लोकसभेच्या 12 जागांसाठी मतदान होत आहे. दोन केंद्रीय मंत्रीही निवडणुकीच्या रिंगणात आहेत. जयपूर ग्रामीणमधून राज्यवर्धन सिंह राठोड तर बिकानेरमधून अर्जुन राम मेघवाल निवडणूक लढवत आहेत.

राज्यवर्धन सिंह राठोड हे ऑलिंपिक पदक विजेते खेळाडू आहेत. त्यांच्याविरोधात काँग्रेसनं ऑलिंपिकमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूलाच उमेदवारी दिली आहे. काँग्रेसकडून राज्यवर्धन सिंह राठोड यांच्याविरोधात भारताची थाळीफेकपटू कृष्णा पुनिया निवडणूक लढवत आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)