You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
नाही, सरकार स्थापन करण्यासाठी लढणारा भाजप एकमेव पक्ष नाही- फॅक्ट चेक
- Author, सुप्रीत अनेजा
- Role, फॅक्ट चेक टीम
2019 लोकसभा निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी भाजपशिवाय कोणताही पक्ष प्रयत्न करताना दिसत नाही, अशी एक पोस्ट सोशल मीडियावर प्रसिद्ध झाली आहे.
सात टप्प्यांमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर होतील. गुरुवारी या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान झालं.
या पोस्टमध्ये म्हटलं आहे, "जनादेश मिळवण्यासाठी तुम्हाला 273 जागांची गरज आहे. काँग्रेस फक्त 230 जागा लढवत आहे. समाजवादी पक्ष 37, बहुजन समाज पक्ष 37, राजद 20 आणि तृणमूल काँग्रेस 42 जागा लढवत आहे.
त्यामुळे इतर कोणताही पक्ष सरकार स्थापन करण्यासाठी निवडणूक लढवताना दिसत नाही. ते केवळ भाजपाला स्पष्ट जनादेश मिळवण्यापासून रोखण्यासाठी आणि देशाची घडी विस्कटण्यासाठी निवडणूक लढवत आहेत."
'वुई सपोर्ट नरेंद्र मोदी' यासारख्या अनेक उजव्या विचारसरणीच्या फेसबूक ग्रुप्सवर ही पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
शेअरचॅटसारख्या प्लॅटफॉर्मवर हजारो लोकांनी ही पोस्ट पाहिली आहे.
या फोटोतील माहितीची सत्यता जाणण्यासाठी आमच्या व्हॉट्सअप वाचकांनीही आम्हाला विचारले आहे.
या पोस्टमध्ये केलेला दावा खोटा असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे.
फॅक्ट चेक
लोकसभेची निवडणूक 543 मतदारसंघांमध्ये होत असून दोन जागा नियुक्त सदस्यांसाठी आहेत. सरकार स्थापन होण्यासाठी कोणत्याही पक्षाला किमान 272 जागांची गरज असते.
भाजपा 272 पेक्षा अधिक मतदारसंघात लढून स्पष्ट जनादेश मिळवून सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करत आहे हे खरं आहे. आतापर्यंत पक्षाने जाहीर केलेल्या 19 याद्यांमुळे हा पक्ष 433 जागांवर लढत असल्याचं दिसून येतं. परंतु काँग्रेस केवळ 230 जागा लढवत आहे ही माहिती चुकीची आहे.
काँग्रेस पक्षाच्या अधिकृत वेबसाईटवर विविध मतदारसंघात निवडणूक लढवणाऱ्या त्यांच्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
हा पक्ष 543 पैकी 379 जागांवर निवडणूक लढवत आहे.
तृणमूल काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष, समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल हे सर्व प्रादेशिक पक्ष आहेत.
हे पक्ष केवळ ठराविक प्रदेशापुरते मर्यादित असल्यामुळे ते केवळ आपल्याच राज्यात निवडणूक लढवत आहेत.
समाजवादी पक्ष उत्तर प्रदेशात 37 जागा आणि बहुजन समाज पक्ष 38 जागांवर निवडणूक लढत आहेत. या दोन्ही पक्षांनी आघाडी केली आहे.
राजद बिहारमधील पक्ष असून त्यांनी 20 उमेदवार जाहीर केले आहेत.
तृणमूल काँग्रेसने 42 उमेदवार घोषित केले असून ते पश्चिम बंगालमधील सर्व मतदारसंघात निवडणूक लढवत आहेत.
भाजप आणि काँग्रेस या दोन पक्षांनी देशातील विविध राज्यांमध्ये उमेदवारांना तिकीट दिले आहे.
काँग्रेसने केवळ 230 जागांवर उमेदवार घोषित केले आहेत हा दावा पूर्णतः खोटा आहे. बहुमताच्या 272 पेक्षा अधिक म्हणजे 379 जागांवर काँग्रेस निवडणूक लढवत आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)