You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबई ब्रिज दुर्घटन : संध्याकाळपर्यंत जबाबदार कोण हे शोधणार - मुख्यमंत्री
मुंबईमध्ये सीएसटीजवळ पादचारी पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. संध्याकाळी 7.30 च्या दरम्यान ही घटना घडली.
या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 36 जण जखमी झाल्याची माहिती एएनआयआय वृत्तसंस्थेने दिली आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे. अपूर्वा प्रभू (35) , रंजना तांबे(40), भक्ती शिंदे (40), तपेंद्र सिंग, मोहन कायंगडे (58) आणि झहीद सिराज खान (32 वर्षे) अशी मृतांची नावं असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे.
दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची विचारपूस केली आहे, "ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. 10 जण वॉर्डमध्ये आणि एक आयसीयूमध्ये आहे. यासंदर्भात उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच या घटनेसाठी जबाबदार कोण आहे? याबाबत आज संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्याचे महापालिका आयुक्तांना आदेश देण्यात आले आहेत," असं त्यांनी यावेळी सांगितलं आहे.
जखमींना सेंट जॉर्ज, जीटी तसंच सायन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
घटनेनंतर तातडीनं या भागात मदतकार्य सुरू करण्यात आलं आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 4 ते 5 गाड्या सध्या घटनास्थळी आहेत. मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस स्टेशनवरून दुसऱ्या बाजूला म्हणजेच अंजुमन इस्लाम हायस्कूलकडे जाण्यासाठी या लोखंडी फूटओव्हर ब्रीजचा वापर होतो.
'दोषींवर कठोर कारवाई करू'
ही दुर्घटना दुःखद असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. "हा ब्रिज 1980 साली बांधण्यात आला आहे. गेल्यावर्षी एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर मुंबईतील सर्व पुलांचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आले होते. या ऑडिटमध्ये हा पूल धोकादायक नसल्याचं समोर आल्याची माहिती मला महापालिका आयुक्तांनी दिली आहे. मात्र एवढ्या चाचणीनंतरही हा पूल कोसळत असेल त्याची सखोल चौकशी होईल. दोषींवर आम्ही कठोर कारवाई करू," असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.
या दुर्घटनेच्या चौकशीसाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात आल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांची मदत घोषित करण्यात आली असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
'दुर्घटनेसाठी रेल्वे प्रशासन जबाबदार'
दररोज हजारो लोक स्टेशनमधून बाहेर पडण्यासाठी या पुलाचा वापर करतात. अशावेळी लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिनं या पुलाचं सुरक्षा ऑडिट झालं होतं, का असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पुलाचं सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी वारंवार करूनही रेल्वे प्रशासनानं त्याकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप नगरसेविका सुजाता सानप यांनी एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना केला.
"हा पूल रेल्वेच्या अखत्यारित येतो. आम्ही तीन-चार वर्षांपूर्वीच रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून पुलाचं ऑडिट करण्याची मागणी केली होती. ते पत्रही आमच्याकडे आहे. त्यामुळे या दुर्घटनेचा जाब रेल्वे प्रशासनाला विचारायला हवा," असं सुजाता सानप यांनी म्हटलं.
'अपघाताला जबाबदार असलेल्यांची हकालपट्टी करा'
"ही सरकार आणि बीएमसी प्रशासनाची चूक आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर आम्ही सर्व पुलांचं सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली होती. मात्र आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आलं. सरकारकडे 6 कोटी रुपये आहेत. मात्र लोकांना सुविधा पुरविण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाहीये. सरकार उद्या लोकांना भरपाई जाहीर करेल. पण त्यामुळं लोकांचे प्राण परत येणार नाहीत," असं म्हणत एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी बीएमसी आणि सरकारच्या कारभारावर टीका केली.
"आता बीएमसी आणि रेल्वे या अपघाताची जबाबदारी एकमेकांवर ढकलतील. मात्र त्यातून काहीच निष्पन्न होत नाही. जे लोक या अपघाताला जबाबदार आहेत त्यांना निलंबित न करता कामावरून काढून टाकण्यात यावं अशी आमची मागणी आहे," असंही वारिस पठाण यांनी म्हटलं आहे.
महापालिका-रेल्वे प्रशासन मिळून चौकशी करतील
दुर्घटनेनंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं, "संध्याकाळी 7.20 च्या दरम्यान पुलाचा एक भाग कोसळला. त्यातला सिमेंट-काँक्रिटचा भाग कोसळल्यानं पादचारी खाली कोसळले. दुर्घटनेनंतर तातडीनं बचावकार्य सुरू झालं. मी महापालिका आयुक्त अजय मेहता, पोलिस सहआयुक्त तसंच डीआरएम यांच्याशी सविस्तर चर्चा केली. हा ब्रिज 100 टक्के धोकादायक नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बीएमसीनं काही किरकोळ दुरुस्त्या सुचविल्या होत्या. त्या का झाल्या नाहीत, कुठे दिरंगाई झाली याचा तपास मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाकडून केला जाईल. दुर्घटनेची चौकशी महापालिका आणि रेल्वे मिळून करतील."
'नशीब बलवत्तर म्हणून वाचलो'
मोहम्मद अख्तर अन्सारी यांच्या टॅक्सीवर पुलाचा ढिगारा कोसळला होता. मात्र या दुर्घटनेतून ते बचावले.
"मी चर्चगेटवरून माहीमला जात होतो. टर्न घेतला आणि माझ्या कारच्या समोरच्या भागावर पुलाचा ढिगारा कोसळला. मला काहीच कळत नव्हतं. माझ्या गाडीत एक कस्टमर होती. मात्र त्यांना काही इजा झाली नाही. माझ्या गाडीचा दरवाजाही उघडत नव्हता. लोकांनी मला मदत केली आणि बाहेर काढलं. माझं नशिब चांगलं म्हणून मी वाचलो. आणि महत्त्वाचं म्हणजे सिग्नल लागलेला होता. त्यामुळे बरीच वाहनं पुलाच्या अलीकडेच थांबली होती. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली," या अनुभवाबद्दल मोहम्मद अख्तर अन्सारींनी सांगितलं.
'पुलाखाली अनेक लोक दबले गेले'
"आम्ही इथून चाललो होतो. अचानक मोठा आवाज झाला. पाहिलं तर पुलाचा भाग कोसळला होता. पुलाखालून जाणारी एक टॅक्सी याखाली सापडली. पुलासकट जो गराडा खाली पडला, त्याखाली अनेक लोक दबून गेले होते. माझ्यासकट काही लोकांनी तो मलबा हटवण्याचा प्रयत्न सुरू केला. काही लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती खूपच गंभीर होती. अनेक लोक जखमी झाले होते. रक्तही सांडलं होतं. गर्दीच्या वेळी ही घटना घडल्याने खूपच गोंधळ माजला होता," असं हा अपघात प्रत्यक्ष पाहणाऱ्या राजेश यावलकर यांनी 'आज तक'शी बोलताना सांगितलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)