राहुल गांधी म्हणतात नितीन गडकरी 'या' मुद्द्यांवर बोलणार का?

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींच्या मते भारतीय जनता पक्षात धाडस असलेला एकमेव नेता म्हणजे नितीन गडकरी.

अर्थात नितीन गडकरी यांनी अभाविपच्या माजी कार्यकर्त्यांना संबोधित करताना, 'आधी आपलं कुटुंब सांभाळा, मग पक्ष आणि देशाचा विचार करा' असा कडवट सल्ला दिला. त्यानंतर राहुल गांधींनी हे वक्तव्य केलंय.

अभाविप भाजपाची विद्यार्थी संघटना आहे. नितीन गडकरी यांनी अभाविपच्या माजी सदस्यांना संबोधित करताना म्हटलं की, 'जे लोक आपल्या घराची काळजी घेऊ शकत नाहीत, ते देश चालवू शकत नाहीत.'

गडकरी यांनी पुढं म्हटलं की, "मला बरेच लोक भेटतात, आणि आम्हाला भाजपासाठी, देशासाठी काम करायचंय असं सांगतात. मी अशाच एका व्यक्तीला विचारलं की, तुम्ही काय करता? तुमच्या कुटुंबात कोण आहे? तर त्यानं सांगितलं की मी एक दुकान चालवायचो. पण धंदा नीट होत नव्हता. त्यामुळे मी दुकान बंद केलं. त्याच्या कुटुंबात पत्नी आणि मुलंही आहेत. मी त्याला म्हटलं की तुम्ही आधी घराकडे लक्ष द्या. कारण जे लोक घर सांभाळू शकत नाहीत, ते देश कसा सांभाळणार?"

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या या वक्तव्याची बातमी ट्विटरवर शेअर करताना राहुल गांधींनी गडकरींच्या धाडसाचं कौतुक केलंय.

शिवाय आणखी तीन मुद्द्यांवर बोलण्याचं धाडस गडकरींनी दाखवावं, असंही ते म्हणाले. ज्यात रफाल घोटाळा, शेतकऱ्यांमध्ये असलेला असंतोष आणि स्वायत्त संस्थांची सुरु असलेली गळचेपी यावरही गडकरींनी बोलावं असं आव्हान राहुल गांधींनी दिलं आहे.

यानंतर 4 तासानंतर राहुल गांधींनी आणखी एक ट्विट केलं. यात त्यांनी गडकरींची माफी मागताना म्हटलं की, "ओह, गडकरीजी.. एक महत्वाची गोष्ट तर मी विचारायचं विसरुनच गेलो. अर्थात.. नोकरी! नोकरी! नोकरी!"

रफाल लढाऊ विमान खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप राहुल गांधी सातत्याने करत आहेत. रफालच्या व्यवहारात अनिल अंबानींच्या नव्याकोऱ्या कंपनीला ऑफसेट पार्टनर बनवून मोदींनी त्यांना फायदा पोहोचवल्याचं राहुल गांधींचं म्हणणं आहे.

याशिवाय मोदी सरकार शेतकऱ्यांची उपेक्षा करत आहे आणि स्वायत्त संस्थांवर सातत्याने हल्ला करत असल्याचा आरोपही काँग्रेसकडून केला जातो.

मात्र यावेळी पहिल्यांदाच विरोधकांनी थेट सत्ताधारी आणि मंत्री असलेल्या नितीन गडकरींच्या टिपण्णीचा हवाला देऊन मोदींवर निशाणा साधला आहे.

याआधी गडकरींनी अपयशाची जबाबदारी नेतृत्वानेच घेतली पाहिजे असं म्हटलं होतं. त्याला मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील निवडणुकांच्या पराभवाची पार्श्वभूमी होती.

याशिवाय जे नेते स्वप्नं दाखवून मतं मिळवतात आणि ती स्वप्नं पूर्ण करत नाहीत, अशा लोकांची जनता पिटाई करते असं म्हटलं होतं. तसंच मराठा आरक्षणादरम्यान गडकरींनी नोकऱ्याच उपलब्ध नाहीएत, तर आरक्षणाचा फायदा कसा होणार? असं विचारलं होतं.

गडकरींच्या या वक्तव्याला पक्षानं दिलेल्या आश्वासनांनो जोडून पाहिलं जाऊ लागलं. कारण 2014 च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदींनी करोडो रोजगार उपलब्धीचं आश्वासन दिलं होतं. मात्र सत्तेत आल्यानंतर ते पूर्ण करु शकले नाहीत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)