राहुल गांधींचा 'तो' व्हीडिओ किती खोटा किती खरा?

सत्तेवर आल्यानंतर 10 दिवसांत शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू, असं आश्वासन काँग्रेसने मध्य प्रदेशमध्ये प्रचारादरम्यान दिलं होतं. काँग्रेसला मध्य प्रदेशमध्ये मिळालेल्या विजयामागचं एक महत्त्वाचं कारण म्हणून या आश्वासनाकडे पाहिलं जात आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी एका प्रचारसभेत बोलताना कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचं जाहीर केलं होतं. मात्र राहुल गांधी आपला शब्द पाळणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

प्रचारसभेतील राहुल गांधींचं वक्तव्य आणि विजयानंतर त्यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेतील विधान एकत्र करून एक व्हीडिओ उजव्या विचारधारेला मानणाऱ्या अनेक सोशल मीडिया पेजेसवर शेअर केला जात आहे.

यातील बऱ्याच पेजेसचे लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. व्हॉट्स अप ग्रुपवरही हा व्हीडिओ फिरत आहे. राहुल गांधी विजय मिळाल्यानंतर लगेचच आपल्या आश्वासनापासून फिरल्याचं या व्हीडिओ क्लिपमधून दाखवलं जात आहे.

"मी तुम्हाला आश्वासन देतो, की काँग्रेस सत्तेवर आल्यानंतर दहा दिवसांत तुमचं (शेतकरी) कर्ज माफ करू" असं व्हीडिओतील पहिल्या क्लिपमधे राहुल गांधी म्हणत आहेत. तर याच व्हीडिओमधील दुसऱ्या क्लिपमधे ते म्हणतात, "कर्जमाफी हा एकमेव उपाय नाही तर केवळ मदतीचा हात आहे. या समस्येवरील उपाय गुंतागुंतीचा आहे- आर्थिक मदत हा त्याचा एक भाग आहे."

ही दोन्ही विधानं सलग ऐकल्यानंतर राहुल गांधींनी आपला शब्द फिरवला असाच समज होईल. पण यात तथ्य नाहीये. त्यांची दोन वाक्य अतिशय हुशारीनं एकत्र करण्यात आली आहेत, जेणेकरुन ऐकणाऱ्याला ते आपल्या विधानापासून फिरले आहेत, असं वाटू शकेल.

भाजपच्या काही नेत्यांनीही हा व्हीडिओ घाईगडबडीने ट्वीट केला आहे. कर्नाटक भाजपच्या नेत्या शोभा करंदलाजे यांनी आपल्या ट्विटर हँडलवर हा व्हीडिओ शेअर करून म्हटलं, "राहुल गांधी - निवडणुकी आधी आणि नंतर : शेतकरी बंधुंनो, आता राहुल गांधी दहा दिवसांत तुमचं कर्ज माफ करणार आहेत."

पवन दुरानी यांनीही राहुल गांधींचा हा व्हीडिओ ट्वीट केला आणि स्मृती इराणींनी तो रिट्वीट केला.

राहुल गांधींच्या वक्तव्याचा विपर्यास

मात्र राहुल गांधींच्या पत्रकार परिषदेचा पूर्ण व्हीडिओ ऐकल्यानंतर व्हायरल व्हीडिओमधलं त्यांचं विधान संदर्भ सोडून वापरल्याचं लक्षात येतं.

पत्रकार परिषदेमध्ये 2019च्या निवडणुकीत कर्जमाफी हा काँग्रेसच्या व्यूहरचनेतील महत्त्वाचा भाग असणार का, असा प्रश्न एका वार्ताहरानं राहुल गांधींना विचारला.

त्यावर त्यांनी दिलेलं उत्तर असं होतं : "मी माझ्या भाषणांमध्येही म्हटलंय की कर्जमाफी हा कायमचा तोडगा नाही, तर केवळ एक पर्याय आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा उपाय इतका सरळसोपा नाहीये. त्यामध्ये शेतकऱ्यांना मदत देणं, पायाभूत सुविधांचा विकास आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून देणं महत्त्वाचं आहे. स्पष्टपणे बोलायचं तर उपाययोजना सोपी नाही. हे काम आव्हानात्मक आहे. आम्हाला शेतकरी आणि देशातील नागरिकांना सोबत घेऊन यावर काम करावं लागेल आणि आम्ही ते नक्कीच करू."

शेतकऱ्यांचा रोष भाजपसाठी चिंतेचा विषय

शेतकऱ्यांचा प्रश्न हा राजस्थान, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्वांत चर्चिला गेलेला मुद्दा होता. गेल्या महिन्यात वेगवेगळ्या राज्यांतून हजारो शेतकरी रास्त हमीभाव आणि कर्जमाफीच्या मागणीसाठी दिल्लीमध्ये मोर्चा घेऊन आले होते.

शेतकऱ्यांचा रोष नरेंद्र मोदी सरकारसाठी चिंतेचा विषय बनला आहे. तो असाच कायम राहिला, तर देशभरात शेतीवर अवलंबून असलेल्या पट्ट्यातून भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये जिंकणं अवघड जाऊ शकतं, असं तज्ज्ञांचं मत आहे.

राहुल गांधींच्या 'जोडतोड करून' बनवलेल्या व्हीडिओचा अर्थ या संदर्भाने लावून पाहणं महत्त्वाचं आहे. राहुल गांधींनी शेतकऱ्यांना दिलेल्या आश्वासनाचं श्रेय हिरावून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओमधून करण्यात आला आहे.

अर्थात, मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस सरकार आपला शब्द पाळत 10 दिवसांत शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार का, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

( एकता न्यूज रुमच्या माध्यमातून सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फेक न्यूजची पडताळणी केली जाते. फेक न्यूजशी लढा देण्यासाठी बीबीसीनं उचललेल्या पावलांचा हा एक भाग आहे. )

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)