पोलिसांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर भारत-पाक चर्चा रद्द

जम्मू काश्मीरमधल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानबरोबर होणारी चर्चा रद्द केली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी एका पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांनी भारताला पत्र पाठवून उभय देशातील संबंध सुधारण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी दोन्ही देशातल्या प्रतिनिधींची बैठक व्हावी असाही प्रस्ताव मांडला होता. या पत्राला सकारात्मक प्रतिक्रिया म्हणून दोन्ही देशातच्या परराष्ट्र मंत्र्यांची बैठक न्यूयॉर्कमध्ये आयोजित केली होती," रवीश कुमार म्हणाले.

"दोन्ही देशात शांतता प्रस्थापित व्हावी तसंच दोन्ही देशातील संबंधात सकारात्मक बदल व्हावेत आणि दहशदवादाच्या मुद्द्यावर चर्चा व्हावी असं त्या पत्रात म्हटलं होतं. पण, पाकिस्तानच्या या प्रस्तावामागे असलेला कुटील हेतू समोर आलेला आहे,"असं रवीश कुमार यांनी स्पष्ट केलं.

"पाकिस्तानचे नवे पंतप्रधान इम्रान खान यांचा खरा चेहरा आता जगासमोर आलेला आहे. अशा वातावरणात पाकिस्तानी सैन्याशी कोणत्याही प्रकारची चर्चा करायला काहीही अर्थ नाही. त्यामुळे आता भारत-पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये आता कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही," असंही त्यांनी पुढे सांगितलं.

शोपियातून अपहरण झालेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांची शुक्रवारी पहाटे गोळी मारून हत्या करण्यात आली.

PTI या वृत्तसंस्थेला पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या पोलीस कर्मचाऱ्यांचं जिथून अपहरण झालं होतं त्या गावापासून एक किलोमीटर अंतरावर त्यांचे मृतदेह सापडले.

पोलीस कॉन्स्टेबल निसार अहमद, पोलिस ऑफिसर फिरदौस अहमद आणि कुलवंत सिंह अशी हत्या झालेल्या कर्मचाऱ्यांची नावं अशी आहेत.

अधिकाऱ्यांच्या मते निसार अहमद सशस्त्र पोलीस दलासोबत काम करत होते. फिरदौस अहमद आधी रेल्वेत काम करत होते आणि आता कॉन्स्टेबल बनण्याच्या मार्गावर होते. कुलवंत सिंह कुलगाम पोलीसांसोबत काम करत होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)