You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण आंदोलन : मुख्यमंत्र्यांच्या भाषणातले 10 महत्त्वाचे मुद्दे
"नोव्हेंबर महिन्यात मराठा आरक्षणाची सर्व वैधानिक प्रक्रिया पूर्ण करू," हे जाहीर करतानाच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सध्याच्या हिंसाचाराच्या घटनांमुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे, असं मत व्यक्त केलं.
फडणवीस यांनी रविवारी सायंकाळी राज्याला उद्देशून केलेल्या विशेष भाषणात मराठा आरक्षणाबाबत सरकारची भूमिका मांडली.
त्यांच्या भाषणातले महत्त्वाचे 10 मुद्दे पुढीलप्रमाणे :
1. मराठा आरक्षणाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात टिकण्यासाठी त्यावरच्या सर्वंकष अहवालाची गरज आहे. हा अहवाल तयार करण्यासाठी राज्य मागास वर्ग आयोगाची स्थापना केली. हा अहवाल लवकरात लवकर द्यावा, अशी विनंती राज्य मागास वर्ग आयोगाला आम्ही केली आहे. नुकतंच, उच्च न्यायालयानं या आयोगाचा अहवाल कधीपर्यंत येईल याचा कालबद्ध कार्यक्रम द्यावा, असे आदेश दिले आहेत. 7 ऑगस्टपर्यंत हा कालबद्ध कार्यक्रम कधी देणार या संदर्भातलं आपलं मत राज्य मागास वर्ग आयोग उच्च न्यायालयात मांडणार आहे.
2. मराठा आरक्षणाची सर्व वैधानिक प्रक्रिया येत्या नोव्हेंबरपर्यंत राज्य सरकार कोणत्याही स्थितीत पूर्ण करणार आहे. अहवाल लवकर प्राप्त झाल्यास महिनाभरात ही वैधानिक प्रक्रिया पूर्ण केली जाईल.
3. नोकऱ्यांच्या मेगाभरतीबद्दल गैरसमज निर्माण झाले आहेत. मेगाभरतीमध्ये मराठा समाजावार अन्याय होणार नाही. SC आणि OBC यांच्यावर अन्याय होऊ न देता मराठा समाजाला न्याय मिळेल. याबाबत सरकार उचित कारवाई करत आहे. त्यामुळे मेगाभरतीची प्रक्रिया आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.
4. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसला (TISS) यासाठी काम देण्यात आलं असून ही संस्था हा सर्व्हे करत आहेत. हा सर्व्हे ऑगस्टमध्ये पूर्ण होईल आणि त्यानंतर या प्रश्नावरही वैधानिक कार्यवाही पूर्ण होईल.
5. देशात सगळ्यांत जास्त रोजगाराच्या संधी गेल्या वर्षी तयार झाल्याचे EPFO चा केंद्राचा अहवाल सांगतो. गेल्या एका वर्षांत 8 लाख रोजगार निर्माण झाले. कारण, मोठ्या संख्येनं गुंतवणुकदार राज्यांत आले. महाराष्ट्र हे शांत आणि पुरोगामी राज्य आहे. पण देशाला राज्यातील सध्या ज्या हिंसक घटना पाहायला मिळत आहेत, त्यामुळे नव्याने उदयोजक महाराष्ट्रात येतील का हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
6. चाकण आणि औरंगाबाद यांसारख्या औद्योगिक क्षेत्रात हिंसाचाराचे प्रकार घडल्यानंतर या भागात गुंतवणुकदार येतील का? मुठभर लोकांमुळे महाराष्ट्र बदनाम झाला आहे. आंदोलकांना हिंसा नकोय, पण निवडक लोक ही हिंसा करत आहेत. महाराष्ट्रातलं सध्याचं हे चित्र बदलण्याची गरज आहे.
7. तरुणांच्या सध्या होणाऱ्या आत्महत्या आमच्यासाठी सर्वाधिक वेदनादायी आहेत. तरुणांनो आत्महत्या करू नका, जाळपोळ करू नका. राज्य सरकार सहकार्य करत नसेल तर सरकारशी संघर्ष करा. पण, हे सरकार मदत करत असताना अशी भूमिका घेणं योग्य नाही.
8. सरकारशी चर्चा न करण्याची काहींनी भूमिका घेतली आहे. पण, सरकारशी चर्चा आवश्यक आहे. सरकारकडे आपले प्रश्न मांडले नाहीत तर, तुमच्या भावना आमच्यापर्यंत पोहोचणार नाहीत. त्यामुळे आम्हाला तुमच्या सल्ल्याची गरज असून तुमची मतं आमच्यासाठी महत्त्वाची आहेत.
9. महाराष्ट्राचं सध्याचं जे चित्र निर्माण झालं आहे ते आपण बदललं पाहिजे. हिंसा करणाऱ्या आणि सोशल मीडियावर चुकीच्या गोष्टींचा प्रसार करणाऱ्या मुठभरांमुळे सामाजाचे नेते दूर चालले आहेत. त्यांनी असं न करता समाजाचां नेतृत्व केलं पाहिजे.
10. माझ्या बोलण्याचा विपर्यास न करता एकत्र येण्याची वेळ आहे. विरोधकांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी सरकारवर टीका न करता आमच्याशी थेट चर्चेला समोर यावं. आम्ही सगळ्यांशी या विषयी खुलेपणानं चर्चा करण्यास तयार आहोत.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या या भाषणानंतर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी ट्वीट करत मराठा आरक्षणाचं राजकारण करण्याचा प्रयत्न सरकारनेच केला आहे, विरोधी पक्षांनी नाही, असं म्हटलं आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)