You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण : जाळपोळ, दगडफेक आणि हिंसेनंतर मराठा आंदोलन स्थगित
आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या मराठा समाजातर्फे बुधवारी मुंबई आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली होती.
अनेक ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागलं. तसंच काही ठिकाणी जाळपोळीच्या घटना सुद्धा घडल्या. कळंबोलीमध्ये काही वाहनांना आग लावण्यात आली. साताऱ्यामध्ये आंदोलकांनी केलेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झाले.
दुपारी 2 नंतर अधिकृतपणे आंदोलन मागे घेण्यात आलं, पण तरीही काही भागांमध्ये आंदोलन सुरूच होतं.
काँग्रेसनं या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी असं म्हटलं आहे. तर मुख्यमंत्र्यांनी याबाबत आपण मराठा समाजाशी चर्चेला तयार असल्याचं ट्वीट केलं आहे.
तर राज्यातल्या काही विचारवंतांनी एक सोशल मीडिया पोस्ट व्हायरल करून सर्वांना शांततेचं आवाहन केलं.
बुधवारी दिवसभरात मुंबई आणि परिसर तसंच राज्याच्या इतर भागांमध्ये काय काय घडलं याचा संपूर्ण वृत्तांत खालील प्रमाणे
रात्री 9 - मराठवाड्यातील 2 आमदारांचे राजीनामे
शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी ई-मेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे त्यांच्या आमदारकीचा राजीनामा पाठवला आहे.
बीबीसी मराठीशी बोलताना जाधव म्हणाले, "मी सध्या मुंबईला निघालो असून उद्या सकाळी 11 वाजता प्रत्यक्ष विधानसभा अध्यक्षांकडे माझा राजीनामा सुपूर्द करणार आहे. तत्पूर्वी मी ई-मेलद्वारे माझ्या विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा त्यांना पाठवला आहे."
राजीनाम्याबाबत पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांना कल्पना दिली होती का? या प्रश्नाचं उत्तर देताना, शिवसेनेचा मराठा आरक्षणाला आधीपासूनच पाठिंबा असून माझ्या राजीनाम्यावर पक्षाने आक्षेप घेण्याचं कारण मला दिसत नाही, असं म्हटलं.
दुसरीकडे वैजापूरचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी सुद्धा वैजापूरमध्ये सकल मराठा समाजाकडे विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा सोपवला.
बीबीसी मराठीशी बोलताना, विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा हा स्वतः सादर करावा लागत असल्यानं गुरुवारी विधानसभा अध्यक्षांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.
संध्याकाळी 7 - 'नेतृत्वहीन आणि दिशाहीन आंदोलनानं पदरात काहीच पडणार नाही'
मराठा समाजाला आवाहन करणारी एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. प्रा. एन. डी. पाटील, डॉ. जयसिंगराव पवार, डॉ. आ. ह. साळुंखे, श्रीमंत कोकाटे आणि मेघा पानसरे यांच्या सारख्या 18 विचारवंत आणि कलाकारांनी मराठा तरुणांना आवाहन करणारी ही पोस्ट लिहिली आहे.
विचारवंतांनी केलेल्या आवाहनातील ठळक मुद्दे
- मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख कर्ता आणि वडिलधारा समाज आहे.
- मराठा क्रांती मोर्चाने शिस्तीचा, संयमाचा एक आदर्श घालून दिला. मराठा समाजाने सनदशीर मार्गाने केलेल्या या शक्तिप्रदर्शनाची सरकारने योग्य दखल घेतली नाही.
- मराठा समाजाच्या भावना समजून घेण्यात सरकार कमी पडलं, त्यामुळेच आंदोलनाला आजचं आक्रमक स्वरुप प्राप्त झालं आहे.
- मराठा समाजाने आपल्या मागण्यांसाठी सरकारशी संघर्ष करायलाच हवा, परंतु त्यासाठी सनदशीर मार्गाने लढा द्यायला हवा.
- अॅट्रॉसिटीचा मुद्दा काढून मराठा-दलितांमध्ये, तसंच आरक्षणाच्या निमित्ताने मराठा-ओबीसींमध्ये तेढ वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. त्यापासून सावध राहिलं पाहिजे.
- मराठा समाजाच्या तरुणांमध्ये प्रचंड ऊर्जा आहे आणि त्या ऊर्जेचा वापर रचनात्मक कामासाठी व्हायला हवा.
- नेतृत्वहीन आणि दिशाहीन आंदोलन चालवून काहीच पदरात पडणार नाही.
- आत्मघातकी मार्ग पत्करून ध्येयापर्यंत पोहोचता येणार नाही. दलित,ओबीसी बांधवांनीही हा लढा आपला मानून त्याला ताकद दिली पाहिजे.
संध्याकाळी 6.45 - हिंसा करणाऱ्यांची ओळख पटली - ठाणे पोलीस आयुक्त
ठाण्यात आंदोलनादरम्यान हिंसा करणाऱ्यांची ओळख पटली आहे, त्यांच्यावर लवकरच कारवाई करू असं ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितलं आहे.
संध्याकाळी 6.27 - कळंबोलीत आंदोलक माघार घेण्यास तयार नाही
कळंबोलीमध्ये आंदोलक माघार घेण्यास तयार नसल्याचं दिसून येत आहे. पोलिसांकडून अजूनही धरपकड सुरू आहे.
संध्याकाळी 6.02- मुंबई-पुणे वाहतूक सुरळीत
पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर मुंबई-पुणे वाहतूक आता सुरळीत झाली आहे.
संध्याकाळी 5.35 - कळंबोलीमध्ये दगडफेक सुरूच
नवी मुंबई जवळच्या कळंबोली भागात पुण्याकडे जाणाऱ्या हायवेवर अजूनही परिस्थिती आटोक्यात नाही. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर केला जात आहे. तसंच पोलिसांकडून धरपकड सुरू करण्यात आली आहे.
संध्याकाळी 5.20 - साताऱ्यात आंदोलकांची धरपकड
साताऱ्यात झालेल्या दगडफेकीत पोलिसांसह काही माध्यम प्रतिनिधी जखमी झाले आहेत. परिस्थिती अटोक्यात आणण्यासाठी साताऱ्यात आंदोलकांची धरपकड सुरू करण्यात आली आहे.
साधारण 50 ते 60 जणांना ताब्यात घेण्यात आलं आहे. तसंच कोल्हापूर विभागाचे विशेष पोलीस महानिरिक्षक विश्वास नांगरे पाटील आणि पालकमंत्री विजय शिवतारे घटनास्थळी दाखल झाले आहेत.
संध्याकाळी 5- चर्चेस सदैव तयार - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकल मराठा समाजाशी सरकार सदैव चर्चेस तयार असल्याचं ट्वीट केलं आहे.
मुख्यमंत्र्यांच्या पत्रकातील ठळक मुद्दे
- आजही सकल मराठा समाजाशी चर्चा करायला तयार आहे.
- मराठा समजाला आरक्षण देण्यासाठी शासन कटिबद्द आहे.
- राज्य सरकारनं केलेल्या कायद्याला न्यायालयानं स्थगिती दिली आहे, त्यामुळे हा प्रश्न न्यायप्रलंबित आहे
- गेल्या काही दिवसांपासून होणारी आंदोलनं, आत्महत्या दु:खद आहे.
- काही राजकीय नेते परिस्थिती चिघळवून राजकीय लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांनी महाराष्ट्राच्या हितार्थ भूमिका घेऊन प्रश्नांचं निराकरण करण्यासाठी हातभार लावावा.
दुपारी 4.30 - मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी - अशोक चव्हाण
"खटल्याची सुनावणी कशी लांबवता येईल, एवढाच प्रयत्न सरकार करत आहेत. सरकार आरक्षणाबाबत गंभीर नाही," असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे.
"598 मोर्चे निघाल्यानंतर आज परिस्थिती चिघळली आहे. एकाही मंत्र्यानं आरक्षणासाठी पाठपुरावा केला नाही. परिस्थिती चिघळल्यानंतर आता ते बोलतात आहेत," असं ते म्हणाले.
"मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री जे बेताल वक्तव्य करत आहेत, ते टाळलं जावं, हे प्रश्न कालबद्धरित्या सोडवले जावेत. लोकांचा अंत न पाहता निर्णय घ्यावा. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी. तसंच एक दिवसाचं विशेष अधिवेशन झालं पाहिजे," असंही ते बोलले आहेत.
दुपारी 4 - इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक सुरळीत
मुंबईतल्या इस्टर्न एक्स्प्रेस हायवेवरील वाहतूक आता सुरळीत झाली आहे. बीबीसी मराठीच्या शरद बढे यांनी ही दृश्य पाठवली आहेत.
दुपारी 3.39 - ठाण्यात रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात
ठाण्यात परिस्थिती अटोक्यात ठेवण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात करण्यात आली आहे.
दुपारी 3.33 - मानखुर्दमध्ये वाहतूक सुरळीत
मानखुर्दमधल्या पाटील नगर परिसरातील स्थिती आता सुरळीत आहे. वाहतूक पर्ववत करण्यात आली आहे.
दुपारी 3.29 - मुख्यमंत्री बदलण्याचं काही कारणच नाही - चंद्रकांत पाटील, महसुल मंत्री
सरकारला मराठा समाजाला 100 टक्के आरक्षण द्यायचं आहे, आंदोलकांना हात जोडून विनंती आहे त्यांनी संयम बाळगावा, असं आवाहन महसुल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. तसंच त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं त्यांनी शरद पवारांनी केलेल्या आरोपावर म्हटलं आहे.
मुख्यमंत्री बदलण्याचं काहीही कारण नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. बीबीसी मराठीशी बोलतांना त्यांनी हे सांगितलं आहे.
दुपारी 3.05 - ठाण्यात आंदोलनाला हिंसक वळण, पोलीस जखमी
ठाण्यात झालेल्या दगडफेकीत पोलीस कर्मचारी जखमी. पोलिसांकडून अश्रुधुराचा वापर. पोलीस सहआयुक्त मधुकर पांडेय घटनास्थळी दाखल.
दुपारी 2.52 ठाण्यात पोलिसांवर दगडफेक
ठाण्यात आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याची माहिती मिळत आहे. ठाण्यात रॅपिड ऍक्शन फोर्सला बोलावण्यात आलं आहे.
दुपारी 2.47 नाशिकमध्ये बससेवा बंद
नाशिकच्या ठक्कर बस स्थानकात असा शुकशुकाट आहे.
दुपारी 2.44 - हॉटेलची तोडफोड
ठाण्यातल्या नितिन कंपनी जंक्शनजवळ आंदोलकांनी केली मरक्युरी डाईन हॉटेलची तोडफोड.
दुपारी 2.35 - मुंबईत सकल मराठा समाजाची पत्रकार परिषद
मुंबईतील बंद स्थगित करत असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेत करण्यात आली आहे. तसंच लोकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.
दुपारी 2.18 - साताऱ्यात दगडफेक, पोलीस अधीक्षक जखमी
साताऱ्याच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकात टायर जाळून आंदोलन सुरू होतं. त्यावेळी पोलिसांनी अश्रुधुराच्या 5 नळकांड्या फोडल्या. प्रत्युत्तरात जमावकडून झालेल्या दगडफेकीत पोलीस अधीक्षक संदीप पाटील जखमी झालेत.
दुपारी 2.05 - उस्मानाबादमध्ये 7 जणांवर गुन्हे दाखल
उस्मानाबादमध्ये मंगळवारी झालेल्या आंदोलनात दगडफेक झाली होती, या प्रकरणी पोलिसांनी सात तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर ३०७ नुसार गुन्हे दाखल केले आहेत.
उस्मानाबाद शहरात सकाळी तुरळक ठिकाणी दगड फेक झाली. सध्या परिस्थीती नियंत्रणात आहे.
दुपारी 2 मुख्यमंत्र्यांनी लवकर निर्णय घ्यावा - महिला रिक्षा चालक
मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाबाबत लवकर निर्णय घ्यावा असं महिला रिक्षा चालक स्वप्नगंधा जोशी यांनी म्हटलं आहे. आंदोलनामुळे सामान्यांना त्रास होत आहे, तसंच अनेकांचा रोजगार बुडत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
स्वप्नगंधा रिक्षा चालवून त्यांचा उदरनिर्वाह करतात. आंदोलनामुळे त्यांचा आजचा रोजगार बुडाला आहे.
दुपारी 1.40 ठाण्यात बाईक रॅली
मराठा आंदोलकांनी ठाण्यात बाईक रॅली काढली.
दुपारी 12.30 ठाण्यात आक्रमक आंदोलकांमुळे कडकडीत बंद
ठाण्यात सकाळपासून आंदोलकांनी आक्रमकपणे रस्ते आणि रेल्वे रोखून धरल्याने अनेक नागरिक घराबाहेर पडणं टाळत असल्याचं दिसलं.
आत्ता रेल्वे आणि रस्त्यावरची वाहतूक सुरळीत दिसत असली, तरी एरवी गजबजलेल्या स्टेशन परिसरात शुकशुकाट बघायला मिळतो आहे, असं बीबीसीचे बातमीदार प्रशांत ननावरे यांनी कळवलं.
तीन हात नाका इथला हायवे बंद आहे. नितीन कंपनी ते आनंद नगर चेकनाक्यापर्यंत महामार्ग बंद आहे.
सकाळी 11. 00 नाशिकमध्ये आंदोलन
नाशिकजवळ गंगापूर धरण इथे जलसमाधी आंदोलनाचा प्रयत्न करणाऱ्या 25-26 आंदोलकांना नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतलं, अशी माहिती नाशिकमधून बीबीसी मराठीसाठी काम करणाऱ्या प्रवीण ठाकरे यांनी दिली.
सकाळी 10.30 सांगलीत कृष्णेकाठी आंदोलन
मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनादरम्यान नदीत उडी मारून जीव दिलेल्या काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहत कृष्णा नदीच्या घाटावर जलसमाधी आंदोलन करण्यात आलं.
सांगलीतल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी कृष्णेच्या पाण्यात उतरून जय जिजाऊ जय शिवराय, एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. तसंच मराठा समाजाला आरक्षण मिळाल्या शिवाय माघार घ्यायची नाही, अशी शपथ घेतली, अशी माहिती बीबीसीसाठी काम करणाऱ्या स्वाती पाटील राजगोळकर यांनी दिली.
सकाळी 10.10 ठाण्यात आंदोलक रेल्वेट्रॅकवर
आंदोलकांनी सकाळपासूनच ठाण्यात रस्त्यावर आंदोलन केलं. सुरुवातीला तीन हात नाक्याजवळ महामार्गावर आंदोलन केल्यानंतर ठाणे स्टेशनवर आंदोलकांनी रेल्वे अडवली. ठाण्याहून सुटणारी लोकल अडवली. आंदोलकांनी रेल्वेमार्ग रोखला आहे.
सकाळी 9.15 - जोगेश्वरीला लोकल अडवली
आंदोलकांनी अप फास्ट लोकल रोखून धरली. काही वेळ आंदोलन रेल्वे ट्रॅकवर उतरले होते. त्यानंतर साडेनऊच्या सुमारास वेस्टर्न रेल्वेची सेवा सुरळीत सुरू झाली.
सकाळी 8.30 मुंबईत शाळा, कॉलेज सुरू
मुंबई बंदची हाक मराठा संघटनेनं दिली असली तरी त्यातून अत्यावश्यक सेवांना वगळलं आहे. मोठा पोलीस बंदोबस्त तैनात आहे. सध्या तरी सर्व वाहतूक व्यवस्था सुरळीत सुरू आहेय नाक्यानाक्यावर पोलिस दिसत आहेत.
बंदची हाक दिलेली असली तरी शाळा, महाविद्यालयं सुरू आहेत आणि दूध सेवेवरही परिणाम नाही, अशी माहिती बीबीसी मराठीसाठी मुंबईतून काम करणाऱ्या प्रशांत ननावरे यांनी दिली.
नवी मुंबईत बसवर दगडफेक
मुंबईमध्य आत्तापर्यंत बेस्ट बस सेवा सुरळीत आहे, अशी माहिती बेस्टच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली. पण नवी मुंबईतल्या घणसोली इथे आज पहाटे दोन बेस्ट बसवर दगडफेक झाल्यामुळे ऐरोली ते वाशी पर्यंत बेस्टचे बस सेवा बंद आहे. मुलुंड कडून वाशीच्या दिशेने जाणारी बस सेवा ऐरोली पर्यंत चालविण्यात येत आहे, अशी माहिती 'बेस्ट'कडून मिळाली.
संसदेत पडसाद
औरंगाबादमध्येच संतप्त जवामानं अग्निशामन दलाची गाडी पेटवून दिली.
लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा या बंदचे पडसाद उमटले. राज्यातल्या खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला. पुणे आणि कोल्हापुरातही याचे पडसाद उमटले.
राज्य सरकारनं मराठा आंदोलनाची दखल न घेल्यानंच उद्रेक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.
याआधी आंदोलकांनी मराठा आरक्षण मिळालं नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरची आषाढी एकादशीची विठ्ठल महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता.
शिर्डीमध्ये कृष्णा गंभीरे या तरुणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबादच्या कळंब गावातील हा तरुण आहे. पदयात्रेत तो शिर्डीला आला होता. सध्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचा सुरू आहेत.
परिस्थिती चिघळण्यास सरकारच जबाबदार - शरद पवार
राज्य सरकारनं मराठा आंदोलनाची दखल न घेल्यानंच उद्रेक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी एक पत्रक काढून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यात परिस्थिती चिघळण्यास सरकार आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री याबाबत चिथावणीखोर वक्तव्य देत असल्याचं पवारांनी पत्रकात म्हटलं आहे.
आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करू नये, असं आवाहन सुद्धा पवारांनी केलं आहे. आरक्षणासंदर्भात तामिळनाडू पॅटर्नची आठवणही त्यांनी सरकारला करून दिली आहे.
हेही वाचलंत का?
- मराठा क्रांती मोर्चा : जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ठिय्या आंदोलन मागे
- पानिपतच्या युद्धात कसे लढले होते मराठे?
- सोशल : 'पंढरपूरला जाणं टाळून मुख्यमंत्री मराठा आंदोलनाविषयी किती गंभीर हे कळालं'
- सोशल : 'शांत मोर्च्यांची दखल न घेतली गेल्यानं मराठा मोर्चे आक्रमक झालेत'
- 'कोपर्डी असो वा खैरलांजी, महिलेची जात न पाहता तिला जलद न्याय मिळावा'
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)