You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
औरंगाबाद दंगल : दोघांचा मृत्यू, शहर शांत पण राजकारण पेटलं
- Author, निरंजन छानवाल आणि अमेय पाठक
- Role, बीबीसी मराठी
औरंगाबाद शहरात शुक्रवारी मध्यरात्री दोन गटात क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादाचं पर्यावसान दंगलीत झालं. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. जखमींमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
शुक्रवारी रात्री 10.30च्या सुमारास बेकायदशीर नळ कनेक्शन तोडण्याच्या वादावरून दोन गटांमध्ये हाणामारी झाली. तिचं पर्यावसन पुढे दंगलीत झालं. प्रकरण एवढं पेटलं की मध्यरात्रीच्या पुढे पोलिसांना लाठीमार, प्लॅस्टिकच्या गोळ्या आणि अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला.
तणाव निवळला असं वाटत असतानाच पहाटे 4.30च्या सुमारास शहरातल्या गांधीनगर, मोती कारंजा, शहागंज आणि राजा बाजार परिसरात पुन्हा दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना सुरू झाल्या.
तलवारी, चाकू, लाठ्याकाठ्यांसह जमावाने तुफान दगडफेक केली. परिसरातल्या इतर गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आली. शहागंजमधल्या चमन परिसरात अनेक दुकानं जाळण्यात आली.
या हिंसाचारात अब्दुल हारिस अब्दुल हारून कादरी (वय 17, रा. जिन्सी) आणि जगनलाल छगनलाल बन्सिले (वय 62, रा. स्टेट बँकेजवल, शहा गंज) यांचा मृत्यू झाला आहे.
या घटनेनंतर शहरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला असून जालन्याहून अतिरिक्त कुमक मागवण्यात आली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचं भारांबे यांनी सांगितलं.
सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नका, असं आवाहन औरंगाबादचे प्रभारी पोलीस आयुक्त मिलिंद भारांबे यांनी नागरिकांना केलं आहे.
राजकारण पेटलं
शहरात आता तणावपूर्ण शांतता असली तरी राजकारण पेटलं आहे. MIMचे औरंगाबादमधले आमदार इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की "ही घटना अचानक घडली नसून सुनियोजित कट आहे. गेल्या 8-10 दिवसांपासून यासाठी प्रयत्न सुरू होते आणि पोलिसांना याची कल्पना होती. औरंगाबाद शहर संवेदनशील असताना या शहराला पूर्णवेळ पोलीस आयुक्त का नाही?"
MIMने आरोप केला की शिवसेनेचे कार्यकर्ते लच्छू पेहलवान यांच्यामुळे ही दंगल सुरू झाली. त्यांची चौकशी व्हायला हवी, अशीही या पक्षाने मागणी केली आहे.
लच्छू पेहलवान यांनी हे आरोप फेटाळले असून आम्ही अजिबात जातीयवादी नाही, असं म्हटलं आहे.
औरंगाबादचे शिवसेनेचे खासदार यांनी राज्य सरकारवर आरोप केला आहे. "कचरा प्रश्नासाठी 600 पोलीस होते, पण इथे एवढी जाळपोळ होत असताना पोलीस का नव्हते?"
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही सरकारवर आरोप केला आहे. "सरकार बघ्याची भूमिका घेत आहे. सत्ताधारी पक्षातले लोक एक जमावाची बाजू घेतात. सरकारला कायदा व सुव्यवस्था टिकवण्यात अपयश आलं आहे."
औरंगाबादचा हिंसाचार हे राज्य सरकारचे अपयश आहे. पोलिसांनी वेळीच दखल न घेतल्यामुळे परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला आहे.
तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय की "औरंगाबादमधली परिस्थिती सध्या नियंत्रणात आहे. पण तिथे अजूनही तणाव कायम आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)